
अपयश ही यशाची पहिली पायरी असते हे फक्त पुस्तकात वाचलेलं किंवा भाषणात ऐकलेलं वाक्य कल्याणच्या स्नेहा आहेर या तरुणीने आपल्या कर्तृत्वातून खरं करून दाखवलं आहे. कल्याणच्या एका सर्वसामान्य कुटुंबात जन्मलेली स्नेहा आज न्यायाधीश बनली आहे. तिचा प्रवास केवळ यशाचा नाही, तर जिद्द, चिकाटी, अपयशावर मात आणि वडिलांच्या स्वप्नासाठी झगडणाऱ्या मुलीचा आहे.
स्नेहाने महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या सिव्हिल जज (ज्युनिअर डिव्हिजन) परीक्षेत संपूर्ण राज्यात ११४ पात्र उमेदवारांपैकी ६२ वा क्रमांक मिळवत यश संपादन केलं. तिचं हे यश ऐकून तिचे आई-वडील, शेजारी, नातेवाईक, आणि मित्र परिवार सगळेच भारावून गेलेत. तिच्या आई-वडिलांच्या डोळ्यात आनंदाश्रू तरळत होते कारण हे केवळ तिचं नव्हे तर त्यांच्या स्वप्नाचंही यश होतं.
कल्याण पश्चिमेच्या आधारवाडी परिसरातील त्रिवेणी मेजेस्टा इमारतीत राहणाऱ्या स्नेहाचे वडील संतोष आहेर हे मुंबई उच्च न्यायालयात असिस्टंट रजिस्ट्रार म्हणून कार्यरत आहेत. २०१४ मध्ये स्वतः एमपीएससी परीक्षेला सामोरे गेलेल्या संतोष यांना अपयश आलं. त्यानंतर त्यांनी निश्चय केला की, “माझी मुलगी न्यायाधीश होणार!” आणि याच प्रेरणेतून स्नेहाच्या आयुष्याला एक ध्येय लाभलं. घरात नेहमी न्यायालयातील चर्चा असायची. स्नेहाही त्या चर्चांमध्ये रमू लागली आणि तीच रुची पुढे तिच्या आयुष्याचं ध्येय ठरली. दहावी उत्तीर्ण झाल्यानंतर तिने कॉमर्स घेतलं आणि पुढे चर्चगेट येथील गव्हर्नमेंट लॉ कॉलेजमधून पाच वर्षांचं कायद्याचं शिक्षण पूर्ण केलं.
२०२२ मध्ये स्नेहा पहिल्यांदा सिव्हिल जज परीक्षेला सामोरी गेली पण तिला अपयश आलं. मात्र तिने हार मानली नाही. आई-वडिलांचा खंबीर पाठिंबा आणि तिची स्वतःची जिद्द यामुळे ती पुन्हा उभी राहिली. तिने पुण्यातील एका खास मार्गदर्शन वर्गात प्रवेश घेतला. गणेश शिरसाठ यांचं तिला मार्गदर्शन मिळालं. सोशल मीडिया, गप्पा, नातेवाईक यापासून दूर राहून दिवसाचे १६ तास ती अभ्यास करत होती.
अखेर तिच्या अथक मेहनतीला यश मिळाला. यंदाच्या परीक्षेत तिला ६२ वा क्रमांक मिळाला आणि तिचं न्यायाधीश होण्याचं स्वप्न प्रत्यक्षात उतरलं. निकालाच्या दिवशी तिच्या घरात उत्सवाचं वातावरण होतं. तिच्या आईवडिलांचे मोबाईल शुभेच्छांच्या फोनने खणखणत होते. स्नेहाचे वडील भावुक होत म्हणाले, “माझं स्वप्न माझ्या मुलीने पूर्ण केलं. आधी तिची ओळख माझ्यामुळे होती, पण आता माझी ओळख तिच्यामुळे होईल. तिच्यावर विश्वास होता आणि तिने तो सार्थ ठरवलाय.”
स्नेहाची ही यशोगाथा केवळ यशाची गोष्ट नाही तर ती प्रत्येक पालकासाठी एक प्रेरणा आहे. आपल्या मुलांवर विश्वास ठेवा आणि प्रत्येक तरुण-तरुणीसाठी ही एक शिकवण आहे. अपयश आल्यावर थांबू नका कारण यश तुमच्याही दाराशी येऊन उभं आहे. जरा अजून प्रयत्नांची गरज आहे. स्नेहाच्या यशात तिची मेहनत, तिच्या आईवडिलांचा विश्वास आणि शिक्षकांच्या योग्य मार्गदर्शनाचं उत्तम मिश्रण आहे. तिची कहाणी आजच्या पिढीसाठी प्रेरणादायी आहे कारण ती सांगते की, 'अपयश म्हणजे अंत नाही, तर नव्या यशाची सुरुवात असते.'
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.