
नितीन पाटणकर, साम टीव्ही | पुणे
Somnath Suryawanshi Case : सोमनाथ सूर्यवंशीची हत्या पोलिसांनी केली असून, या घटनेला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस जबाबदार असल्याचा गंभीर आरोप काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी केला होता. या आरोपांना देवेंद्र फडणवीस यांनी प्रत्युत्तर दिलं आहे. राहुल गांधी हे मागील काही वर्षांपासून द्वेष पसरवण्याचे काम करत असून, त्यासाठीच ते परभणीला आले होते, असं फडणवीस म्हणाले.
सोमनाथ सूर्यवंशी प्रकरणावरून राज्याचं राजकारण तापलं आहे. सोमनाथचा कोठडीत मृत्यू झाल्यानंतर विरोधकांनी सत्ताधाऱ्यांवर आरोपांची सरबत्ती केली. तसंच सोमनाथची हत्या झाल्याचा आरोप त्याच्या कुटुंबीयांकडूनही करण्यात येत आहे. या प्रकरणाची न्यायालयीन चौकशी करण्याचे आदेश देण्यात आले आहेत. सरकारने आपली भूमिका स्पष्ट केली असली तरी, या घटनेवरून सरकारवर विरोधकांकडून आरोप करण्यात येत आहेत. या घटनेतील पीडित सूर्यवंशी कुटुंबीयांच्या भेटीसाठी काँग्रेस नेते राहुल गांधी हे परभणीत आले होते. त्यावेळी राहुल यांनी भाजप सरकार, राष्ट्रीय स्वयंसेवक संघ आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर टीकास्त्र सोडत गंभीर आरोपही केले.
परभणी येथील सोमनाथ सूर्यवंशी याची हत्या पोलिसांनीच केली आहे. या घटनेवर बोलताना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे विधानसभेत खोटं बोलले आहेत. मुख्यमंत्रीच जबाबदार आहेत. तसेच राष्ट्रीय स्वयंसेवक संघाची विचारधारा ही संविधानविरोधी असल्याचा आरोप राहुल गांधी यांनी केला. सूर्यवंशी कुटुंबीयांशी संवाद साधल्यानंतर त्यांनी प्रसारमाध्यमांकडे प्रतिक्रिया दिली.
देवेंद्र फडणवीस हे पुण्यात एका कार्यक्रमासाठी आले होते. त्यावेळी त्यांनी प्रसारमाध्यमांशी संवाद साधला. त्याचवेळी राहुल गांधी यांनी परभणीच्या घटनेवरून केलेल्या आरोपांना फडणवीसांनी प्रत्युत्तर दिलं. राहुल गांधी यांची ही राजकीय भेट होती. मागील काही वर्षांपासून ते द्वेष पसरवण्याचे काम करत आहेत. त्यासाठीच ते परभणीत आले होते, असं फडणवीस म्हणाले.
या घटनेची न्यायालयीन चौकशी करण्यात येईल, अशी घोषणा आम्ही केली आहे. त्यात जे दोषी आढळतील, त्यांच्यावर कारवाई करण्यात येईल. त्यात जर पोलीस मारहाणीत मृ्त्यू झाल्याचे आढळून आले तर कारवाई करण्यात येईल, असे फडणवीस म्हणाले.
काँग्रेस खासदार राहुल गांधी हे परभणी दौऱ्यावर आले होते. सूर्यवंशी यांच्या कुटुंबीयांची त्यांनी भेट घेतली. त्यानंतर महाराष्ट्रातील सत्ताधाऱ्यांवर आरोप केले. दुसरीकडे शिवसेना नेते आणि मंत्री संजय शिरसाट यांनी राहुल यांच्यावर टीकास्त्र सोडलं. राहुल गांधी हे राजकारण करण्यासाठी आले आहेत. कोण गेलं,कोण राहिलं? यापेक्षा त्यांना घटनेचं पुस्तक घेऊन फिरायचं आहे. आम्ही घटना मानणारे आहोत, असं त्यांना दाखवायचं आहे, अशी टीका शिरसाट यांनी केली.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.