
मुंबई : आगामी स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राजकीय घडामोडींना वेग आला आहे. मुंबई आणि जवळच्या शहरातील महापालिकांच्या निवडणुकींकडे सर्वांचं लक्ष असणार आहे. या निवडणुकीत महायुती आणि महाविकास आघाडी काय भूमिका घेणार, याकडे साऱ्यांच्या नजरा आहेत. या निवडणुकीत किंगमेकर ठरण्याची शक्यता असणाऱ्या मनसे पक्षाच्या भूमिकेकडेही सर्वांचं विशेष लक्ष आहे. आगामी निवडणुकीत राज आणि उद्धव ठाकरे यांनी एकत्र यावे, अशी इच्छा काही लोकांकडून व्यक्त केली जात आहे. यादरम्यान, मनसेकडून अधूनमधून प्रस्ताव येत असल्याचं विधान माजी मंत्री, आमदार आदित्य ठाकरे यांनी केलं आहे. आदित्य ठाकरे यांच्या वक्तव्याने राजकीय चर्चांना उधाण आलं आहे.
माजी मंत्री आदित्य ठाकरे यांनी आज 'कॉफी विथ सकाळ'च्या शोमध्ये हजेरी लावली. या शोमध्ये आदित्य ठाकरे यांनी मोठं वक्तव्य केलं. 'तुम्ही आम्हाला कितीही पाडायचा आणि फोडायचा प्रयत्न करत राहा. आम्ही महाराष्ट्रासाठी लढत राहणार आहे. तुम्ही कितीही वार केला तरी आमच्या महाराष्ट्राचा आवाज रोखणार नाही. जोपर्यंत महाराष्ट्राच्या हिताचे बोलत नाहीत. तोपर्यंत आम्ही समजोता करता येऊ शकत नाही. आम्हाला कधीकधी त्यांच्या एकत्र येण्याची ऑफर दिली जाते. मात्र, त्यांच्याकडून महाराष्ट्राच्या हिताचा विचार होत नाही. लोकशाहीचा विचार होत नाही. जो देश, संविधान जपेल, त्यांच्यासोबत आम्ही जाऊ, असे ठाकरेंनी सांगितलं.
आगामी निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर आदित्य ठाकरे यांनी मोठं वक्तव्य केलं आहे. राज आणि उद्धव ठाकरे बंधू हे १९ ते २० वर्षांपूर्वी वेगळे झाले होते. त्यांनंतर आता दोन्ही बंधू एकत्र येतात का, हे पाहावे लागेल. आदित्य ठाकरे यांच्या वक्तव्यामुळे चर्चांना सुरुवात झाली आहे.
पाच-दहा वर्षांपूर्वी देखील उद्धव ठाकरेंनी टाळीसाठी हात पुढे केला होता. त्यानंतर आता आदित्य ठाकरेंनी पुन्हा मनसे आणि शिवसेनेबाबत मोठं वक्तव्य केलंय. यावरून ठाकरे गटाची भाजपसोबत जुळवून घेण्याची खेळी देखील अपयशी ठरत असल्याचंही बोललं जात आहे. 'आमची मैत्री आहे. पण युती नाही, असं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी काही दिवसांपूर्वी ठाकरे गटाबाबत म्हटलं होतं.
राज ठाकरे यांनी गेल्या काही दिवसांत कार्यकर्त्यांना केलेल्या मार्गदर्शनात उद्धव ठाकरे यांच्यावर टीका केली नव्हती. त्यामुळे राज ठाकरे हे उद्धव ठाकरेंची शिवसेना आणि मनसेच्या युतीबाबत सकारात्मक असल्याचं म्हटलं जात आहे. माहिम विधानसभा मतदारसंघातील अमित ठाकरे यांचा पराभव राज ठाकरेंच्या जिव्हारी लागल्याचं बोललं जात आहे. त्यावेळी भाजपने राज ठाकरेंना व्यवस्थित साथ दिली नव्हती, अशी चर्चा आहे. त्यामुळे राज ठाकरे आणि उद्धव ठाकरेंना एकत्र येण्याच्या चर्चांना उधाण आलं आहे.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.