
विजय पाटील, साम टीव्ही
जुन्या भांडणाचा राग मनात धरून एका पैलवानाची निर्घृण हत्या करण्यात आलीय. ही धक्कादायक घटना सांगलीच्या खानापूर तालुक्यातील, कार्वे येथील विटा - तासगांव रस्त्यावरील पुलावर घडलीय. बुधवारी मध्यरात्री साडेबाराच्या सुमारास त्याच्यावर तलवारीने वार करून हत्या केल्याची माहिती आहे. राहूल गणपती जाधव (वय वर्ष ३५) असे मृत व्यक्तीचे नाव असून, या हत्येनंतर परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.
या प्रकरणी मृत राहूल यांचे भाऊ राजाराम जाधव यांनी विटा पोलिसांत तक्रार दाखल केली आहे. या हत्या प्रकरणात माणिक संभाजी परीट, गजानान गोपीनाथ शिंदे, अमृत शहाजी माळी, नयन रंगलाल धाबी, प्रफुल्ल कांबळे, रोहन रघुनाथ जाधव आणि नितीन पांडुरंग जाधव अशी संशयितांची नावे आहेत. तर, माणिक परीट, गजानन शिंदे आणि नयन धाबी या तीन संशयितांना ताब्यात घेतल्याचं पोलिसांनी सांगितले.
राहुल जाधव आणि संशयित आरोपी यांच्यात जुन्या भांडणावरून खटके उडाले होते. याच गोष्टीचा राग मनामध्ये धरून संशयितांनी इतरांना बोलावून घेतलं. नंतर राहुल जाधव याच्या चारचाकीच्या काचा फोडल्या. राहूल याला बाहेर ओढून घेत, संशयित हल्लेखोरांनी त्याच्यावर तलवार आणि हॉकी स्टिकने डोक्यात आणि अंगावर सपासप वार केले. काही क्षणातच राहूल याचा मृत्यू झाला. या घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी धाव घेत तपासाला सुरूवात केलीय.
घडलेल्या घटनेनंतर, उपविभागीय पोलिस अधिकारी विपुल पाटील, पोलिस निरीक्षक धनंजय फडतरे यांनी पोलिस फौजफाट्यासह घटनास्थळी धाव घेतली. घटनास्थळाचा पोलिसांनी पंचनामा केला. तसेच संशयित आरोपींवर गुन्हा दाखल केला. या प्रकरणी हल्लेखोरांचा शोध सुरू असून, अधिक तपास पोलिस उपनिरीक्षक व्ही. जे. येळेकर करीत आहेत. या प्रकरणानंतर परिसरात भीतीचे वातावरण पसरले आहे.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.