रस्त्याअभावी महिलेचा मृत्यू; जिंतूर तालुक्यातील पिंप्राळावासीयांची दैना थांबेना

जिंतूर तालुक्यातील पिंप्राळा या आदिवासी लोकवस्तीच्या गावाला मुख्य रस्त्याला जोडण्यासाठी तीनपर्यंत पक्का डांबरी रस्ता मिळावा या मुख्य मागणीसाठी ग्रामवासीयांनी जिल्हा प्रशासन, लोकप्रतिनिधी यांना अनेकदा कागदोपत्री त्यांच्या भावना पोहचविल्या.
चिखलात फसलेल्या जीपला बाहेर काढताना मयत महिलेचे नातेवाईक
चिखलात फसलेल्या जीपला बाहेर काढताना मयत महिलेचे नातेवाईक
Published On

राजाभाऊ नगरकर

जिंतूर ( जिल्हा परभणी ) : रस्त्याअभावी आजारी वृध्द महिलेला उपचारासाठी नेण्यात विलंब झाल्याने तालुक्यातील पिंप्राळा येथील एका वृध्देचा रविवारी (ता.११) मृत्यू झाला.

जिंतूर तालुक्यातील पिंप्राळा या आदिवासी लोकवस्तीच्या गावाला मुख्य रस्त्याला जोडण्यासाठी तीनपर्यंत पक्का डांबरी रस्ता मिळावा या मुख्य मागणीसाठी ग्रामवासीयांनी जिल्हा प्रशासन, लोकप्रतिनिधी यांना अनेकदा कागदोपत्री त्यांच्या भावना पोहचविल्या. परंतु या मागणीला कागदी घोड्यांच्या टाचेत अडकवुन ठेवले जात आहे. परिणामी या गावातील आणखी एका वृध्द आजीला रस्त्याअभावी तिचा प्राण गमवावा लागला आहे.

मागच्या आठवड्यात गावातील एका गरोदर मातेला माळरानातील चिखलाचा रस्ता तुडवत तीन किलोमीटर पायी चालत यावे लागले. या घटनेने संपूर्ण जिल्हा आवाक् झाला होता. अजूनही त्या घटनेची चर्चा सुरुच असताना याच गावातील पार्वतीबाई महादु ढाकरे या पासष्ट वर्षीय वृध्द महिलेला शुक्रवारी (ता. नऊ) रोजी रात्री झोपेत असताना अर्धांगवायुचा झटका आला. परंतु दोन दिवस सारखा पाऊस सुरु असल्याने गावात वाहन येणे शक्य नव्हते. त्यामुळे उपचारासाठी उशीर झाला होता.

हेही वाचा - चोहूबाजूने तीन ते चार फुट पाणी साचल्याने गावातील प्रकाश कदम, शिवाजी पुयड, नागनाथ तोकलवाड, विनय शिंदेसह गावकऱ्यांनी रेस्क्यू आॅपरेशन राबवत झाडावरील मनिष यांना सुरक्षितरित्या बाहेर काढले

तरीही गावातील खाजगी जीप चालक भीमराव ढाकरे यांनी मोठ्या प्रयत्नाने गावातील तरुण मुलांना सोबत घेऊन गाडी चिखलातून तीन किलोमीटर बाहेर काढत जिंतूर येथे पोचते केले. तेथून पुढे सुलतानपुर (जि. बुलडाणा) येथे खाजगी दवाखाना गाठला परंतु तिथे पोहचण्यासाठी खुप उशीर झाल्याने डॉक्टरांनी सदरील महिलेचा मेंदू काळा पडल्याचे सांगितले. त्यामुळे पुन्हा परतीचा प्रवास करुन पार्वतीबाईला गावी आणावे लागले. या अवस्थेतच रविवारी (ता. ११) सकाळी त्यांचा मृत्यु झाला.

या घटनेमुळे गावकरी तीव्र संताप व्यक्त करत आहेत. पक्क्या रस्त्याच्या मागणीसाठी दोन जुलै रोजी ग्रामस्थांच्या आंदोलनाचेवेळी आठ दिवसांत रस्त्याचे भूमिपूजन करण्याचे आश्वासन स्थानिक प्रशासन व संबंधित यंत्रणेतर्फे देण्यात आले. ते कुठेतरी अडून बसले असल्याने गावकरी लवकरच पुन्हा व्यापक आंदोलन उभारण्याच्या विचारात दिसत आहे.

संपादन- प्रल्हाद कांबळे

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com