आर्वी येथे ट्रकच्या धडकेत १५ वर्षीय विद्यार्थिनीचा मृत्यू
आईसमोरच घडलेल्या घटनेने परिसरात शोककळा
निष्काळजी वाहनचालकाविरोधात गुन्हा दाखल
शहरातील अवजड वाहनांच्या प्रवेशावर नागरिकांचा आक्षेप
चेतन व्यास, वर्धा
राज्यात रस्ते अपघाताचे प्रमाण दिवसेंदिवस वाढत आहे. अशातच वर्धा जिल्ह्याच्या आर्वी येथे शिकवणीला जात असलेल्या विद्यार्थिनीला तिच्या आईसमोरच ट्रकने चिरडले. यात विद्यार्थिनीचा जागीच मृत्यू झाला. हा भयावह अपघात आर्वीच्या शेतकरी जिनिंग प्रेसिंग फॅक्टरीजवळ झाला. या प्रकरणी आर्वी पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. विभूती उर्फ वाणी विकास डागा (१५) असे मृतक मुलीचे नाव आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, आर्वीच्या वाठोडा पुनर्वसन येथील रहिवासी वाणी ही घरून सायकलने साईनगर येथे शिकवणीला जात होती. ती माउंट कारमेल शाळेत नववीच्या वर्गात शिक्षण घेत होती. ट्रक चालकाने निष्काळजीपणे ट्रक चालवून जबर धडक दिली. यात ती गंभीर जखमी झाली. तिला तातडीने उपजिल्हा रुग्णालयात दाखल केले असता, डॉक्टरांनी मृत घोषित केले.
शिकवणीला जात असलेल्या विभूती उर्फ वाणी डागा हिच्या सायकलला ट्रकने जोरदार धडक दिल्यानंतर जखमी वाणीचा उपचारार्थ मृत्यू झाला. या घटनेने अख्खे गाव सुन्न पडले असून वाणीच्या निधनाने गावात शोककळा पसरली. घटनेनंतर शहरात अवजड वाहनांना प्रवेश कसा दिला, याबाबत आता प्रश्नचिन्ह उपस्थित केले जात असून याकडे लक्ष देण्याची मागणी नागरिकांमधून केली जात आहे. पोलीस या घटनेचा पुढील तपास करत आहेत.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.