स्वाभिमानी शेतकरी संघटना महाविकास आघाडीतून बाहेर; राजू शेट्टींची मोठी घोषणा

तिन्ही पक्षांतील नेत्यांची दिल्लीत भूमिका वेगळी दिसते. मुख्यमंत्री निवडीच्यावेळी सूचक म्हणून मी चालतो, पण शेतकऱ्यांच्या बाबतीत निर्णय घेताना साधं विचारलं देखील जात नाही, अशी खंत देखील त्यांनी यावेळी व्यक्त केली.
Raju Shetti
Raju ShettiSaam TV
Published On

कोल्हापूर : स्वाभिमानी शेतकरी संघटना यापुढे कोणत्याही पक्षासोबत जाणार नाही. सर्वच पक्षाकडून समान वागणूक मिळाली आहे. शेतकऱ्यांचे प्रश्न सोडवण्यात महाविकास आघाडी आणि केंद्र सरकार अपयशी ठरल्याचा आरोप करत आज आपण महाविकास आघाडी सरकारमधून बाहेर पडत असल्याची घोषणा स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे अध्यक्ष राजू शेट्टी (Raju Shetty) यांनी केली आहे. ते आज कोल्हापुरात (Kolhapur) राज्य कार्यकारणीच्या बैठकीत बोलत होते.

कार्यकारणीत ठरल्याप्रमाणे १ मे रोजी गाव सभेत शेतकऱ्यांच्या विविध प्रश्नांवर गाव ठराव करून घ्यायचा आहे. गावातल्या शेतकऱ्यांच्या मागणीवर संसदेत ठराव करायला भाग पाडू, मूलभूत अधिकार म्हणून शेतकऱ्यांना दिवसा वीज मिळावी यासाठी देखील गाव सभेत ठराव घ्या. गावागावात जाऊन हुंकार यात्रा काढली जाणार असल्याची घोषणाही त्यांनी यावेळी केली.

ते म्हणाले, केंद्र आणि राज्य सरकारने (Central and State Government) उपेक्षीत नागरिकांना उद्ध्वस्त केलं आहे. महाविकास आघाडी सरकारमध्ये राहायचं की नाही याचा निर्णय आता घ्यायचा आहे. निवडणूक लढवता यावी म्हणून आपण चळवळ उभी केली नाही तर, चळवळ टिकावी म्हणून आपण निवडणुकीचा मार्ग स्वीकारला असल्याचं ते म्हणाले.

एनडीएला पाठिंबा देण्याचा निर्णय का घेतला तर, घोटाळा झाल्याचे वातावरण तयार झाले होते अशा वेळी सर्वसामान्य नागरिकांचे मत झाले होते की, एक स्वछ सरकार पाहिजे, काळा पैसा भारतात आणणारे कुणीतरी पाहिजे म्हणून आम्ही गोपीनाथ मुंडे यांच्या मध्यस्थीने आम्ही NDAमध्ये सहभागी झालो होतो असं स्पष्टीकरण त्यांनी यावेळी दिलं.

तसंच त्यावेळी आम्ही मोदी (Narendra Modi) यांना तुम्ही कोणत्या मुद्द्यावर निवडणूक लढवणार आहात हे विचारलं होतं, त्यावेळी मोदी यांनी विकासाच्या मुद्द्यावर निवडणूक लढवणार असं सांगितलं होतं. त्यावेळी स्वामिनाथन समितीच्या शिफारशी लागू करण्याचं आश्वासन दिलं तर शेतकरी तुमच्याबरोबर येईल असं म्हणाले होते.

Raju Shetti
संजय राऊत यांच्यानंतर पुढचा नंबर कोणाचा?; चंद्रकांत पाटील म्हणाले...

महाराष्ट्रातल्या शेतकऱ्यांना न्याय देण्यासाठी हे सरकार आलं होतं. साताऱ्यातल्या सभेत पवार (Sharad Pawar) साहेब यांनी भिजत भिजत सांगितलं होतं. पवार साहेब भिजले पण त्यात राज्यभरातील शेतकरी विरघळून गेला. तिन्ही पक्षातील नेत्यांची दिल्लीत भूमिका वेगळी दिसते, मुख्यमंत्री निवडीच्या वेळी सूचक म्हणून मी चालतो, पण शेतकऱ्यांच्या बाबतीत निर्णय घेताना साधं विचारलं देखील जात नाही अशी खंत देखील त्यांनी यावेळी व्यक्त केली.

Edited By - Jagdish Patil

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com