Solapur Crime News Update : सहा जणांनी रस्त्यात गाठून एका व्यक्तीचा निर्घृण खून केल्याची धक्कादायक घटना सोलापूरमध्ये घडली आहे. भरदुपारी ५ ते ६ जणांनी दुचाकीवरून निघालेल्या व्यक्तीला अडवले आणि त्याला काठ्या, कोयते तसेच दगडाने ठेचून ठार केले. मृत व्यक्तीचे नाव सुरेश श्रीराम असे आहे. मागील ७ ते ८ वर्षांपासून दोन गटांत वाद सुरू होता, त्यातूनच आरोपींनी सुरेशची हत्या केली. आरोपींनी सुरेश श्रीराम याच्यावर काठी, कोयता आणि दगडाने तब्बल ३५ वार केले. हा हल्ला इतका भयंकर आणि हादरवणारा होता की, मृत व्यक्तीचा चेहरा ओळखता येत नव्हता. डोके चेंदामेंदा झाले होते आणि घटनास्थळावर सर्वत्र रक्ताचा सडा पडला होता.
या भयंकर हल्ल्यानंतर सुरेश श्रीराम याने रस्त्यावरच प्राण सोडले. त्याच्या मृत्यूनंतरही आरोपींनी मृतदेहावर एकापाठोपाठ एक वार केले. त्याच्या डोक्यावर जोरात दगड मारून चेंदामेंदा करण्यात आला. रस्त्यावरच हे भयंकर हत्याकांड सुरू होते, हे पाहून जेलरोड परिसरात भीतीचे वातावरण पसरले होते. पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत पंचनामा केला आणि तात्काळ तपासाला सुरुवात केली. या घटनेचे थरकाप उडवणारे सीसीटीव्ही फुटेज समोर आले आहे. पोलिसांनी आतापर्यंत ५ आरोपींना ताब्यात घेतले असून त्यांच्यावर गुन्हा दाखल केला आहे. आरोपी आणि मृत सुरेश या दोघांवरही आधीपासून अनेक गुन्हे दाखल असल्याची माहिती सोलापूर पोलीस उपायुक्तांनी दिली.
सोलापूरमधील जेलरोड पोलीस स्टेशनच्या हद्दीत एका व्यक्तीची हत्या झाल्याची घटना आज घडली. ३५ वर्षीय सुरेश श्रीराम याला रस्त्यात अडवून पाच ते सहा जणांनी कोयते, काठ्या आणि दगडाने ठेचून मारले. ही घटना घडल्यानंतर तात्काळ जेलरोड पोलीस अधिकाऱ्यांनी घटनास्थळी धाव घेत पंचनामा केला. त्यानंतर जेलरोड पोलीस आणि गुन्हे शाखेची पथके आरोपींच्या शोधात रवाना झाली. घटना घडल्यानंतर अवघ्या तासभरात सहापैकी ५ जणांना अटक करण्यात आली आहे. सहाव्या आरोपीचा शोध घेतला जात असून त्यालाही लवकरच अटक केली जाईल, असे सोलापूरचे पोलीस उपायुक्त विजय कबाडे यांनी सांगितले.
मृत सुरेश श्रीराम आणि आरोपी यांच्यात वराह पालनावरून गेल्या काही वर्षांपासून वारंवार वाद होत होते. २०१७ मध्ये आरोपींची काही वराहे मृत व्यक्तीने विष देऊन मारली होती, तेव्हापासून या दोन्ही गटांत शत्रुत्व निर्माण झाले होते. २०२० मध्ये त्यांच्यावर मारामारीचा गुन्हाही दाखल झाला होता. त्यानंतर काही काळ शांतता होती, मात्र आज जुन्या वादाच्या कारणावरून सुरेश श्रीराम याची भररस्त्यात हत्या करण्यात आल्याचे विजय कबाडे यांनी स्पष्ट केले.
मृत सुरेश श्रीराम याच्यावर आतापर्यंत १० पेक्षा जास्त गुन्हे दाखल असल्याचे तपासात समोर आले आहे. यामध्ये चोरी, मारामारी आणि दरोड्यासारख्या गुन्ह्यांचा समावेश आहे. तसेच २ ते ३ आरोपींवरही गुन्हे दाखल असून त्याचा तपास केला जात आहे. सुरेश श्रीराम याची निर्घृण हत्या झाल्याने सोलापूरमध्ये तणावाचे वातावरण आहे. या प्रकरणी पोलिसांकडून सखोल तपास केला जात असून, कुणीही कायदा हातात घेऊ नये, असे आवाहन उपायुक्तांनी केले आहे.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.