
सासरच्या जाचाला कंटाळून विवाहितेने आत्महत्या केल्याची घटना शहापूरमध्ये घडली. शहापूर तालुक्यातील किन्हवली पोलिस ठाण्याच्या हद्दीत ही घटना घडली. १ मे रोजीच तिचे लग्न झाले होते. लग्नाच्या ३ महिन्यातच विवाहितेने टोकाचे पाऊल उचलत गळफास लावून आत्महत्या केली. या घटनेमुळे शहापूरमध्ये खळबळ उडाली. या प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलिसांनी आत्महत्या केलेल्या विवाहितेच्या नवऱ्याला अटक केली. पोलिस सध्या तपास करत आहेत.
मिळालेल्या माहितीनुसार, शहापूर तालुक्यातील खरीवली गावात ही घटना घडली. जमिन घेण्यासाठी माहेरून २० लाख रुपये घेऊन ये यासाठी विवाहितेचा सासरच्यांकडून छळ केला जात होता. नवऱ्याकडून सतत मारहाण केली जात होती. या त्रासाला कंटाळून विवाहितेने राहत्या घरी गळफास लावून आत्महत्या केली. छकुली कैलास हरड असं आत्महत्या केलेल्या विवाहितेचे नाव आहे. या घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत तपास सुरू केला.किन्हवली पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून छकुलीच्या नवऱ्याला पोलिसांनी अटक केली.
मुरबाड तालुक्यातील धसई विभागातील पिंपळघर गावातील छकूली बाळकृष्ण केदारचे लग्न शहापूर तालुक्यातील खरीवली गावातील रहिवासी कैलास हरड याच्यासोबत १ मे २०२५ मध्ये झाला होता. जमिन घेण्यासाठी छकुलीला नेहमी तिचा नवरा तू तुझ्या बापाकडून २० लाख रुपये घेऊन ये अशी मागणी करत होता. पैशांसाठी तो तिला मारहाण देखील करत होता. छकुली तिच्या आई-वडिलांना नेहमी फोन करून हे सांगत होती.
छकुलीच्या आईने सांगितले की, 'तिने सासरच्या मंडळींना समजून सांगितले होते की माझे वडील एक वडापावची गाडी चालवतात त्यांच्याकडे एवढे पैसे कुठून येतील. पण पैशांसाठी ते तिला सतत मारहाण करत होते.' या प्रकरणी छकुलीच्या आईने दिलेल्या तक्रारीनंतर किन्हवली पोलिसांनी तिचा पती कैलासविरोधात गुन्हा दाखल केला. पोलिसांनी त्याला अटक केली आहे. किन्हवली पोलिस पुढील तपास करत आहेत.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.