Political News : सत्यजीत तांबे मुख्यमंत्री-उपमुख्यमंत्र्यांच्या भेटीला; पुणे-नाशिक रेल्वेमार्ग संगमनेर तालुक्यातून नेण्याची केली मागणी

Satyajeet Tambe Patil : त्यामुळे आमच्या भागासाठी हा महत्त्वाचा रेल्वेमार्ग आहे. परिणामी राज्य सरकारने मूळ आराखड्यात बदल न करता हा मार्ग संगमनेरवरूनच न्यावा, अशी मागणी आ. तांबे यांनी केली आहे.
Political News
Political News Saam Tv
Published On

Sangamner News :

पुणे-नाशिक सेमी हायस्पीड रेल्वेमार्गाच्या मूळ आराखड्यात बदल करण्यात आलाय. हा मार्ग आता संगमनेर तालुक्याऐवजी शिर्डीकडे वळवण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतलाय. या निर्णयामुळे संगमनेरकरांमध्ये प्रचंड नाराजी असून आमदार सत्यजीत तांबे यांनी याच असंतोषाचा वाचा फोडली आहे.

या मार्गाच्या मूळ आराखड्यानुसार तो संगमनेर तालुक्यातून जाणं अपेक्षित असताना ऐन वेळी हा बदल का केला, असा प्रश्न उपस्थित करत आ. तांबे यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली. रेल्वेमार्गाच्या मूळ आराखड्यात कोणताही बदल न करता तो संगमनेरमधूनच नेण्यात यावा, अशी आग्रही मागणी करणारं पत्र त्यांनी या वेळी दिलं.

पुणे-नाशिक या दोन महानगरांना जोडणारा रेल्वेमार्ग महारेलच्या माध्यमातून उभारण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला. हा मार्ग संगमनेर तालुक्यातून जाण्याचं नियोजन झालं होतं. या रेल्वेमार्गामुळे पुण्यातील चाकण, भोसरी आणि नाशिक जिल्ह्यातील सिन्नर आणि मुसळगाव या चार औद्योगिक वसाहती जोडल्या जाणार आहेत. त्यामुळे संगमनेर तालुक्यातील तरुणांना रोजगाराच्या संधी अधिक प्रमाणात उपलब्ध होण्याची शक्यता होती.

तसंच संगमनेरमधील फळे, भाजीपाला, धान्य हा माल थेट महानगरांमध्ये अधिक जलद पोहोचला असता. तब्बल तीन दशकांनी संगमनेर देशाच्या रेल्वेच्या नकाशावर येणार असल्याने आणि त्यामुळे तालुक्यात समृद्धी येणार असल्याने संगमनेरकरांनी या रेल्वेमार्गाचं स्वागत केलं, असं आ. तांबे यांनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या निदर्शनास आणून दिलं.

राज्य सरकारने महारेलच्या माध्यमातून सिन्नर व संगमनेर तालुक्यात भूसंपादनही केले आहे. एकट्या संगमनेरमधून १०३ खरेदीखतांद्वारे थेट शेतकऱ्यांकडून जमिनी खरेदी करण्यात आल्या. असं असताना अचानक या मार्गात बदल करत तो संगमनेरऐवजी राजगुरूनगरवरून थेट शिर्डीकडे वळवण्याचा निर्णय का घेतला, याबाबतही आ. तांबे यांनी उपमुख्यमंत्र्यांसोबत चर्चा केली.

या निर्णयामुळे संगमनेरकरांचं मोठं नुकसान होणार असून जनतेत प्रचंड रोषाचं वातावरण आहे, असं आ. तांबे यांनी मुख्यमंत्री व उपमुख्यमंत्री यांच्या निदर्शनास आणून दिलं. शिर्डीकडे जाणाऱ्या अनेक रेल्वेगाड्या याआधीच धावत आहेत. स्वेच्छेने शिर्डीला जाणाऱ्या भाविकांसाठी रेल्वेची सोय आहे.

नाशिक-शिर्डी मार्ग एकमेकांशी जोडलेले आहेत. मात्र अद्यापही रेल्वेच्या नकाशावर संगमनेर दिसत नाहीये. त्यामुळे आमच्या भागासाठी हा महत्त्वाचा रेल्वेमार्ग आहे. परिणामी राज्य सरकारने मूळ आराखड्यात बदल न करता हा मार्ग संगमनेरवरूनच न्यावा, अशी मागणी आ. तांबे यांनी केली आहे.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com