पालकांनी आपल्या चिमुकल्यांवर बारकाईने लक्ष देणे किती गरजेचे आहे,याचा प्रत्यय आज छत्रपती संभाजीनगर येथील हर्सुल येथे घडलेल्या एका घटनेमुळे आला. केवळ ७ महिन्याच्या चिमुकल्याने काचेचे तुकडे गिळल्यामुळे चिंतेचे वातावरण निर्माण झाले होते. पालकांच्या ही गोष्ट लक्षात येताच चिमुरड्याला नजीकच्या घाटी रूग्णालयात दाखल करण्यात आले. पालकांनी वेळ न घालवता योग्य निर्णय घेतल्यामुळे मुलाचे प्राण वाचवण्यात डॉक्टरांना यश मिळाले आहे.
प्राथमिक तपासात चिमुरड्याच्या अन्ननलिकेत काच नसून एखादी दुसरी वस्तू अडकली असण्याची शक्यता वर्तवली जात होती, त्यासाठी एक्स रे आणि ब्रॉन्कोस्कोपी व इसोफॅगोस्कोपी करण्यात आली त्यात काच आढळली नाही. कदाचित ती वस्तू पोटात गेली असेल अशी शंका आली आणि पोटाचा आणि आतड्याचा सिटिस्कॅन करण्यात आला. त्यात काच पोटात असल्याचे निष्पन्न झाले. यानंतर शल्यचिकित्सक विभागाकडून तातडीचे उपचार सुरू करण्यात आले. काळजीपुर्वक निरिक्षण, व्यवस्थापन आणि वेळेत केलेल्या योग्य त्या काळजीपुर्वक उपचारामुळे ऑपरेशन अधिक गुंतागुंतीचे न होता व्यवस्थित पार पडले.
हा यशस्वी उपचार मा डॉ शिवाजी सु्र्वे यांच्या मार्गदर्शनाखाली बालरोग विभागाच्या प्रमुख डॉ. प्रभा खैरे, पथक प्रमुख डॉ. शिल्पा पवार, डॉ सोनाली पुऱ्हे आणि डॉ अंजली पवार, डॉ प्रशांत. डॉ स्वनिक,गौरव, डॉ शर्मिन डॉ शिधांत तसेच शल्यचिकित्सक विभागाच्या प्रमुख डॉ सरोजिनी जाधव, डॉ अरिफ काझी, डॉ अमोल, डॉ शाम, डॉ आकांशा व त्यांचे पथक यांचे महत्त्वपूर्ण मार्गदर्शन लाभले. बालरोग विभाग, शल्यचिकित्सक विभाग आणि पालकांच्या विश्वासामुळे चिमुकल्याचे प्राण वाचवणे शक्य झाले.
या घटनेवरून डॉक्टरांनी पालकांना आवाहन केले आहे की, मुलांवर बारकाईने लक्ष असायला हवे.मुलाच्या हातात काचेच्या वस्तू, नाणी, मणी इ. बारीकसारीक वस्तू हाताला लागणार नाही याची काळजी घ्यावी. असा प्रसंग घडल्यास मुलाने वस्तू गिळल्याचा संशय आल्यास कोणतेही घरगुती प्रयोग न करता, तातडीने रूग्णालयात नेऊन डॉक्टरांचा सल्ला घ्यावा अशा प्रसंगात हलगर्जीपणा केल्यास प्रसंग जीवघेणा ठरू शकतो. असे आवाहन डॉक्टरांनी केले आहे.