नोकरी नाही तर छोकरी नाही....असं गमतीनं म्हटलं जायचं...मात्र आता हे वास्तव ग्रामीण भागातल्या तरुणांसाठी जीवघेणं ठरू लागलंय. एकीकडे नोकरी नसल्यामुळे शेतीवर उदरनिर्वाह करावा लागतोय. दुसरीकडे वय उलटून जात असल्यामुळे मुलींचे नकारावर नकार पचवावे लागत आहेत. लग्न जुळत नाही म्हणून तरुण थेट मृत्यूला कवटाळू लागले आहेत. मराठवाड्यानंतर आता याचं भयाण वास्तव जळगाव जिल्ह्यात समोर आलंय. पोलीस दलाने दिलेल्या गेल्या सहा महिन्यातल्या आकडेवारीनं ही गंभीर सामाजिक समस्या समोर आली आहे.
लग्न जुळत नसल्यानं तरुणांची आत्महत्या
1 जानेवारी 2026 ते 30 जून 2026
जळगाव जिल्ह्यात 443 आत्महत्यांची नोंद
आत्महत्या करणाऱ्यांमध्ये पुरुषांचे प्रमाण 90 टक्के
लग्न जुळत नसल्याने 29 तरुणांची आत्महत्या
383 पुरुष
29 महिला
8 मुले
11 मुली
आत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी पोलिसांनी 12 गुन्हे दाखल केले आहेत. दरम्यान आत्महत्या होण्यामागची कारणे पोलीस अधीक्षकांनी सांगितले आहेत. सामाजिक अपेक्षा, आर्थिक अस्थिरता, वाढते वय आणि वारंवार येणारे नकार यामुळे अनेक तरुण मानसिकदृष्ट्या खचत आहेत. तर महिलांमध्ये कौटुंबिक वाद आणि नैराश्य ही आत्महत्येची प्रमुख कारणे ठरली आहेत. तसेच विद्यार्थ्यांमध्येही कौटुंबिक तणाव, परीक्षेचे दडपण आणि प्रेमप्रकरणांमुळे आत्महत्येच्या घटना समोर आल्या आहेत. त्यामुळे मानसिक आरोग्याचा प्रश्न सर्वच वयोगटांमध्ये गंभीर होत असल्याचे दिसून येत आहे.
जळगाव जिल्ह्यातील ही आकडेवारी केवळ पोलिसांच्या नोंदीपुरती मर्यादित नसून समाजासाठी धोक्याची घंटा आहे. विवाह हा आयुष्याचा एक महत्त्वाचा टप्पा असला तरी तो व्यक्तीच्या अस्तित्वाचे मोजमाप ठरू नये. विवाहाबाबतचा सामाजिक दबाव कमी करणे, मानसिक आरोग्याविषयी जागरूकता वाढवणे आणि अडचणीत असलेल्या तरुणांना वेळेत समुपदेशन आणि भावनिक आधार देण्याची गरज निर्माण झालीय.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.