
माजी आमदार राजन साळवी यांनी ठाकरे गटाची मशाल दूर करत धनुष्यबाण हाती घेतल्यानंतर राजकीय वर्तुळात चांगलीच चर्चा रंगली. पक्षातील उपनेतेपदाचा राजीनामा दिल्यानंतर त्यांनी शिंदे गटात प्रवेश केला. यामुळे कोकणात ठाकरे गटाला खिंडार पडलं असल्याचं बोललं जात आहे.
त्यानंतर कोकणातील ठाकरे गटाचे एकमेव आमदार भास्कर जाधव देखील नाराज असल्याची चर्चा होती. मात्र, 'सध्या आपलं वय पाहता कुठेही जाणार नाही', असं स्पष्टीकरण त्यांनी दिलं. यासगळ्या राजकीय घडामोडींवर ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी प्रतिक्रिया दिली आहे. तसेच भविष्यात भाजप आणि शिंदे एकत्र नसतील, असं भाकीत त्यांनी केलं आहे.
आम्ही खचणारे लोक नाहीत
ठाकरे गटातून नेते, आमदार आणि अनेक पदाधिकारी, कार्यकर्ते राजीनामे देत आहेत. नेते मंडळी ठाकरे गटाची साथ सोडत आहेत, यावर संजय राऊत यांनी प्रतिक्रिया दिली आहे. 'जे पक्ष सोडत आहेत ते पदाधिकारी आहेत. पुढल्या दोन दिवसांत आमची बैठक आहे. काही जणांना आम्ही नव्याने जबाबदार्या देणार आहोत,' असं संजय राऊत म्हणाले.
'आम्ही खचणारे लोक नाही आहोत. जाणारे आहेत त्यांना जावू द्या. सत्ता, पैसा दबाव आहे. काहीतरी अडचणी असतील. जुन्या केसेस काढल्या जात आहेत. काही लोकांची मने कमकुवत झाली आहेत. ज्यांची लढण्याची इच्छाशक्ती संपलेली आहे, ते लोक पक्ष सोडून जात आहेत. मुर्दाड लोक पक्ष सोडून जात आहेत, त्यांना ठेवून तरी करायचं काय?, असं संजय राऊत म्हणालेत.
'एक दिवस एकनाथ शिंदे गटातील एकही आमदार निवडून येणार नाही. २०२९ला चित्र पूर्णपणे बदललेलं असेल. भाजप आणि शिंदे एकत्र नसतील. एकनाथ शिंदेंचं काम झालेलं आहे. त्यांच्यातील एक गट कोकणातल्या एका नेत्याबरोबर जाणार आहे', असा दावा संजय राऊत यांनी केला आहे.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.