
रोहिदास गाडगे, साम टीव्ही
पुणे : खेड तालुक्यातील जऊळुके गावातील एका विवाहित प्रेमी युगुलाने आंबेगाव तालुक्यातील टाकेवाडी येथे डिंभे धरणाच्या कालव्यात उडी मारून आपली जीवनयात्रा संपवली. विवाहबाह्य नात्यातील वादातून हा जीवघेणा निर्णय घेण्यात आल्याची प्राथमिक माहिती समोर येत आहे. प्रेमाचं हे दुःखद रूप पाहून परिसरात खळबळ उडाली असून, दोघांनी पाण्यात उडी घेऊन जलसमाधी घेतल्यानं टाकेवाडीतील कालवा त्यांच्या प्रेमाचा शेवटचा साक्षीदार ठरला.
खेड तालुक्यातील जऊळुके गावातील विवाहित प्रेमी युगुलाने विवाहबाह्य संबंधातील वादातून डिंभे धरणाच्या डाव्या कालव्यात उडी घेऊन आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. ही घटना टाकेवाडी (ता.आंबेगाव) परिसरात घडली असून परिसरात एकच खळबळ उडाली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, संबंधित विवाहित महिला काही दिवसांपूर्वी वादानंतर माहेरी, आंबेगाव तालुक्यातील टाकेवाडी येथे आली होती. काल शनिवारी ती आणि तिचा प्रियकर कालव्याजवळ भेटले. त्यावेळी दोघांमध्ये जोरदार वाद झाला. वादाच्या रागातून पीडित महिलेने थेट कालव्यात उडी मारली. तिला वाचवण्यासाठी तरुणाने देखील पाण्यात उडी घेतली. मात्र, दोघांनाही पोहता न येत असल्यामुळे काही क्षणातच ते दोघंही पाण्यात बुडाले आणि त्यांचा दुर्दैवी अंत झाला.
या घटनेची माहिती मिळताच पोलीस आणि आपत्ती व्यवस्थापन पथक घटनास्थळी दाखल झाले. दोघांचे मृतदेह शोधून बाहेर काढण्यात आले असून पुढील तपास सुरू आहे. दोघेही विवाहित असून त्यांच्यात विवाहबाह्य प्रेमसंबंध होते. या नात्यातील तणावामुळेच वाद झाला आणि अखेर दोघांनी आयुष्य संपवण्याचा निर्णय घेतल्याचं सांगितलं जात आहे. या हृदयद्रावक घटनेमुळे परिसरात शोककळा पसरली आहे. ग्रामस्थ आणि नातेवाईकांमध्ये हळहळ व्यक्त केली जात आहे.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.