

घाम गाळून, कर्ज काढून शेतात रात्रंदिवस राबायचं आणि हातात पीक आल्यावर त्याला कवडीमोल भाव मिळतो... अशी दुर्दैवी परिस्थिती सध्या राज्यातील कांदा उत्पादक शेतकऱ्यांवर आलीय.. संभाजीनगरच्या गंगापूर कृषी उत्पन्न बाजार समितीत कांद्याला फक्त सव्वा रुपया भाव मिळाल्यानं शेतकऱ्यांचा संतापाचा कडेलोट झालाय...
बाजार समितीसमोर संतप्त शेतकऱ्यांनी थेट रस्त्यावर कांदा फेकून देत 'रास्ता रोको' आंदोलन केलं. ही परिस्थिती फक्त संभाजीनगरमधील नाहीय.... राज्यातील ठिकठिकाणच्या कृषी उत्पन्न बाजार समितीत जेव्हा कांद्याचा लिलाव सुरु होतो... तेव्हा व्यापाऱ्यांनी पुकारलेले दर ऐकून शेतकऱ्यांची धुळीत मिळतेय...
सोलापूर बाजारपेठेत कांदा विक्रीसाठी आलेल्या संतोष शिगनारे यांना 602 किलो कांदा विकून 50 पैसे प्रति किलो प्रमाणे 301 रुपये मिळाले... मात्र हमाली आणि वाहतुकीचा 1939 रुपये खर्च आल्यानं तीनशे एक रुपये वजा जाऊन शिगनारेंनाच खिशातून 1538 रुपये द्यावे लागलेत.
बीडच्या देवळातील शेषेराव तोडकर यांनी 12 क्विंटल 87 किलो कांदा विकून 1468 रुपये मिळाले.. मात्र मार्केटमध्ये तोलाई, हमाली असा मिळून 1769 रुपये खर्च आल्यानं तोडकरांना कांदा देऊनही खिशातून 301 रुपये देण्याची वेळ आली. संगमनेरमध्येही कांद्याला अवघा 1 रुपया भाव मिळाल्यानं शेतकरी आक्रमक झाले.
नाफेडक़डून कांद्याची क्विंटलला 1235 रुपये भावाने खरेदी होत होती. मात्र शेतकऱ्यांना एक किलो कांद्यासाठीच १८ ते २२ रुपये उत्पादन खर्च येतो. शेतकऱ्यांच्या आंदोलनानंतर आणि तीव्र संतापानंतर दरवाढ करुन कांदा 1580 रुपये क्विंटलने खरेदी करणार असल्याचं मुख्यमंत्र्यांनी जाहीर केलंय.
कांद्यांला मिळणारा हा दर शेतकऱ्यांची क्रूर चेष्टा आहे...योग्य भाव मिळण्यासाठी सरकार काही ठोस तोडगा काढणार की बळीराजा असाच रस्त्यावर आपला शेतमाल फेकून रोष व्यक्त करत राहणार, हे पाहणं महत्त्वाचं आहे...
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.