अजय सोनवणे
नाशिक : कांद्याला अपेक्षित दर नसल्याने अनेक कांदा उत्पादक शेतकऱ्यानी कांद्याची साठवणूक करून ठेवली आहे. शेतातच चाळ करून कांदा ठेवण्यात आला आहे. दरम्यान निफाड येथे चाळीत ठेवलेला सुमारे ७०० क्विंटल कांदा अज्ञात व्यक्तीने जाळून टाकल्याचे समोर आले आहे. यात आजच्या बाजारभावाप्रमाणे शेतकऱ्याचे सात लाख रुपयांहून अधिकचे नुकसान झाले आहे.
नाशिकच्या निफाड येथील कांदा उत्पादक शेतकरी गोपाळराव संपत गाजरे यांच्या चाळीतील कांदा जाळण्यात आला आहे. गाजरे यांनी पाच लाख रुपये खर्च करत नऊ बिगे म्हणजे साडेचार एकर शेतामध्ये उन्हाळ कांद्याचे पीक घेतले. पीकही जोमदार आले. मात्र कांद्याला अपेक्षित असा बाजार भाव नसल्याने शेतामध्ये चाळ बांधून त्यामध्ये जवळपास ७०० क्विंटल कांदा साठवणूक करून ठेवला होता. चांगला भाव मिळेल त्यावेळी कांदा विक्री करण्याचे नियोजन होते.
सात लाख रुपयांपर्यंत नुकसान
मात्र रविवारी पहाटेच्या सुमारास अज्ञात व्यक्तीने कांद्याची साठवलेली चाळच जाळून टाकली आहे. यामुळे हातातोंडाशी आलेला घास हिरवल्यामुळे शेतकऱ्याचे मोठे आर्थिक नुकसान झाले आहे. कांद्याला आजच्या असलेल्या दरानुसार शेतकऱ्याचे साधारण ७ लाख रुपयांपर्यंत नुकसान झाल्याचा अंदाज आहे. हा प्रकार लक्षात आल्यानंतर शेतकरी गाजरे यांनी निफाड पोलिसात तक्रार दिली आहे.
१२ लाखांचे कर्ज फेडीचा प्रश्न
कांद्याची चाळ जाळल्यामुळे कुटुंबाचा उदरनिर्वाह, मुलांचे शिक्षण, मुलीचे लग्न तसेच घेतलेले सोसायटीचे १२ लाख रुपयांचे कर्ज फेडावे कसे? असा मोठा प्रश्न उभा राहिला आहे. दरम्यान या प्रकरणी निफाड पोलीस ठाण्यात तक्रार देण्यात आली असून अज्ञात व्यक्तीचा शोध घेत संबंधितावर कठोर कारवाई करावी. तसेच शासनाने कर्ज माफ करावे किंवा भरघोस मदत करावी; अशी मागणी कांदा उत्पादक शेतकरी करत आहे.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.