
हिंगोली : महायुतीतील पालकमंत्रिपदावरील वाद चव्हाट्यावर आला आहे. राज्य सरकारने नाशिक आणि रायगडच्या पालकमंत्रिपदाला स्थगिती दिली आहे. दोन जिल्ह्यातील पालकमंत्रिपदाच्या स्थगितीनंतर महायुतीमधील नेत्यांमध्येच आरोप-प्रत्यारोप सुरु झाले आहेत. यादरम्यान, नरहरी झिरवाळ यांनी मी गरीब असल्याने मला गरीब जिल्ह्याचं पालकमंत्रिपद दिल्याचं वक्तव्य केलं होतं. आता याच वक्तव्यावरून मंत्री नरहरी झिरवाळ यांनी घुमजाव केला आहे.
हिंगोलीच्या पालकमंत्रिपदावरून मंत्री नरहरी झिरवाळ यांनी भाष्य केलं होतं. मी गरीब असल्याने हिंगोलीचं पालकमंत्रिपद दिल्याचे त्यांनी म्हटलं होतं. नरहरी झिरवाळ यांच्या वक्तव्यानंतर महायुतीतील इतर पक्षातील नेत्यांनी प्रतिक्रिया दिल्या होत्या. त्यानंतर आता खुद्द नरहरी झिरवाळ यांनी स्पष्टीकरण दिलं आहे. 'हिंगोली जिल्ह्यात काम करण्याची मोठी संधी आहे. ती पूर्ण करण्यासाठी मला जबाबदारी दिली आहे. त्यामुळे मी समाधानी आहे, असं मंत्री झिरवाळ म्हणाले.
पालकमंत्रिपदाच्या बाबतीत तुमच्यावर अन्याय झाला का, या प्रश्नाला उत्तर देताना नरहरी झिरवळ म्हणाले, मी अतिशय समाधानी आहे. मोठ्या घरी काम करायला फार सोपं असतं म्हणतात. मी जिल्ह्यातील सर्व आजी-माजी आमदारांना सोबत घेऊन काम करणार आहे, असे झिरवाळ म्हणाले आहेत. साम टीव्हीने बातमी दाखवताच मंत्री नरहरी झिरवाळ यांनी स्पष्टीकरण दिलं आहे. मी मिश्किलपणे टिप्पणी केल्याचंही झिरवाळ यांनी सांगितले.
मंत्री नरहरी झिरवाळ यांच्या वक्तव्यावर भाष्य करताना मंत्री उदय सामंत म्हणाले, ' मागच्या वेळेस मी देखील महाराष्ट्रातील सर्वात छोट्या जिल्ह्याचा म्हणजेच सिंधुदुर्ग जिल्ह्याचा पालकमंत्री होतो. मी देखील असंच म्हणायचं का? पालकमंत्री म्हणून विकासात्मक जनतेचं देणं लागतो. त्यामुळे ते त्या जिल्ह्यात नाविन्यपूर्ण आणि विकासात्मक काय आहे? ते भाग्य आपल्या नशिबी आलं, असं समजून कामाला सुरुवात करायची, अशी प्रतिक्रिया झिरवाळ यांच्या वक्तव्यावर उदय सामंत यांनी दिली आहे.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.