सागर निकवाडे
नंदुरबार : सातपुड्याच्या डोंगर रांगांमध्ये विजेचा लपंडाव कायमचा झाला आहे. यातच जिल्ह्यात वादळी वाऱ्याचा तडाखा बसल्याने लक्कडकोट परिसरात दोन दिवसांपासून वीज नाही. एकीकडे विजेचा लपंडाव तर दुसरीकडे पिण्याच्या पाण्यासाठीचा संघर्ष सुरु आहे. यात या भागातील महिलांना तासतास वाया घालावे लागत आहे. डोंगराळ दुर्गम भागात हातपंप खराब असल्याने मोठी समस्या निर्माण झाली आहे.
सातपुड्याच्या दुर्गम भागातील गावांमध्ये विजेचा लपंडाव नेहमीचा झाला आहे. गेल्या दोन दिवसापासून वादळी वाऱ्यामुळे शहादा तालुक्यातील लक्कडकोट या परिसरातील विद्युत पुरवठा खंडित झाला आहे. विद्युत पुरवठा खंडित असल्याने गाव आणि पाड्यात नागरिकांना पाण्यासाठी वणवण करावी लागत आहे. गाव परिसरात असलेल्या पाच हातपंपांपैकी एकच हातपंप सुरू असल्याने महिलांना पाण्यासाठी तासनतास बसून राहावे लागत असल्याने डोंगराळ भागातील हातपंपांची दुरुस्ती करण्याची मागणी नागरिकांनी केली आहे.
प्रशासनाचे दुर्लक्ष
एकीकडे जिल्हा प्रशासन पाणीटंचाई निवारणासाठी केलेल्या आराखड्यांचा गाजावाजा करत आहे. तर दुसरीकडे दुर्गम भागातील हातपंप दुरुस्तीकडे दुर्लक्ष का केले जात आहे? असाही प्रश्न या निमित्ताने समोर येत आहे. काही ठिकाणी पाणी उपलब्ध असूनही फक्त हातपंप खराब असल्याने नागरिकांना पाण्यासाठी पायपीट करावी लागत असल्याचेही चित्र सातपुड्याच्या डोंगर रांगांमध्ये पाहण्यास मिळत आहे.
पाण्यासाठी वणवण कायम
नंदुरबार सारख्या दुर्गम भागात पाणी टंचाईची समस्या हि कायमची आहे. शहादा, अक्कलकुवा, अक्राणी या भागात पाणी टंचाई जाणवत आहेत. यामुळे या भागातील नागरिक व महिलांना पाण्यासाठी वणवण करावी लागत असते. यात विजेची समस्या निर्माण झाल्याने ग्रामस्थांना अधिक त्रास जाणवत आहे.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.