सागर निकवाडे
नंदुरबार : नंदुरबार जिल्हा परिषद अंतर्गत असलेल्या प्राथमिक शिक्षणाच्या जिल्हा अंतर्गत बदल्यांची प्रक्रिया गेल्या १२ सप्टेंबरला पार पडली. या प्रक्रियेत शिक्षकांच्या बदल्या झाल्यानंतर नवीन शिक्षक आलेले नाही. यामुळे विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होत असून शाळेला शिक्षक मिळावेत; या मागणीसाठी आज विद्यार्थ्यांनी घेत जिल्हाधिकारी कार्यालयात धडक दिली आहे.
नंदुरबार जिल्ह्यात गेल्या १२ सप्टेंबर रोजी जिल्हा परिषद शाळेतील प्राथमिक शिक्षकांच्या जिल्हा अंतर्गत बदल्या झाल्या होत्या. मात्र, अक्कलकुवा तालुक्यातील अतिदुर्गम भागात असलेल्या मांडवा केंद्र आणि वडफळी केंद्रासह नर्मदा पट्ट्यात असलेल्या जिल्हा परिषदेच्या शाळांमधून शिक्षकांच्या बदल्या झाल्यानंतर आजपर्यंत २५ दिवसांहून अधिक काळ उलटला; तरी या परिसरातील १५ जिल्हा परिषदेच्या प्राथमिक शाळांना शिक्षक मिळालेले नाहीत.
२५ दिवसांपासून शाळा शिक्षकांविना सुरु
दरम्यान परिसरातील १५ जिल्हा परिषदेच्या शाळांना शिक्षक नसल्यामुळे तिथल्या गोरगरीब आदिवासी विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक नुकसान होत आहे. मागील २५ दिवसांपासून शाळा शिक्षकांविना सुरु असून दुर्गम भागातील आदिवासी विद्यार्थी थेट जिल्हाधिकारी यांना निवेदन देण्यासाठी नंदुरबार येथे आले. जिल्हाधिकारी कार्यालयात आलेल्या विद्यार्थ्यांनी जिल्हाधिकारी यांची भेट घेतली आहे.
जिल्हाधिकारी यांचे विद्यार्थ्यांना आश्वासन
या समस्येवर तोडगा काढण्यासाठी दुर्गम भागातील आदिवासी विद्यार्थी थेट नंदुरबार येथे आले. त्यांनी जिल्हाधिकारी डॉ. मिताली शेट्टी यांची भेट घेऊन त्यांना या संदर्भात निवेदन दिले. विद्यार्थ्यांची मागणी ऐकून घेतल्यानंतर जिल्हाधिकारी डॉ. मिताली शेट्टी यांनी या प्रश्नाची दखल घेत विद्यार्थ्यांना येणाऱ्या दोन दिवसांत प्रत्येक शाळेला शिक्षक मिळणार यासाठी प्रशासन तात्काळ पाऊले उचलेल, असे आश्वासन दिले आहे.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.