सागर निकवाडे
नंदुरबार : नंदुरबार जिल्ह्यात युरिया खताची कृत्रिम टंचाई निर्माण केली जात आहे. यामुळे शेतकऱ्यांना युरिया खत मिळत नाही. शिवाय पिकांच्या नुकसानीला योग्य भरपाई न मिळाल्याने संतप्त झालेल्या शेतकऱ्यांनी आज अक्कलकुवा तहसील कार्यालयावर धडक देत आंदोलन केले आहे. यावेळी शेतकऱ्यांनी आक्रमक भूमिका घेत तहसील कार्यालयातील कामकाज ठप्प केले आहे.
शेतकरी वर्ग पिकांची वाढ होण्यासाठी युरिया खतांचा डोस देण्यास सुरवात करत आहे. यासाठी कृषी केंद्रांवर खत खरेदीसाठी जात असता कृषी केंद्र चालकांकडून अडवणूक केली जात आहे. यामुळे शेतकऱ्यांना युरिया खत मिळत नाही. शिवाय मुसळधार पावसाने पिकांचे आतोनात नुकसान झाले असून याची भरपाई देखील शेतकऱ्यांना मिळालेली नाही. यामुळे शेतकरी संतप्त झाला आहे.
प्रशासन लक्ष देत नसल्याचा आरोप
दरम्यान माजी जिल्हाध्यक्ष नागेश पाडवी यांच्या नेतृत्वात अक्कलकुवा तहसील कार्यालयावर हे आंदोलन करण्यात आले. शेतकऱ्यांनी आरोप केला आहे की, विक्रेते आणि काही पदाधिकारी संगनमत करून युरियाची कृत्रिम टंचाई निर्माण करत आहेत. तसेच जास्त दराने खत विकून शेतकऱ्यांची लूट करत आहेत. अनेक वेळा तक्रारी करूनही प्रशासनाने लक्ष दिले नाही. त्यामुळे आंदोलनाचा पवित्रा घेतला आहे.
आंदोलन मागे न घेण्याची भूमिका
प्रत्येक शेतकऱ्याला शासकीय दराने युरिया खताचा तातडीने पुरवठा व्हावा. पिकांच्या नुकसानीचे तातडीने पंचनामे करून योग्य नुकसान भरपाई द्यावी. तसेच खताची कृत्रिम टंचाई थांबवून बफर योजनेतील खताचे पारदर्शक वितरण व्हावे. या मागण्या पूर्ण झाल्याशिवाय आंदोलन मागे घेणार नाही, असे आंदोलकांनी स्पष्ट केले आहे. यामुळे तहसील कार्यालयात मोठा गोंधळ उडाला आहे.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.