

एसटी बस भाड्यात १०% वाढ जाहीर
१५ एप्रिलपासून नवीन दर लागू
प्रत्येक तिकिटावर २ रुपये स्वच्छता अधिभार
उन्हाळी सुट्टीत फिरण्यासाठी जाणार असाल तर तुम्हाला अधिक पैसाजवळ ठेवावा लागेल. कारण राज्य परिवहन महामंडळाने सुट्टीचा हंगाम लक्षात घेता प्रवाशांवर १० टक्के हंगामी भाडेवाढीसह प्रति तिकिटामागे दोन रुपये असा स्वच्छता अधिभार घेण्याचा निर्णय घेतलाय. एसटीची ही नवीन दरवाढ १५ एप्रिलपासून लागू होणार आहे. आता लांब पल्ल्याच्या प्रवासासाठी प्रवाशांना ९० ते १०० रुपयांपर्यंतचा अतिरिक्त भार सहन करावा लागणार आहे.
विद्यार्थ्यांच्या परीक्षा संपल्यानंतर उन्हाळी सुट्टीमध्ये ग्रामीण भागात जाणाऱ्या प्रवाशांची संख्या अधिक असते. त्यात एसटीचे जाळे महाराष्ट्रातील खेड्यापाड्यांपर्यंत पसरले आहे, त्यामुळे हजारो प्रवासी खासगी वाहनापेक्षा एसटीलाच पसंती देतात. त्यामुळे भाडेवाढ केल्यानंतर एसटीच्या कमाईत मोठी होत असते. एसटी महामंडळाच्या नियमानुसार गर्दीच्या दिवसात हंगामी भाडेवाढ करण्याचा अधिकार आहे.
राज्य परिवहन प्रधिकरणाने एसटी महामंडळाला यात्रा, उन्हाळी सुट्टी आणि सणासुदीच्या दिवसामध्ये ३० टक्क्यांपर्यंत भाडेवाढ करण्यास मंजुरी दिली आहे. सन २०२६च्या उन्हाळी हंगामासाठी १० टक्के प्रवासी भाडेवाढ करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यानुसार भाडेवाढ १४ एप्रिलच्या मध्यरात्रीनंतर लागू होतील. उन्हाळी भाडेवाढ ही केवळ दोन महिन्यांसाठी असेन पण स्वच्छता अधिभार हा कायमस्वरूपी असणार आहे.
एसटी महामंडळात सफाई कर्मचाऱ्यांची कमतरता आहे. त्यामुळे एसटी गाड्यांसह, स्थानके आणि आगार स्वच्छतेसाठी कंत्राटदाराची नियुक्ती करण्यात येणार आहे. प्रवासी स्वच्छतेसाठी असलेल्या उपक्रमासाठी प्रति तिकीट दोन रुपये स्वच्छता अधिभार घेण्याचा निर्णय महामंडळाने घेतला आहे. महिला सन्मान योजना, ज्येष्ठ नागरिक, अमृत ज्येष्ठ नागरिक आणि अन्य सवलतधारी प्रवाशांना हा अधिभार लागू असेन.
आवडेल तेथे प्रवास योजनेंतर्गत चार आणि सात दिवसांचा पास देण्यात येतो. अशा प्रवाशांसाठी पाच रुपये अधिभार लागून असेन. पास देताना प्रवाशांकडून ही रक्कम वसूल करण्यात येईल. आगाऊ आरक्षणातून काढलेल्या पासवर स्वच्छता अधिभार असणार नाही. एसटीच्या बसगाड्या भाडेतत्त्वाने घेणाऱ्यांना प्रति बस ५० रुपये इतका अधिभार द्यावा लागेल, असे एसटी महामंडळाने स्पष्ट केले आहे.
सध्या मुंबई-पुणे प्रवासात साध्या एसटीसाठी २८१ रुपये मोजावे लागत आहेत. १५ एप्रिलला हंगामी भाडेवाढीनुसार ३१२ आणि दोन रुपये अधिभार असे एकूण ३१४ रुपये मोजावे लागतील.
परळ ते कोल्हापूर - ६४० रुपयांऐवजी आता ७०४
मुंबई ते कोल्हापूर- ७५० रुपयांऐवजी ८२५
मुंबई ते लातूर- ९०० रुपयांऐवजी १००० रुपये
मुंबई ते रत्नागिरी- ६०० रुपयांऐवडी ७०० रुपये इतके तिकीट द्यावे लागेल.
करण्यात आलेली दरवाढ साधी बस म्हणजे लालपरी, मिडी बस, जलद सेवा आणि रात्रसेवा देणार्या गाड्यांसाठी लागू असेल. महामंडळाच्या अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, आता प्रौढ प्रवाशांसाठी बसेसच भाडे प्रति टप्पा हा १२ रुपये असेल आणि लहान मुलांसाठी हे भाडे ७ रुपये ठरवण्यात आले आहे. भाडेवाढीतून हिरकणी, शयनयान, शिवशाही, जनशिवनेरी, शिवनेरी या गाड्यांसह ई-बस गाड्यांना वगळण्यात आले आहे.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.