योगेश काशिद, बीड प्रतिनिधी
Manoj Jarange Patil hunger strike, Maratha reservation : मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी मनोज जरांगे पाटील मुंबईच्या दिशेने निघाले आहेत. बीड जिल्ह्यातील पाटोदा येथे त्यांचा पहिल्या दिवशीचा मुक्काम झाला. या ठिकाणी नियोजित वेळेपेक्षा अत्यंत उशिरा, म्हणजेच मध्यरात्री तब्बल दोन वाजता जरांगे पाटील यांची सभा पार पडली. एवढ्या मध्यरात्रीही हजारो मराठा समाज बांधवांनी त्यांना ऐकण्यासाठी तुफान गर्दी केली होती.
या सभेत बोलताना जरांगे पाटील यांनी आपल्या प्रकृतीचा उल्लेख करत एक मोठा संकेत दिला आहे. उपोषणात दौरा करणे सोपे नाही, शारीरिक त्रास प्रचंड वाढत असल्यामुळे मी पुढचा दौरा रद्द करू शकतो. दौरा महत्त्वाचा नाही, आरक्षण महत्त्वाचे आहे, त्यासाठी थेट मुंबईला जाऊ शकतो, असे महत्त्वाचे विधान जरांगे पाटलांनी या वेळी केले. सततचे उपोषण आणि शारीरिक थकवा यांमुळे दौरा थांबवून थेट पुढील पाऊल उचलण्याचे संकेत त्यांनी दिले.
मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी मुंबईच्या दिशेने निघालेले मनोज जरांगे पाटील यांचा ताफा रात्री उशिरा बीड जिल्ह्यातील पाटोदा येथे दाखल झाला. एवढ्या उशिराही हजारो मराठा समाज बांधव आणि महिला मोठ्या संख्येने त्यांच्या स्वागतासाठी व सभेसाठी उपस्थित होत्या. या वेळी जरांगे पाटील यांनी उपस्थित जनसमुदायाला संबोधित करताना आपल्या पुढच्या प्रवासाबद्दल अत्यंत महत्त्वाचे संकेत दिले.
पुढचा दौरा आता शक्य नाही, थेट मुंबईला जाईन
उपोषणाचा १८ वा दिवस असल्याने आणि सलाईन सोडल्यापासून पुन्हा प्रचंड शारीरिक त्रास सुरू झाल्याचे जरांगे पाटील यांनी सांगितले. सततच्या प्रवासामुळे आणि बिघडलेल्या प्रकृतीमुळे त्यांनी स्पष्ट केले की, "मला पुढचा दौरा करणे आता शारीरिकदृष्ट्या शक्य होत नाहीये. उपोषणात दौरा करणे सोपे नाही. त्यामुळे मी पाटोद्यातूनच पोलिसांना पूर्वकल्पना देऊन थेट मुंबईला जाण्याचा विचार करत आहे." शरीर थकले असले तरी समाजासाठीचा लढा थांबणार नाही, असा ठाम विश्वास त्यांनी या वेळी व्यक्त केला.
समर्थकांना गाड्या मागे न आणण्याचे आवाहन
आपल्या पाठीमागे गाड्यांचा ताफा आणू नका, अशी विनंती जरांगे पाटील यांनी मराठा समर्थकांना केली. जर माझ्या मागे गाड्या येणार असतील तर मी परत अंतरवाली सराटीला निघून जाईन, असा इशारा त्यांनी दिला. आंदोलन शांततेत आणि शिस्तीत पार पडावे यासाठी त्यांनी समर्थकांना खोपोली येथे थेट पोहोचण्याचे आवाहन केले.
सरकारवर घणाघाती टीका
सभेत बोलताना त्यांनी सरकारवर आणि सत्ताधाऱ्यांवर कडाडून टीका केली. ५८ लाख नोंदी मिळाल्या असून अडीच कोटी समाज आरक्षणाच्या कक्षेत आला आहे. आता गॅझेटसाठी प्रयत्न सुरू आहेत, असे ते म्हणाले. त्याशिवाय, आरक्षणाचा मुद्दा सोडवूनच माघार घेणार असल्याचा पुनरुच्चार केला. समाजाच्या लेकरांसाठी मी सर्व काही पणाला लावले आहे, अशा शब्दांत त्यांनी आपल्या भावना व्यक्त केल्या.
सततचे उपोषण आणि बिघडती प्रकृती या पार्श्वभूमीवर जरांगे पाटलांनी दौरा थांबवून थेट मुंबई गाठण्याचा घेतलेला हा निर्णय मराठा आंदोलनाच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाचा मानला जात आहे.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.