
राज्यात सध्या ऊन-पावसाचा खेळ सुरू आहे. एकीकडे काही जिल्ह्यात तापमानाने चाळीशीपार केली आहे. तर दुसरीकडे काही जिल्ह्यांमध्ये अवकाळी पाऊस पडत आहे. राज्यातील अनेक जिल्ह्यात अवकाळी पावसासाठी पोषक वातावरण तयार झाले आहे. त्यामुळे आज देखील अनेक जिल्ह्यांमध्ये वादळी वारा आणि विजांच्या कडकडाटासह पाऊस पडण्याची शक्यता आहे. कोकण, मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्याला हवामान खात्याकडून येलो अलर्ट दिला आहे. त्यामुळे नागरिकांनी काळजी घेण्याचे आवाहन करण्यात आले आहे.
हवामान विभागाने कोकणात सोसाट्याच्या वाऱ्यासह अवकाळी पाऊस पडणार असल्याचा इशारा दिला आहे. अरबी समुद्रात कमी दाबाचा पट्टा निर्माण झाल्यामुळे ३० मार्च ते १ एप्रिल पर्यंत अवकाळी पाऊस पडणार असल्याचा इशारा हवामान खात्याने दिला आहे. त्यासोबतच ३० ते ४० किमी प्रतितास वेगाने सोसाट्याचा वारा आणि विजांच्या कडकडाटासह पाऊस पडण्याचा इशाराही देण्यात आला आहे.
सध्या राज्यातील अनेक जिल्ह्यात ढगाळ वातावरण असून प्रचंड उकाडा वाढला आहे. दरम्यान पावसाच्या शक्यतेमुळे कोकणात काढणी केलेला आंबा, काजू बी, कडधान्ये आणि सुपारी सुरक्षित ठिकाणी ठेवण्याच्या सूचना दिल्या आहेत. त्यामुळे अवकाळी पावसाच्या शक्यतेमुळे कोकणातील शेतकरी चिंतेत आला आहे.
हवामान खात्याने दिलेल्या माहितीनुसार, आज कोकण, पालघर, ठाणे, सिंधुदुर्गमध्ये वादळी वाऱ्यासह पावसाची शक्यता आहे. मध्य महाराष्ट्रातील नंदुरबार, धुळे, नाशिक, अहिल्यानगर, सातारा, सांगली कोल्हापूर या जिल्ह्यांमध्ये देखील वादळी वाऱ्यासह अवकाळी पावसाची शक्यता आहे. या सर्व जिल्ह्यांना हवामान खात्याकडून येलो अलर्ट देण्यात आला आहे. उद्या म्हणजे १ एप्रिल रोजी मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यात गारपीट होण्याची शक्यता आहे.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.