
राज्यावर अवकाळी पावसाचे संकट कायम आहे. गेल्या काही दिवसांपासून पडणाऱ्या अवकाळी पावसामुळे राज्यातील अनेक जिल्ह्यांमध्ये शेतीचे मोठे नुकसान झाले आहे. त्यामुळे शेतकरी हवालदिल झाला आहे. हातातोंडाशी आलेले पिक निसर्गाने हिरावून घेतल्यामुळे शेतकऱ्याच्या डोळ्यात पाणी आले आहे. आजही राज्याच्या अनेक भागांमध्ये वादळी वाऱ्यासह अवकाळी पाऊस पडणार आहे. मराठवाडा आणि मध्य महाराष्ट्रात वादळी वाऱ्यासह पावसाची शक्यता आहे. हवामान खात्याकडून येलो अलर्ट जारी करण्यात आला आहे. तर उर्वरीत राज्यात ढगाळ हवामानासह उष्ण आणि दमट हवामान राहण्याची शक्यता आहे.
हवामान खात्याने दिलेल्या माहितीनुसार, मराठवाडा आणि मध्य महाराष्ट्रात वादळी वाऱ्यासह पाऊस पडण्याची शक्यता आहे. आज मराठवाड्यातील छत्रपती संभाजीनगर, जालना, बीडमध्ये वादळी वाऱ्यासह मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता आहे. तर पश्चिम महाराष्ट्रातील सोलापूर जिल्ह्यात वादळी वाऱ्यासह पावसाची शक्यता आहे. या सर्व जिल्ह्यांना येलो अलर्ट जारी करण्यात आला आहे.
तसंच जळगाव, अहिल्यानगर, सांगली, परभणी, हिंगोली, धाराशिव, लातूर, नांदेड या सर्व जिल्ह्यांत तुरळक ठिकाणी विजांच्या कडकडाटासह पावसाची शक्यता आहे. तर उर्वरित राज्यात अंशतः ढगाळ वातावरणासह उष्ण आणि दमट हवामानाचा अंदाज हवामान खात्याने वर्तवला आहे.
दरम्यान, शनिवारी राज्यातील अनेक जिल्ह्यांमध्ये पारा ४२ अंशापार गेला होता. अकोला, चंद्रपूर, यवतमाळ, मालेगाव आणि धुळे येथे ४२ अंश सेल्सिअसपेक्षा अधिक तापमानाची नोंद झाली. तर परभणी, अमरावती आणि नागपूर येथे ४१ अंशांपेक्षा अधिक तापमानाची नोंद झाली आहे. तसेच जळगाव, जेऊर, निफाड, सोलापूर, गडचिरोली, वर्धा आणि वाशीम जिल्ह्यांमध्ये ४० अंशांपेक्षा अधिक तापमानाची नोंद करण्यात आली होती.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.