
राज्यात मागील दोन दिवसांपासून पावसाने जोरदार हजेरी लावली आहे. काही ठिकाणी रिपरिप, तर काही ठिकाणी मुसळधार पावसाचं रौद्र रूप पाहायला मिळत आहे. अनेक जिल्ह्यांत पावसाचा जोर कायम असून काही ठिकाणी धरणं भरून वाहू लागली आहेत. तर दुसरीकडे, भंडारा आणि चंद्रपूर जिल्ह्यांत शाळा आणि महाविद्यालयांना सुट्टी जाहीर करण्यात आली आहे.
मुंबईची तुंबई
मुंबईच्या पश्चिम उपनगरात पहाटेपासूनच जोरदार पाऊस सुरू आहे. सकाळचे १० वाजले तरी पावसामुळे अनेक भागांत अजूनही अंधाराचे वातावरण आहे. कामाचा दिवस असल्याने शाळकरी मुले, नोकरदार, सरकारी कर्मचारी शाळा व कार्यालय गाठण्यासाठी धावपळ करत आहेत. मात्र, पावसामुळे त्यांना मोठ्या अडचणींना सामोरे जावे लागत आहे.
नवी मुंबईत जोरदार सरी
नवी मुंबई शहरातही पावसाची हजेरी लागली आहे. खारघर, बेलापूर, वाशी, नेरुळ, कोपरखैरणे या भागांमध्ये पाऊस कोसळत असून नवी मुंबई महानगरपालिकेचे आपत्ती व्यवस्थापन पथक सज्ज ठेवण्यात आले आहे.
नांदेड जिल्ह्यात समाधानकारक पाऊस
गेल्या दोन दिवसांपासून नांदेड जिल्ह्यात समाधानकारक पावसामुळे शेतीला जीवदान मिळाले आहे. नांदेड शहरालगत असलेले विष्णुपुरी धरण सध्या ८४ टक्के भरले आहे. दोन दिवसांपूर्वी २४ टक्के पाणीसाठा असलेल्या या धरणात झपाट्याने वाढ झाली असून, आता शहराचा पाण्याचा प्रश्न सुटण्याची शक्यता आहे.
अक्कलकोटच्या कुरनूर धरणात ९५% साठा
अक्कलकोट तालुक्याला पाणीपुरवठा करणारे कुरनूर धरण ९५% भरले आहे. या धरणाची क्षमता ८२२ दशलक्ष घनफूट असून सध्या ७८१ दशलक्ष घनफूट पाणीसाठा उपलब्ध आहे. त्यामुळे अक्कलकोट तालुक्यातील तीन नगरपरिषद आणि ५२ गावांचा पाणी प्रश्न मिटला आहे. बोरी आणि हरणा नद्यांचा विसर्ग सुरू असून नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे.
कल्याण-डोंबिवलीत रिमझिम सरी
काल विश्रांती घेतलेल्या पावसाने आज सकाळपासून कल्याण-डोंबिवली परिसरात रिमझिम सरींनी हजेरी लावली आहे. जोर नसला तरी सतत चालणाऱ्या या पावसामुळे वातावरणात आल्हाददायक गारवा निर्माण झाला आहे.
चाकण औद्योगिक परिसरात वाहतूक कोंडी
पावसामुळे चाकण औद्योगिक परिसरात मोठी वाहतूक कोंडी निर्माण झाली आहे. पुणे-नाशिक आणि तळेगाव-शिक्रापूर महामार्गावर चार किलोमीटरपर्यंत वाहनांच्या रांगा लागल्या आहेत. पोलीस वाहतूक सुरळीत करण्यासाठी प्रयत्न करत आहेत, मात्र प्रवासी व कामगारांना अडचणींना तोंड द्यावे लागत आहे.
खडकवासला धरण परिसरात ९२.९८% पाणीसाठा
पुण्याला पाणीपुरवठा करणाऱ्या खडकवासला धरण क्षेत्रात २३.९८ टीएमसी म्हणजेच ९२.९८% पाणीसाठा झालेला आहे. गतवर्षी याच कालावधीत ६९.५२% पाणीसाठा होता. यावर्षी सुरुवातीपासून चांगला पाऊस झाल्याने खडकवासला, पानशेत, वरसगाव आणि टेमघर या धरणांत साठा वाढला आहे.
खडकवासला – १.०६ टीएमसी
पानशेत – ८.९२ टीएमसी
वरसगाव – ११.१५ टीएमसी
टेमघर – २.८५ टीएमसी
भंडाऱ्यात रेड अलर्ट
भंडारा आणि चंद्रपूर जिल्ह्यात हवामान विभागाने रेड अलर्ट जारी केला आहे. सतत पडणाऱ्या पावसामुळे शेतीमध्ये पाणी साचले आहे. यामुळे शेतकरी हवालदिल झाला आहे. गेल्या दोन दिवसांपासून सुरु असलेल्या मुसळधार पावसामुळे कोणतीही अनुचित घटना घडू नये म्हणून जिल्हाधिकाऱ्यांनी जिल्ह्यातील सर्व अंगणवाड्या, शाळा आणि महाविद्यालयांना सुट्टी जाहीर केली आहे.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.