

राष्ट्रवादी काँग्रेसच्या राष्ट्रीय अध्यक्षांची निवड 15 दिवसांत होणार
सुनेत्रा पवार यांच्या नावाची राजकीय वर्तुळात जोरदार चर्चा
अजित पवार यांच्या निधनानंतर नेतृत्व बदलाची प्रक्रिया वेगात
अजित पवार यांच्या निधनानंतर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची धुरा कोणाकडे जाणार यावरुन जोरदार चर्चा रंगली आहे. याचदरम्यान दोन्ही राष्ट्रवादीच्या विलीनीकरणाच्या चर्चांनाही ऊत आलाय.अजित पवार यांच्या मृत्यूनंतर 4 थ्या दिवशीच त्यांच्या पत्नी सुनेत्रा पवार यांनी उपमुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली. या शपथविधी सोहळ्यावरुन राजकीय चर्चा होत होती. आता राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष कोण होणार याकडे सर्वांचे लक्ष लागलंय.
राष्ट्रवादीचे आमदार, खासदारांकडून सुनेत्रा पवार यांना अध्यक्ष बनवलं जावं अशी मागणी केली जातेय. दरम्यान कोणाच्या गळ्यात राष्ट्रवादी पक्षाच्या राष्ट्रीय अध्यक्षांची माळ पडेल याचे लवकरच मिळणार आहे. येत्या 15 दिवसांत राष्ट्रवादीच्या नव्या अध्यक्षाची निवड केली जाणार आहे. उपमुख्यमंत्री तथा पुणे जिल्ह्याच्या पालकमंत्री सुनेत्रा पवार आज सकाळपासूनच पुण्यातील सर्किट हाऊस येथे आहेत. येथे त्यांनी बैठकांचा थडाका लावलाय.
जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निकालानंतर विजयी झालेल्या सदस्यांच्या त्या भेटी घेत आहेत. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे राजकीय सल्लागार नरेश अरोरा यांचे बंधू सुनेत्रा पवार यांच्या भेटीसाठी दाखल झालेत. पार्थ पवार आणि जय पवार हेही पुण्यातील सर्किट हाऊस या ठिकाणी पोहोचलेत. एकीकडे या भेटीची चर्चा सुरू असतानाच आता राष्ट्रवादीच्या राष्ट्रीय अध्यक्षांची निवडीबाबत मोठी बातमी समोर आलीय.
राष्ट्रवादी काँग्रेसच्या राष्ट्रीय अध्यक्षपदाची निवड येत्या १५ दिवसांत होणार आहे. सर्वानुमते उपमुख्यंत्री सुनेत्रा पवार यांचीच निवड राष्ट्रीय अध्यक्षपदी होणार असल्याची माहिती राष्ट्रवादीच्या एका वरिष्ठ नेत्यानं दिली आहे. त्यामुळं आता पुढील १५ दिवस हे राज्यासाठी आणि राष्ट्रवादी काँग्रेससाठी देखील महत्वाचे असतील. त्यामुळं अर्थसंकल्पीय अधिवेशनापूर्वीच राष्ट्रवादीला नवा अध्यक्ष मिळण्याची शक्यता आहे.
दरम्यान राष्ट्रवादीच्या सर्वच नेत्यांची पदाधिकाऱ्यांचा सुनेत्रा पवार यांच्या नावालाच पाठिंबा आहे. आता केवळ सुनेत्रा पवार यांच्या नावाची घोषणा होण्याची औपचारिकता बाकी असून त्याचा निर्णय पुढील काही दिवसात होणार आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचा राष्ट्रीय अध्यक्षाची निवड झाली की त्यानंतर दोन्ही राष्ट्रवादी काँग्रेसच्या विलीनीकरणाच्या घडामोडींना देखील वेग येणार असल्याच म्हटलं जातंय.