Maharashtra Politics: ठरलं तर मग! मनसेतून हकालपट्टी केलेला बडा नेता भाजपमध्ये प्रवेश करणार, या दिवशी 'कमळ' हाती घेणार
Summary -
मनसेचे माजी सरचिटणीस व कोकण संघटक वैभव खेडेकर भाजपमध्ये प्रवेश करणार.
४ सप्टेंबर रोजी मुंबईत मंत्री रवींद्र चव्हाण व नितेश राणे यांच्या उपस्थितीत पक्षप्रवेश होणार.
पक्षविरोधी कारवायांमुळे आणि भाजपशी संपर्क असल्याच्या कारणावरून मनसेने त्यांची हकालपट्टी केली होती.
त्यांच्या प्रवेशामुळे कोकणात भाजपची ताकद वाढण्याची शक्यता आहे.
महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे राज्य सरचिटणीस आणि कोकण संघटक वैभव खेडेकर यांची पक्षातून हकालपट्टी करण्यात आली होती. त्यामुळे वैभव खेडेकर यांना मोठा धक्का बसला होता. त्यांनी पत्रकार परिषद घेत पक्षाने केलेल्या या कारवाईवर नाराजी व्यक्त केली होती. यानंतर वैभव खेडेकर कोणत्या पक्षात जाणार अशी चर्चा सुरू झाली होती. अखेर त्यांनी निर्णय घेतला. वैभव खेडेकर भाजपच्या वाटेवर असून ते ४ सप्टेंबर रोजी भाजपमध्ये प्रवेश करणार आहेत.
मिळालेल्या माहितीनुसार, रत्नागिरीच्या खेडचे मनसेचे कोकण विभागीय सरचिटणीस वैभव खेडेकर यांना पक्षाने बडतर्फ केल्यानंतर ते येत्या ४ सप्टेंबरला भाजपमध्ये प्रवेश करणार आहेत. मुंबईमध्ये रविंद्र चव्हाण, मंत्री नितेश राणे यांच्या उपास्थित शेकडो कार्यकर्त्यांसह वैभव खेडेकर भाजपमध्ये प्रवेश करणार आहेत. राष्ट्रवादीचे प्रशांत यादव यांच्या पक्ष प्रवेशानंतर आता मनसेचे वैभव खेडकर हे भाजपमध्ये प्रवेश करणार आहेत. वैभव खेडेकरांच्या प्रवेशानंतर कोकणात भाजप पक्ष वाढीला बळ मिळू शकतं. त्याचसोबत स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीपूर्वी भाजपची ताकद वाढणार आहे.
पक्षविरोधी कारवायांमुळे वैभव खेडेकर यांची पक्षातून हकालपट्टी करण्यात आली होती. त्यांच्यावर पक्षांच्या विचारांशी तडजोड करत काम केल्याचा ठपका ठेवण्यात आला होता. तसंच ते भाजपच्या संपर्कात असल्याचे देखील म्हटले जात होते. पक्षातून काढण्यापूर्वी ते भाजप किंवा शिवसेना शिंदे गटामध्ये जाणार असल्याची देखील चर्चा सुरू होती. वैभव खेडेकर यांच्यासह ४ नेत्यांची मनसेने पक्षातून हकालपट्टी केली होती. यामध्ये वैभव खेडेकर यांच्यासह अविनाश सौंदळकर, संतोष नलावडे, सुबोध जाधव यांचा समावेश होता.
वैभव खेडेकर हे मनसेचे मोठे नेते होते. मनसे पक्ष स्थापन झाल्यापासून ते राज ठाकरे यांच्यासोबत होते. कोकणात मनसे पक्ष वाढवण्यासाठी त्यांनी खूप मदत केली होती. पक्षातून हकालपट्टी झाल्यानंतर त्यांनी नाराजी व्यक्त केली होती. त्यांनी पत्रकार परिषद घेतली तेव्हा त्यांच्या डोळ्यात अश्रू आले होते. त्यांनी सांगितले होते की, 'मी पक्ष वाढवण्यासाठी रात्रंदिवस धडपड केली. नगरपालिका, पंचायत समिती, ग्रामपंचायत ते युवा मनसेच्या झेंड्याखाली लढलो. पण फक्त गैरसमज आणि मला एकदाही न विचारता बडतर्फ केले. सोशल मीडियावर बडतर्फीचे पत्र वाचले तेव्हा मन सुन्न झाले. हे पत्र म्हणजे माझ्या निष्ठेचे प्रमाणपत्र आहे.', अशा शब्दात त्यांनी दु:ख व्यक्त केले होते.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.