
शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे नेते अंबादास दानवे यांचा विधान परिषदेतील विरोधी पक्षनेतेपदाचा कार्यकाळ ऑगस्टमध्ये पूर्ण होणार आहे. दरम्यान राज्याच्या पावसाळी अधिवेशन शुक्रवारी संपणार आहे. त्याआधी आज अंबादास दानवे यांचा निरोप समारंभ झाला. दानवे यांच्या निवृत्तीनंतर राजकीय समीकरणांमध्ये मोठे बदल होण्याची शक्यता आहे. विरोधी पक्षनेते पदावरून महाविकास आघाडीत चुरस सुरू आहे.
अंबादास दानवे ऑगस्ट २०१९ मध्ये विधान परिषदेवर आमदार म्हणून निवडून आले होते. छत्रपती संभाजीनगरातील जालना स्थानिक स्वराज्य संस्थामधून निवडून येत अंबादास दानवे विधान परिषदेच्या जागेवर विजयी झाले होते. शिवसेनेत झालेल्या पक्ष फुटीनंतर ऑगस्ट २०२२ मध्ये अंबादास दानवे यांच्यावर विधान परिषदेतील विरोधी पक्षनेतेपदाची धुरा पक्षाने दिली होती.
अंबादास दानवे हे शिवसेनेचा आक्रमक चेहरा म्हणून ओळखले जातात. अलीकडच्या काळात ठाकरे गटाची बाजू हिरीरीने आणि आक्रमकपणे मांडणाऱ्या नेत्यांमध्ये त्यांचा समावेश होतो. त्यांच्या निवृत्तीनंतर विधान परिषदेमध्ये पक्षाचे संख्याबळ घटणार आहे. त्यामुळे विरोधी पक्षनेतेपद गमवण्याची शक्यता उद्धव ठाकरे यांच्या पक्षावर निर्माण झालीय.
दरम्यान अंबादास दानवे यांच्यानंतर विरोधी पक्षनेते पद काँग्रेसला मिळावं, अशी मागणी मविआतील काँग्रेस पक्षाकडून केली जातेय. त्याचप्रमाणे शरद पवार गट आणि शिवसेनेकडूनही दावा केला जातोय. विधानसभा सदस्यातून निवडून येण्यासाठी विधानसभा सदस्य संख्या ठाकरेंच्या शिवसेनेकडे फक्त २० आमदारांचे संख्याबळ आहे. अंबादास दानवे यांना पुन्हा निवडून येण्यासाठी विधानसभा सदस्य संख्या किमान ४० ते ४५ हवी आहे. त्यावरून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी ठाकरे गटाचे आमदार अनिल परब यांना टोला मारला. दरम्यान काँग्रेस विधान परिषदेच्या विरोधी पक्षनेते पदासाठी आग्रही आहे. त्यामुळे आता विरोधी पक्षनेतेपद काँग्रेसकडेच जाणार असल्याचं सांगितलं जात आहे.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.