कल्याण ग्रामीण भागात भेडसावणाऱ्या पाणी समस्येबाबत आज मनसे आमदार राजू पाटील यांनी केडीएमसी भेट घेतली. यावेळी मनसे आमदार राजू पाटील यांनी लोकसभा निवडणुका जाहीर होण्याआधी जी जादू केली, तीच जादू आता करा, असा टोला केडीएमसी आणि एमआयडीसीला लगावला. केडीएमसीकडून काही हलगर्जीपणा होत असेल, मात्र एमआयडीसी चालूगिरी करतेय, असा आरोप करत आठवडाभरात पाणी समस्या सोडवली नाही तर आम्ही आहोतच असा इशारा राजू पाटील यांनी दिलाय.
मुंबईत काल रात्री पासून मुसळधार पावसाला सुरुवात झालेली होती. त्यानंतर सर्वांचीच दाणादाण उडाली होती . आज दुपारी पावसाने विश्रांती घेतली होती. विश्रांतीनंतर पु्न्हा पावसाने जोर धरलाय. दादर येथील हिंदमाता परिसरात गुडघाभर पाणी साचल्याने नागरिकांचे हाल होत आहेत. तसेच पाणी उपसा यंत्र ज्या ठिकाणी सुरू केले आहे. तिकडुन आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी सुरज मसुरकर यांनी
उद्या अतिवृष्टी होणार असल्याचा इशारा मिळाल्याने नवी मुंबई मनपा प्रशासनाचा निर्णय घेतलाय. नवी मुंबई महानगरपालिका क्षेत्रातील सर्व माध्यमांच्या व सर्व व्यवस्थापनांच्या सर्व शाळा बंद राहणार आहेत.
काही महिन्यांपूर्वी शर्मा यांनी पुण्यात अप्पर पोलीस आयुक्त म्हणून कार्यभार पाहिला होता.
सध्या ते नाशिक पोलीस परिक्षेत्राचे नवनियुक्त विशेष पोलीस महानिरीक्षक होते. हसतमुख अधिकारी म्हणून रंजन शर्मा यांची ओळख आहे. गुन्हे अन्वेषण विभागाचे (सीआयडी) अधीक्षक म्हणून देखील त्यांनी काम केलं आहे. शर्मा भारतीय पोलीस सेवेतील २००६ च्या बॅचचे आयपीएस अधिकारी आहेत.
ठाण्याहून कल्याणचा दिशेने जाणाऱ्या ट्रेन धिम्या गतीने सुरू आहेत. मुंबई येथे होत असलेल्या पावसामुळे लांब पल्ल्याच्या गाड्या ठाणे रेल्वे स्थाकाजवळ थांबविण्यात आल्यात. प्लॅटफॉर्म क्रमांक ५ वर पाणी साचले आहे त्यामुळे प्रवाश्यांना ट्रेन पकडण्यासाठी त्रास होत आहे.
संतत धार पावसामुळे रायगड जिल्ह्याला पावसाचा रेड अर्लट देण्यात आलाय. संभाव्य धोकादायक गावातील नागरिकांचे सुरक्षित ठिकाणी स्थलांतरीत करा अशा सूचना मंत्री आदिती तटकरे यांच्या रायगड जिल्हा प्रशासनाला सूचना देण्यात आल्या आहेत. आदिती तटकरे यांनी जिल्हाधिकारी यांच्याकडून घेतला जिल्ह्यातील सद्यस्थितीचा आढावा घेतला. जिल्ह्यात 103 गावे संभाव्य धोकादायक क्षेत्रात आहेत तर 9 गावे अतिधोकादायक क्षेत्रात, 11 गावे मध्यम धोकादायक आहेत.
मुसळधार पडणाऱ्या पावसाचा पश्चिम रेल्वेला फटका बसलाय. पश्चिम रेल्वेची सेवा १०-१५ मिनिटे उशिराने धावत आहेत. ऐन गर्दीच्या वेळी पावसाचा जोर वाढल्याने प्रवाशांचे हाल होत आहेत. सकाळपासून मुंबईच्या तीन्ही रेल्वे मार्गावरील सेवा पावसामुळे विस्कळीत झालीय. तर हार्बर लाईनवरही पावसाचा परिणाम झाला असून रेल्वे वाहतूक १० ते १५ मिनिटाने उशिराने धावत आहे.
रायगड जिल्ह्यात जोरदार पाऊस पडला. सरासरी 56.61 मिमीने पाऊस पडल्याची नोंद करण्यात आलीय. जिल्ह्यात सर्वात जास्त म्हसळा तालुक्यात पाऊस पडलाय.
अलिबाग - 43 mm
मुरुड - 70 mm
पेण - 40 mm
पनवेल - 10.2 mm
उरण - 34 mm
कर्जत - 22.60 mm
खालापूर - 25 mm
माथेरान - 09 mm रोहा - 69 mm
सुधागड - 21mm
माणगाव -70 mm
तळा - 128 mm.
महाड - 17 mm
पोलादपूर - 25 mm
श्रीवर्धन - 102 mm.
म्हसळा - 204 mm.
मालेगाव-मनमाड रोडवर असलेल्या नांदगाव फाटाजवळील हॉटेल साईजत्राजवळ उभ्या असलेल्या ट्रकला चुकीच्या दिशेने येणाऱ्या दुसऱ्या मालट्रकने भीषण धडक दिली. या अपघात दोन जण गंभीर जखमी झालेत. असून त्यात एकाची प्रकृती गंभीर आहे. एका ट्रकमध्ये गूळ तर दुसऱ्या ट्रकमध्ये युरिया भरलेला होता. या भीषण अपघातामुळे वाहतूक काही काळ ठप्प झाली होती.
महानगर गॅसने सीएनजी आणि पीएनजीच्या किंमती वाढवण्याचा निर्णय घेतलाय. आज रात्रीपासून सीएनजीच्या दरात दीड रुपयांनी तर पीएनजीच्या दरात १ रुपयाने वाढ होणार आहे. यामुळे किलोमागे सीएनजीचा दर 75 रुपये इतका होईल. तर पीएनजीचा दर 47 रुपयांवरून 48 रुपये इतका होईल.
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि देवेंद्र फडणवीस यांची विधिमंडळात बैठक सुरू आहे. ही बैठक विधान परिषद निवडणुकीच्या संदर्भात होत आहे. बहुजन विकास आघाडीचे नेते आमदार हितेंद्र ठाकूर यांच्यासह रविंद्र चव्हाणही मुख्यमंत्र्यांच्या दालनात आलेत.
वरळी हिट अँड रन प्रकरणात पोलिसांनी राजेश शहा यांना अटक केली होती. पोलिसांनी आज त्यांना न्यायालयात हजर केल्यानंतर कोर्टाने पोलिसांना झटका दिलाय. कोर्टाने राजेश शहा यांची अटक बेकायदेशीर ठरवली असून त्यांची रवानगी न्यायालयीन कोठडीत केलीय.
आंतरराष्ट्रीय स्तरावर खेळांमध्ये अत्युच्च कामगिरी करणाऱ्या खेळाडूंसाठी सरकारने मोठी घोषणा केलीय.खेळाडूंना शासकीय नोकरीमध्ये थेट सामावून घेतले जाणार आहे. क्रीडा मंत्री संजय बनसोडे यांकडे खेळाडूंनी मागणी केली होती.
पुणे शहरातही पावसाला सुरुवात झालीय. शहरातील अनेक भागात पावसाने हजेरी लावलीय.
मुंबईत मुसळधार पाऊस कोसळत आहे. धो-धो पावसामुळे राज्य सरकारने मोठा निर्णय घेतलाय. शासकीय अधिकारी आणि कर्मचाऱ्यांना ३ वाजता कार्यालयातून घरी सोडण्याचे निर्देश सरकारने दिलेत.
यवतमाळ जिल्ह्यातील काही भागात पावसाची रिपरिप सुरू आहे. जिल्ह्यातील अनेक तालुक्यांमध्ये शेतकऱ्यांची शेतीची कामे खोळंबली आहेत. मागील तीन दिवसापासून सतत यवतमाळ जिल्ह्यामध्ये हलक्या स्वरूपाचा पाऊस सुरू आहे.
गोसीखुर्द धरणाच्या पाणलोट क्षेत्रात सतत पाऊस होत असल्यामुळे गोसीखुर्द धरणाची पाणी पातळी नियंत्रित ठेवण्याकरिता गोसेखुर्द धरणाचे पाच दरवाजे अर्ध्या मीटरने उघडण्यात आले असून 530.26 क्यूमेकने पाण्याचा विसर्ग करण्यात येत आहे. त्यामुळे नदी पात्रा जवळील गावांना तसेच आवागमन करणाऱ्यांना नागरिकांना सतर्क राहण्याचे आव्हान धरण प्रशासना कडून करण्यात आले आहे.
कुर्ला आणि सायन दरम्यान साचलेले पाणी ओसरल्याने मध्य रेल्वेची वाहतूक पुन्हा सुरू झाली. स्लो आणि फास्ट अशा दोन्ही मार्गावरील अप आणि डाऊन दिशेची वाहतूक सुरू झाली आहे. तर चुनाभट्टी येथील पाणी कमी झाल्याने हार्बर मार्गावरील वाहतूक देखील सुरू झाली आहे. सीएसएमटी ते ठाणे, ठाणे ते कर्जत आणि कसारा वाहतूक सुरू झाली. तर पनवेल ते सीएसएमटी ही वाहतूक देखील सुरू झाली आहे. तसंच, पश्चिम रेल्वेची वाहतूक देखील सुरू झाली असून ती उशिराने सुरू आहे.
पुढील २४ तासात मुंबईत ढगाळ वातावरण आणि काही ठिकाणी मुसळधार पावसाचा अंदाज व्यक्त केला आहे. मुंबईला सध्या येलो अलर्ट जारी केला आहे. पुढील २, ३ दिवस कोकणातील घाट भागात ऑरेंज अलर्ट राहील. कोल्हापूर, सातारा या जिल्ह्यांना रेड अलर्ट जारी करण्यात आला आहे. जुलै महिन्यात सरासरीपेक्षा अधिक पाऊस पडण्याची शक्यता आहे. पुणे वेधशाळा प्रमुख डॉ. के एस होसाळीकर यांनी ही माहिती दिली.
रत्नागिरीत काहीशी उसंत घेतलेल्या पावसानं पुन्हा दमदार सुरुवात केली आहे. गेल्या 24 तासंत रत्नागिरी जिल्ह्यात 159 मिलीमीटर पावसाची नोंद झाली. पावसामुळं कडेपरीतील धबधबे चांगलेच प्रवाहीत झालेत.
कोकणात आज काही ठिकाणी अतिवृष्टीची शक्यता आहे. रत्नागिरी आणि सिंधुदुर्गासाठी रेड अलर्ट जारी करण्यात आला आहे. काही ठिकाणी २०५ मिमीहून अधिक पावसाचा अंदाज आहे. पालघर, ठाणे, मुंबई आणि रायगड जिल्ह्यासाठी ऑरेंज अलर्ट देण्यात आला आहे.
फुकटचे निर्णय हिताचे नसतात त्याचा गैरवापर होतो, शेतीला मोफत वीज देण्यावरून शरद पवारांनी सरकारवर टीका केली. राज्य सरकारच्या शेती पाणी मोफत वीज योजनेवर शरद पवारांनी जोरदार टीका केली आहे. 'फुकटचे निर्णय हिताचे नसतात. त्याचा गैरवापर होतो.' , अशा शब्दात शरद पवारांनी राज्य सरकारवर निशाणा साधला.
उधळलेल्या रेड्याने महाडमध्ये पाच ते सहा जणांना उडवल्याची घटना घडली. रायगड जिल्ह्यातील महाड शहरामधील काकर तळे येथील घटना असून उधळलेला रेडा काकर तळे, ST स्टँड, सुंदरवाडी रस्त्यावर मोकट धावला. यावेळी पाच ते सहा जणांना ठोकर मारून जखमी केले. जखमींवर सध्या महाड ट्रॉम केअर युनिट आणि खाजगी रुग्णालयात उपचार सुरु आहेत.
विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी आमदार अपत्रता प्रकरणी दिलेल्या निकालाविरोधात शरद पवार गटाने सुप्रीम कोर्टात धाव घेतली आहे. राहुल नार्वेकर यांच्याकडे अजित पवार यांच्यासोबत गेलेल्या आमदारांना अपात्र करा अशी मागणी केली होती. आज शरद पवार यांचे वकील अभिषेक मनु सिंघवी यांनी प्रकरण मेंशन केलं आहे. २३ जुलै रोजी मुख्य न्यायमूर्ती धनंजय चंद्रचूड यांच्या समोर सुनावणी होणार आहे.
Mumbai Rain News: मुंबईतील पावसाचा विमानसेवेवर परिणाम झाला असून नागपुरातून मुंबईला जाणारे अनेक विमान उशिराने उड्डाण करत आहेत. त्यामुळे विदर्भातील नागपूर विमानतळावरून जाणाऱ्या आमदार आणि मंत्री उशिराने पोहोचणार आहेत. इंडिगोचे सकाळी सकाळी सव्वा आठला जाणारे विमान साडेबारा वाजता करणार उड्डाण घेणार आहे. आ नितीन राऊत, आमदार अभिजीत वंजारी, आमदार आशिष जयस्वाल, मंत्री सुधीर मुनगंटीवार यांचे सकाळचे सव्वा आठचे विमान न उडाल्याने अडकून पडले आहेत. रात्री अकरा ते पाच वाजताचे दरम्यान उडणारे विमान डायव्हर्ट केल्याने सकाळी दहा वाजता मुंबईत पोचले ( तब्बल दहा तास विमानाला लागले. हे विमान हैदराबादवरून ड्रायवर्ट करण्यात आले होते. मुंबईतील पावसाचा फटका विधिमंडळाच्या कामकाजावर परिणाम... अनेक आमदार उशिराने पोहोचणार आहेत.
बाईक वरून खड्ड्यात पडून दीड वर्षाच्या चिमुकल्याचा मृत्यू झाल्याची घटना बोईसर नवापूर रोडवर घडली. माहीर मोशीन शिवानी असे दीड वर्षीय चिमुकल्याचे नाव आहे. या घटनेनंतर एमआयडीसी बांधकाम विभागाविरोधात स्थानिक आक्रमक झाले असून एमआयडीसी बांधकाम विभागाच्या निष्काळजीपणामुळे चिमुकल्याचा मृत्यू झाल्याचा आरोप करत . संतप्त स्थानिकांनी बोईसरमध्ये रास्ता रोको केला.
नांदेडमध्ये आज मनोज जरांगे पाटील यांची मराठा आरक्षण जनजागृती व शांतता रॅली थोड्याच वेळात निघणार आहे. नांदेड शहरातील राज कॉर्नर पासून या रॅलीला सुरुवात होणार आहे.राज कॉर्नर ते छत्रपती शिवाजी महाराज पुतळ्या पर्यंत ही रॅली काढली जाणार आहे. राज कॉर्नर येथे समाज बांधव मोठ्या संख्येने जमण्यास सुरुवात झालीय.19 जेसीबीच्या साहाय्याने जरांगे पाटील यांच्या वर पुष्यवृष्टी केली जाणार आहे.
पुण्यातील खडकी भागात घडलेल्या हिट अँड रन प्रकरणी पोलिसांनी एका संशयित तरुणाला ताब्यात घेतलेले असून त्याच्याकडील एक चार चाकी जप्त केलेली आहे. ही तीच गाडी आहे ज्या गाडीने रात्री खडकी भागात गस्तीवर असलेल्या पोलीस कर्मचाऱ्यांच्या अंगावर घातली होती. या अपघातात पोलीस कर्मचारी समाधान कोळी यांचा मृत्यू झाला होता. या संशयित तरुणाची सध्या वैद्यकीय चाचणी सुरू असून गाडी सुद्धा पोलिसांनी आता जप्त केलेली आहे.
मुंबईत सर्वत्र मुसळधार पाऊस झाल्यामुळे जनजीवन विस्कळीत झाले आहे. रस्त्यावर वाहतूक कोंडी झाली असून रेल्वे मार्गावरील वाहतूकही बाधित झाली आहे. ट्रॅकवरील पाणी काढण्याचे काम रेल्वे प्रशासनाकडून सुरू असून लवकरच वाहतूक पूर्वपदावर आणण्याचे प्रयत्न सुरू आहेत. सर्व आपत्कालीन यंत्रणांना हाय अलर्टवर राहण्याचे निर्देश मी दिले आहेत. गरज असेल तरच नागरिकांनी घराबाहेर पडावे. तसेच मुंबई मनपा, पोलीस प्रशासन आणि आपत्कालीन यंत्रणेला सहकार्य करावे असे आवाहन मी करत आहे.
काल रात्री मुंबईत सहा तासांमध्ये 300 मिमी पाऊस पडला आहे. हा मुंबईत वर्षभरात जेवढा पाऊस पडतो त्याच्या १० टक्के पाऊस आहे. भारत आणि जगभरातील शहरांप्रमाणेच मुंबईलाही हवामान बदलाचा त्रास सहन करावा लागत आहे. हवामान बदलामुळे भविष्यात येणाऱ्या पर्यावरणीय समस्या लक्षात घेऊन आपण मुंबई आणि महाराष्ट्रामध्ये पायाभूत सुविधा निर्माण केल्या पाहिजेत. वर्षातील 365 दिवस दुष्काळ, पूर, वादळ यांचा सामना करण्यासाठी आपण योग्य ती पावले उचलली पाहिजे. त्यासोबतच अशा समस्या उद्भवू नयेत यासाठी सुद्धा आपण प्रयत्न केले पाहिजे.
पुण्यातील खडकी परिसरात झालेल्या हिट अँड रन प्रकरणी मोठी अपडेट समोर आली आहे. खडकी परिसरात झालेल्या हिट अँड रन प्रकरणी चालकाला ताब्यात घेण्यात आले आहे. पुणे शहरातूनच या तरुणाला घेण्यात आले असून वैद्यकीय चाचणीसाठी रुग्णालयात नेण्यात आले आहे. काल रात्री भरधाव वेगात गाडी चालवत या तरुणाने पोलीस कर्मचाऱ्यांना दिली होती. या अपघातात खडकी पोलीस ठाण्याचे पोलिस कर्मचारी समाधान कोळी यांचा मृत्यू झाला होता.
Mumbai Rain News: मुंबई महानगरात जोरदार पाऊस होण्याची शक्यता हवामान खात्याने वर्तवली आहे. तसेच आज दुपारी १.५७ वाजता समुद्रात ४.४० मीटर उंच भरती आहे. या पार्श्वभूमीवर, खबरदारीचा उपाय म्हणून तसेच विद्यार्थ्यांची गैरसोय होऊ नये म्हणून मुंबई महानगरातील सर्व महानगरपालिका, शासकीय आणि खासगी माध्यमांच्या शाळांना तसेच महाविद्यालयांना दुसऱ्या सत्रासाठी देखील सुटी जाहीर करण्यात येत आहे.
अकोल्यात 24 तासांपासून सुरू असलेल्या संततधार पावसानं जनजीवन पार विस्कळीत झालंय. अकोल्यातील अनेक सखल भागांत पाणी साचलंय. अकोल्यातल्या अनेक रस्त्याला नद्यांचं स्वरूप आलंय.. बाळापुर तालुक्यातल्या मन नदिला देखील पुर आलाय.. रस्त्यावरील पाणी नदीत जात असल्याने रस्त्यावरून जाणाऱ्या वाहनधारकांना वाहन चालवण्यासाठी मोठी कसरत करावी लागते आहे.. याच दरम्यान बाळापुर येथील रस्त्यावरून वाहत असलेल्या पाण्यात दुचाकी वाहून जात असताना काही लोकांनी दुचाकी चालकाला आणि दुचाकीला सुखरूपपणे बाहेर काढले.. अन्यथा मोठी दुर्घटना घडली असते.. रस्त्यावरून वाहन चालत असताना अनेक नागरिक खाली कोसळत आहेत आणि त्यांच्या अंगाला मोठ्या प्रमाणात जखमा देखील होत आहेत. त्यामुळे वाहन चालवताना काळजी घ्यावी असा आवाहन नागरिकांनी केलं आहे..
भाईंदरच्या उत्तन परिसरात एक घर कोसळले. सुदैवाने या घरात कोणी नसल्याने दुर्घटना टळली आहे.मध्यरात्री पासून सुरू असलेल्या पावसाने चांगलेच झोडपले आहे. उत्तनच्या डोंगरी फातिमा माता लेन येथील हे जुने घर आहे. सकाळी नऊच्या सुमारास घटना घडली आहे.घटनास्थळी अग्निशमन दल देखील दाखल झाले होते.
राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा, ज्येष्ठ नेते शरद पवार आज सांगली जिल्ह्याच्या दौऱ्यावर आहेत. तासगाव येथे महाराष्ट्र राज्य द्राक्ष बागायतदार संघाच्या नूतन इमारतीचे शरद पवारांच्या हस्ते उद्घाटन झाले. सभेच्या ठिकाणी शरद पवारांच्यासह भाजपाचे माजी खासदार संजय काका पाटील, आमदार सुमनताई पाटील ,रोहित पाटील देखील उपस्थित होते.
कोल्हापूर जिल्ह्यातील विविध भागांमध्ये मुसळधार पाऊस सुरू आहे. त्यामुळे जिल्ह्यातील सर्व नद्या दुधडी भरून वाहत आहेत. कोल्हापूरची जीवन वाहिनी असणारी पंचगंगा नदी पात्रा बाहेर आली आहे. कोल्हापूर जिल्ह्यातील 50 हून अधिक बंधारे पाण्याखाली गेले आहेत.
आगामी कुंभमेळ्याच्या नियोजनासाठी आज नाशिकमध्ये महत्त्वाची बैठक होणार आहे. कुंभमेळ्यासाठी अंदाजे 15 हजार कोटी रुपयांचा आराखडा आज सादर होणार असून विभागीय आयुक्त प्रवीण गेडाम यांच्या अध्यक्षतेखाली बैठक पार पडणार आहे. 2027 मध्ये आगामी सिंहस्थ कुंभमेळा होणार आहे.
मुंबईमध्ये मध्यरात्रीपासून सुरू झालेल्या मुसळधार पावसामुळे मुंबईची लाईफलाईन म्हणून ओळखली जाणारी मुंबई लोकल पुर्णत: विस्कळित झाली आहे. अनेक रेल्वे स्टेशनवर पाणी साचल्यामुळे लोकल काही काळासाठी ठप्प झाली होती. आता ती पुर्वपदावर येत आहे. रुळावरील पाणी ओसरत असून लोकलसेवा पुर्वपदावर येत आहे. पण या लोकलसेवा २० ते २५ मिनिट उशिराने सुरू आहे. लोकलला प्रवाशांची गर्दी आहे. लोकलसेवा सुरू असून हळूहळू लोकल सुरू आहेत. एक एक लोकल थांबत थांबत पुढे जात आहे. विद्याविहार आणि कुर्ला स्थानकादरम्यान लोकल उभ्या आहेत. गर्दीमुळे प्रवाशांना प्रचंड मनस्ताप सहन करावा लागत आहे. सध्या मुंबईमध्ये पावसाचा जोर वाढत आहे.
नागपूर-गोवा शक्तीपीठ महामार्ग रद्द करण्याच्या मागणीसाठी शक्तिपीठ महामार्ग शेती बचाव कृती समितीच्यावतीने राष्ट्रवादीचे नेते शरद पवार यांची सांगलीत भेट घेतली आहे. यावेळी त्यांच्यासमोर शेतकरी आणि कृती समितीकडून सर्व अडचणी मांडण्यात आल्या. यावेळी शरद पवारांनी शक्तिपीठ महामार्गाबाबत लवकरच मुख्यमंत्र्यांबरोबर बैठक घेवु,असं आश्वासन कृती समितीला देण्यात आले आहे.
रायगडमध्ये पावसाचा रेड अलर्ट जाहीर करण्यात आला आहे. तसेच शाळांना सुट्टी देण्यात आली आहे. स्थानिक परिस्थितीचा आढावा घेऊन जिल्हाधिकारी रायगड यांचे शाळा बंद ठेवण्याचे आदेश दिले आहेत. तसेच गरज नसताना घरा बाहेर पडू नका, नदी, नाले, समुद्र किनारी, धबधबे अशा ठिकाणी न जाण्याच्या सुचना देण्यात आल्या आहेत.
रायगड किल्ल्यावर जाणारा रोप वे आणि पायरी मार्ग बंद करण्यात आला आहे. रविवारी संध्याकाळी रायगडावर निर्माण झालेल्या ढगफुटी सदृष्य परिस्थितीनंतर महाड प्रांताधिकारी डॉ. ज्ञानोबा बाणापुरे यांनी महत्वपूर्ण निर्णय घेतला. किल्ले रायगडावर गेलेल्या पर्यटकांना दुपारपर्यंत सुरक्षित खाली उतरवल्यानंतर रायगड रोप वे पुढील आदेशापर्यंत बंद रहाणार आहे. ० रायगडचा पयरी मार्ग आज पासून ३१ जुलै पर्यंत बंद ठेवण्यासंबधी रायगड जिल्हाधिकारी यांना प्रस्ताव सादर करण्यात आला आहे. तसेच
मागील दोन दिवसांच्या पावसामुळे मुंबईला पाणीपुरवठा करणाऱ्या तलावांमध्ये पाण्याची मोठी आवक झाली आहे. मागील दोन दिवसात जवळपास ८ टक्क्यांनी पाणीसाठा वाढला असून मुंबईला पाणीपुरवठा करणाऱ्या तुलसी आणि विहार धरणांमध्ये १८.७३ टक्के पाणीसाठा झाला आहे.
मुसळधार पावसाचा फटका मुंबईतील रेल्वेसेवाला बसला आहे. हार्बर मार्गावरील रेल्वेसेवा अद्यापही विस्कळीत आहे. वाशी ते सीएसएमटी लोकलसेवा पूर्णतः ठप्प आहे. सीएसएमटी ते पनवेल रेल्वे सेवा मात्र धीम्या गतीने सुरू आहे. वाशी ते सीएसएमटी रेल्वे सेवा सुरळीत होण्यास आणखी काही वेळ लागणार. कुर्ला रेल्वे स्थानकात पाणी साचल्यामुळे हार्बर रेल्वे सेवा झाली विस्कळीत झाल्याची माहिती आहे..
मुंबईत पहाटेपासूनच मुसळधार पाऊस कोसळत आहे. याचा परिणाम मुंबईतील रेल्वे वाहतूक सेवेत सोबतच रस्ते वाहतुकीवर देखील झाल्याचे पाहायला मिळत आहे. मुंबईच्या पश्चिम द्रुतगती महामार्गावर बोरिवली कडून वांद्रेच्या दिशेने जाणाऱ्या रस्त्यावर मोठ्या प्रमाणावर वाहतूक कोंडी झाल्याचं पाहायला मिळत आहे. आठवड्याचा पहिलाच दिवस असून चाकरमान्यांना कामावर जाण्यासाठी मोठी कसरत करावी लागत असल्याचं पाहायला मिळत आहेत.
रत्नागिरी - राजापूर पुरात अडकलेल्या 56 नागरीकांना राजापूर पोलीसांनी वाचवले
जवळपास पाच ते सहा तास सुरु होतं रेस्क्यू आँपरेशन
राजापूर बाजारपेठेत पुराच्या पाण्यात अडकले होते नागरिक
बोटीच्या सहाय्याने अडकलेल्या नागरिकांना काढले बाहेर
काल राजापूर बाजारपेठेत पाच ते सहा फुटांपर्यंत होते पुराचं पाणी
मुंबईतल्या मुसळधार पावसाचा फटका आमदारांना देखील बसला आहे. पावसाळी अधिवेशनासाठी मुंबईला येण्यासाठी अनेक आमदार ट्रेनमध्ये अडकून पडले आहेत. विदर्भ, अमरावती एक्सप्रेस कुर्ला, घाटकोपरदरम्यान अडकली आहे. या ट्रेनमध्ये १० ते १२ आमदार असल्याची माहिती आहे. अमोल मिटकरी, मंत्री अनिल पाटील ट्रँकनं चालत बाहेर निघाले आहेत.
मुंबईत आज पहाटेपासूनच मुसळधार पावसा¹ला सुरुवात झाली आहे. या पावसामुळे नागरिकांना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागत आहे. पावसामुळे अनेक सकल भागात पाणी साचल्या तर पाहायला मिळत आहे. अंधेरी पूर्वेकडील अंधेरी सभेला जोडणारा जो मुख्य रस्ता आहे, तो रस्ताच मुसळधार पावसात वाहून गेला आहे.
विशेष म्हणजे हा रस्ता दोन महिन्यापूर्वी महापालिकेच्या माध्यमातून बनवण्यात आला होता. नागरिकांनी या रस्त्याच्या कामासंदर्भात आवाजही उठवला होता. आज हा रस्ता पूर्णपणे पाण्याखाली वाहून गेल्याने रस्त्याच्या कामावर नागरिकांनी पुन्हा प्रश्नचिन्ह निर्माण केला आहे.
मुंबईत पहाटेपासूनच मतदार पाऊस कोसळत असून परिणामी अनेक सखल भागात पाणी शिरलं आहे. रस्ते देखील जलमय झाल्याचे पाहायला मिळत आहे. अंधेरी पूर्व पश्चिमेला जोडणारा अंधेरी सब वे देखील पाण्याखाली गेला आहे. सध्या अंधेरी सबवे वाहतुकीसाठी बंद करण्यात आला आहे. सबवे मध्ये पाच फुटापर्यंत पाणी साचल्याचे पाहायला मिळत आहे.
जुन्या घराची भिंत कोसळून मलब्याखाली दबून एका तरुणाचा दुर्दैवी मृत्यू झाला. ही घटना भंडारा जिल्ह्याच्या लाखांदूर तालुक्यातील करांडला येथे घडली. योगेश खुशाल देशमुख (वय 35) रा. करांडला असं मृत तरुणाचे नाव आहे. मृतक योगेश देशमुख यांचा शेती हा मुख्य व्यवसाय आहे.
त्यामुळे, घटनेच्या दिवशी योगेश देशमुख हा सकाळी शेतावरील काम करून घरी परतला आणि आपल्या जुन्या घराशेजारी काही काम करीत होता. दरम्यान,एकाएक जुन्या घराची मातीची भिंत कोसळली. त्यामुळे मलब्याखाली दबल्याने त्याचा जागीच मृत्यू झाला.
मुंबई शहर आणि उपनगरांत दिनांक ८ जुलै २०२४ रोजी मध्यरात्री १ वाजेपासून सकाळी ७ वाजेदरम्यान सर्वाधिक पाऊस कोसळलेली ठिकाणे आणि पावसाचे प्रमाण.
- वीर सावरकर मार्ग महानगरपालिका शाळा (३१५.६ मिमी)
- एमसीएमसीआर पवई (३१४.६ मिमी)
- मालपा डोंगरी महानगरपालिका शाळा (२९२.२ मिमी)
- चकाला महानगरपालिका शाळा (२७८.२ मिमी)
- आरे वसाहत महानगरपालिका शाळा (२५९.० मिमी)
- हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे महानगरपालिका शाळा (२५५.० मिमी)
- नारीयलवाडी शाळा (२४१.६ मिमी)
- जिल्हाधिकारी वसाहत (कलेक्टर कॉलनी) महानगरपालिका शाळा (२२१.२ मिमी)
- प्रतीक्षानगर महानगरपालिका शाळा (२२०.२ मिमी)
- नूतन विद्यामंदिर (१९०.६ मिमी)
- लालबहादूर शास्त्री मार्ग महानगरपालिका शाळा (१८९.० मिमी)
- शिवडी कोळीवाडा महानगरपालिका शाळा (१८५.८ मिमी)
- रावळी कॅम्प (१७६.३ मिमी)
- धारावी काळा किल्ला महानगरपालिका शाळा (१६५.८ मिमी)
- बी. नाडकर्णी उद्यान महानगरपालिका शाळा (१५६.६ मिमी)
मुंबई महानगरात काल मध्यरात्रीनंतर १ वाजेपासून ते आज सकाळी ७ वाजेपर्यंत या सहा तासांच्या कालावधीत विविध ठिकाणी ३०० मिलिमीटर पेक्षा अधिक पावसाची नोंद झाली आहे. काही सखाल भागांमध्ये जोरदार पावसामुळे पाणी साचले आणि उपनगरीय रेल्वे सेवा देखील विस्कळीत झाली आहे.
आज देखील जोरदार पाऊस होण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे. या पार्श्वभूमीवर विद्यार्थ्यांची गैरसोय होऊ नये म्हणून मुंबई महानगरातील सर्व महानगरपालिका, शासकीय आणि खासगी माध्यमांच्या शाळांना तसेच महाविद्यालयांच्या पहिल्या सत्रासाठी सुटी जाहीर करण्यात येत आहे. परिस्थितीचा आढावा घेऊन पुढील सत्रांसाठीचा निर्णय जाहीर करण्यात येईल.
मुंबई रविवारी रात्रभर झालेल्या मुसळधार पावसामुळे भांडुप रेल्वे स्थानकात पाणी साचले असून त्यामुळे मुंबईकडे जाणारी रेल्वे सेवा पूर्णपणे ठप्प झाली आहे. आज आठवड्याच्या पहिलाच दिवशी चाकरमानी मोठ्या प्रमाणात कामावर जायला निघालेले असताना रेल्वे स्थानकात आल्यानंतर त्यांना याबाबतची माहिती मिळत असून त्यामुळेच बदलापूर रेल्वे स्थानकात मोठी गर्दी झाल्याचे पाहायला मिळतेय.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.