

विधानपरिषद निवडणुकीसाठी राष्ट्रवादीकडून हालचाली सुरू
राष्ट्रवादीच्या १ जागेसाठी ६ नेत्यांची नावं चर्चेत
कुणाला संधी द्यायची हे सुनेत्रा पवार यांच्यापुढे मोठं आव्हान
बारामती आणि राहुरी पोटनिवडणुकीनंतर काही दिवसांतच विधान परिषदेची निवडणूक पार पडणार आहे. या निवडणुकीसाठी सर्वच राजकीय पक्षांकडून जोरदार हालचाली सुरू आहेत. भाजपने ३० जणांच्या नावांची यादी केंद्रातील नेतृत्वाकडे पाठवली आहे. आता राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाकडून देखील एका जागेसाठी कुणाला संधी द्यायची यासाठी चर्चा सुरू आहेत. राष्ट्रवादी काँग्रेसच्या एका जागेसाठी ६ जणांची नावं चर्चेत आहेत. पक्षाकडून कुणाला संधी देण्यात येतेय हे पाहणं महत्वाचे राहिल.
विधानपरिषद निवडणुकीसाठी उमेदवाराची निवड करणे ही राष्ट्रवादी काँग्रेसच्या राष्ट्रीय अध्यक्ष आणि राज्याच्या उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांच्यासाठी पहिली राजकीय कसोटी ठरणार आहे. एका जागेसाठी राष्ट्रवादीकडून अनेक नेते इच्छुक आहेत. उमेदवार निवडीच्या प्रक्रियेमध्ये खासदार पार्थ पवार यांची देखील भूमिका महत्वाची असणार आहे. ही निवडणूक पक्षातील निर्णय प्रक्रियेवर पवार कुटुंबाचे वर्चस्व असल्याचे दाखविण्याची पुन्हा एकदा संधी मिळणार आहे. राज्याचे दिवंगत उपमुख्यमंत्री अजित पवार यांना महत्त्वाच्या निर्णयांच्या वेळी ज्या नेत्यांनी साथ दिली आणि पवार कुटुंबाशी जवळीक ठेवली त्यांनाच प्राधान्य दिले जाईल अशी माहिती सुत्रांनी दिली आहे.
राष्ट्रवादीच्या एका जागेसाठी सध्या ६ जणांच्या नावाची जोरदार चर्चा केली जात आहे. यामध्ये प्रफुल्ल पटेल यांचे निकटवर्तीय माजी आमदार राजेंद्र जैन, सुनील तटकरे यांचे चिरंजीव अनिकेत तटकरे, बाबा सिद्दीकी यांचे पुत्र आणि माजी आमदार झिशान सिद्दीकी, राष्ट्रवादीचे प्रवक्ते आनंद परांजपे, सुनील टिंगरे आणि उमेश पाटील यांची नावं चर्चेत आहेत. तसंच अमोल मिटकरी उमेदवारी मिळवण्याचा प्रयत्नात असल्याचे सांगितले जात आहे. आता यांच्यापैकी कुणाच्या नावावर शिक्कामोर्तब केला जातोय ते लवकरच सांगितले जाईल.
महाराष्ट्र विधानसभेतील ९ सदस्यांची मुदत १३ मे २०२६ रोजी संपणार आहे. यामध्ये संजय केणेकर, नीलम गोऱ्हे, उद्धव ठाकरे, संदीप जोशी, दादाराव केचे, अमोल मिटकरी, रणजितसिंह मोहिते-पाटील, राजेश राठोड आणि शशिकांत शिंदे या ९ सदस्यांचा समावेश आहे. तर विधानपरिषद सदस्य डॉ. प्रज्ञा सातव यांच्या राजीनाम्यामुळे रिक्त झालेल्या विधानपरिषदेच्या एका जागेसाठी निवडणूक होणार आहे. या १० जागांसाठी पुढच्या महिन्यात १२ मे २०२६ रोजी मतदान होणार आहे. या दिवशी सकाळी ९ ते दुपारी ४ वाजेपर्यंत मतदान तर सायंकाळी ५ वाजल्यानंतर मतमोजणी केली जाणार आहे.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.