

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या कार्यालयाचा पत्ता बदलणार असल्याची माहिती.
मुख्यमंत्री कार्यालय मुंबईतील प्रसिद्ध एअर इंडिया इमारतीत स्थलांतरित होणार.
CMO स्थलांतरामुळे सरकारची भाड्यापोटी सुमारे २०० कोटी रुपयांची बचत होणार
राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे दिल्लीत जाणार असून केंद्रीय मंत्रिमंडळात त्यांची वर्णी लागणार असल्याच्या चर्चांनी राजकीय वातावरण तापलं होतं. त्याचदरम्यान खासदार संजय राऊत यांनी तर देवेंद्र फडणवीस यांना कोणतं मंत्रिपद दिलं जाणार याबाबत भाष्य केलं होतं. फडणवीस दिल्लीत जाणार असल्याची चर्चा असतानाच राज्यातील राजकारणातील मोठी बातमी हाती आली आहे.
ही बातमी म्हणजे मुख्यमंत्री कार्यालयाबाबतची. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या कार्यालयाचा पत्ता बदलणार आहे. मुंबईतील प्रसिद्ध एअर इंडिया इमारतीत स्थलांतरित होणार आहे. या निर्णयामुळे सरकारची भाड्यापोटी २०० कोटी रुपयांची बचत होणार असल्याचं म्हटलं जातंय. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे कार्यालय राज्य सचिवालयातून (मंत्रालयातून) मुंबईतील प्रसिद्ध एअर इंडिया इमारतीत स्थलांतरित होणार आहे.
एअर इंडियाची ही इमारत नरिमन पॉइंटजवळ आहे. एअर इंडियाचे खासगीकरण आणि टाटा समूहाद्वारे त्याचे अधिग्रहण झाल्यानंतर, तिची मुख्य व्यवसायाशी थेट संबंधित नसलेली मालमत्ता 'एअर इंडिया ॲसेट्स होल्डिंग लिमिटेड' (AIAHL) कडे हस्तांतरित करण्यात आलीय.
मुख्यमंत्र्यांचं कार्यालय दक्षिण मुंबईतील महत्त्वाच्या भागांमध्ये आहे. मात्र कार्यालयीन कामासाठी जागेची कमतरता जाणवतेय. यामुळे महाराष्ट्र सरकारने गेल्या महिन्यात नरिमन पॉइंट येथे समुद्रकिनारी असलेली २३ मजली व्यावसायिक इमारत १,६०१ कोटी रुपयांना खरेदी केली. फडणवीस यांच्या कार्यालयासह सध्या मंत्रालयाच्या बाहेर कार्यरत असलेले सर्व सरकारी विभागही या इमारतीत स्थलांतरित केले जातील. या निर्णयामुळे भाड्यापोटी २०० कोटी रुपयांची बचत होण्याची अपेक्षा आहे.
महाराष्ट्र सरकारचे मंत्रालय १९५५ मध्ये बांधण्यात आले होते, परंतु जागेच्या कमतरतेमुळे राज्य सरकारला आता आसपासच्या परिसरातील सुमारे नऊ लाख चौरस फूट जागा भाड्याने घ्यावी लागली आहे. या पार्श्वभूमीवर, मुख्यमंत्री कार्यालय स्थलांतरित करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. या संपूर्ण योजनेबाबत मुख्य सचिवांच्या उपस्थितीत एक महत्त्वाची आढावा बैठक घेतली जाणार आहे.
मुख्यमंत्र्यांचे कार्यालय सर्वात वरच्या मजल्यावर उभारले जाईल, तर २२ व्या मजल्यावर १३,३६३ चौरस फूट क्षेत्रफळाचा मंत्रिमंडळ कक्ष बांधला जाणार आहे. महाराष्ट्र सार्वजनिक बांधकाम विभागाचे (PWD) मंत्री शिवेंद्रसिंह भोसले यांनी म्हटलंय,"एअर इंडियाची इमारत महाराष्ट्र सरकारकडे हस्तांतरित होणे ही राज्याची प्रशासकीय पायाभूत सुविधा बळकट करण्याच्या दिशेने एक महत्त्वपूर्ण पायरी आहे."
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.