
सामनाच्या दाव्यानुसार, महायुती सरकारमध्ये ८ मंत्र्यांना पदावरून हटवले जाणार
राहुल नार्वेकर यांना मंत्री तर, मुनगंटीवार यांना अध्यक्षपद मिळण्याची शक्यता
शिंदे आणि अजित पवार गटातील काही नेत्यांचीही मंत्रिमंडळातून हकालपट्टी होणार
या राजकीय उलथापालथीमुळे महाराष्ट्राच्या राजकारणात मोठी खळबळ
राज्यातील महायुती सरकारमध्ये लवकरच मंत्रिमंडळ फेरबदल होणार असल्याचा दावा सामनातील लेखातून करण्यात आला आहे. गेल्या काही दिवसांपासून राज्याच्या राजकारणात घडत असलेल्या घडामोडींच्या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी धक्कातंत्राची रणनीती आखल्याचा उल्लेख या लेखात करण्यात आला आहे.
या संभाव्य फेरबदलात ८ वादग्रस्त आणि दिग्गज मंत्र्यांची विकेट पडणार असून, नव्या चेहऱ्यांना संधी दिली जाणार असल्याचं बोललं जात आहे. तसेच भाजपच्या २ दिग्गजांबरोबर शिंदे गट आणि अजित पवार गटाच्या काही मंत्र्यांना नारळ दिला जाईल, असा दावाही या लेखात करण्यात आला आहे. त्यामुळे राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे.
विधानसभेत महायुतीला घवघवीत यश मिळालं. मात्र, त्यानंतर महायुतीतील नेते काही ना काही कारणांमुळे चर्चेत राहिले. त्यांच्या वादग्रस्त भूमिका आणि वर्तनामुळे सामान्य जनतेमध्ये त्यांच्याबाबत चुकीचा संदेश जात होता. मुख्यमंत्र्यांनी दिलेल्या १०० दिवसांच्या कार्यक्रमात काही मंत्र्यांची कामगिरी समाधानकारक नसल्याचं आढळून आलं. या बाबी लक्षात घेता मंत्रिमंडळात खांदेपालट होण्याची शक्यता आहे, असा दावाही करण्यात आला आहे.
आगमी स्थानिक स्वराज्या संस्थांच्या पार्श्वभूमीवर इतर पक्षातील दिग्गज नेत्यांना भाजपमध्ये प्रवेश देऊन त्यांना मंत्रिमंडळात जागा दिली जाईल, अशी माहिती आहे. तर, शिंदे गटातील ४ मंत्र्यांना संभाव्य फेरबदलात नारळ दिला जाण्याची शक्यता आहे. यात मंत्री संजय शिरसाट, मंत्री भरत गोगावले, मंत्री दादा भुसे, गृहराज्यमंत्री योगेश कदम यांना नारळ दिला जाण्याची शक्यता सामनाच्या लेखातून वर्तवण्यात आली आहे.
तर, अजित पवार गटातील देशमुख प्रकरणात अडकलेले आमदार धनंजय मुंडे यांचं आधीच मंत्रिपद गेलं. दरम्यान, सध्या सतत वादग्रस्त ठरणारे माणिकराव कोकाटे यांच्या मंत्रिपदावर टांगती तलवार असल्याचं बोललं जात आहे. नरहरी झिरवाळ यांचंही मंत्रिपद जाण्याची शक्यता आहे. तसेच मंत्री नितेश राणे आणि मंत्री जयकुमार गोरे यांचंही मंत्रिपद धोक्यात असल्याचा दावा करण्यात आला आहे.
फेरबदलात विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकरांची मंत्रिपदावर वर्णी लागणार असल्याचं बोललं जात आहे. त्यांच्या जागी माजी मंत्री सुधीर मुनगंटीवार यांची वर्णी लागण्याची चर्चा आहे. दरम्यान, सामनाच्या लेखातून केलेल्या दाव्यामुळे राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.