

131 किमी लांबीच्या प्रकल्पासाठी सर्वेक्षण सुरू.
45 गावांमधून रेल्वे मार्ग जाणार असून 334 हेक्टर जमीन संपादित होणार.
नाशिक-मुंबई रेल्वे प्रवास अधिक जलद आणि सुलभ होणार.
मुंबई ते उत्तर आणि पूर्व भारताला जोडणाऱ्या महत्त्वाच्या रेल्वेमार्गावरील वाहतूक कोंडी कमी करण्यासाठी केंद्र सरकारने प्रकल्प हाती घेतला आहे. कसारा-मनमाड दरम्यान तिसरी आणि चौथी रेल्वेमार्गिका उभारण्यासाठी रेल्वे मंत्रालयाकडून सर्वेक्षण सुरू करण्यात आले आहे. १३१ किलोमीटर लांबीच्या या महत्त्वाकांक्षी प्रकल्पासाठी सुमारे ३३४ हेक्टर जमीन संपादित केली जाणार असल्याची माहिती समोर आलीय.
मुंबई ते भुसावळ हा मध्य रेल्वेचा सर्वाधिक वर्दळीचा मार्ग मानला जातो. या मार्गावर दररोज शेकडो प्रवासी आणि मालवाहतूक रेल्वेगाड्या धावतात. पण सध्या उपलब्ध असलेल्या दोन जुन्या मार्गिकांमुळे रेल्वे प्रशासनाला गाड्यांचे नियोजन करताना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागतो. विशेषतः कसारा ते इगतपुरी या घाट विभागात रेल्वेगाड्यांचा वेग कमी होतो असतो. बहुतेकदा विलंबही होत असतो. याचा थेट फटका प्रवाशांना बसत आहे. रेल्वे वाहतुकीवर ताण वाढतोय. ही समस्या सोडवण्यासाठी केंद्र सरकारने नव्या रेल्वेमार्गिकांच्या प्रकल्पाला मंजुरी दिलीय.
केंद्रीय मंत्रिमंडळाने फेब्रुवारी महिन्यातच कसारा ते मनमाड दरम्यान नव्याने दोन रेल्वेमार्गिका उभारण्यास हिरवा कंदील दिला. या प्रकल्पासाठी तब्बल १० हजार १५४ कोटी रुपयांचा निधी मंजूर करण्यात आला आहे. पुढील पाच वर्षांत हे काम पूर्ण करण्याचे उद्दिष्ट ठेवण्यात आले आहे. या प्रकल्पासाठी आवश्यक सर्वेक्षण, भूसंपादन आणि तांत्रिक प्रक्रिया पूर्ण करण्यास रेल्वे मंत्रालयाने तयारी सुरू केली आहे. सर्वेक्षण पूर्ण झाल्यानंतर भूसंपादनाचा प्रस्ताव जिल्हा प्रशासनाकडे पाठवला जाईल, अशी माहिती सूत्रांनी दिली आहे.
नव्या रेल्वेमार्गिकांमुळे रेल्वेगाड्यांचा वेग वाढण्यास मदत होणार असून नाशिक ते मुंबई रेल्वे प्रवास अधिक जलद होईल. रेल्वे विभागाच्या नियोजनानुसार २०३० पर्यंत या मार्गावरील प्रवासाचा चेहरामोहरा बदलू शकतो.
या प्रकल्पासाठी नाशिक जिल्ह्यामधील पाच तालुक्यातील ४५ गावांमध्ये जमीन अधिग्रहण केले जाणार आहे. त्यात इगतपुरी तालुक्यातील ४, नाशिक तालुक्यातील १६, निफाडमधील १७, चांदवडमधील ७ आणि नांदगाव तालुक्यातील एका गावाचा समावेश आहे.
प्रकल्पाअंतर्गत कसारा ते नांदगाव बुद्रुक दरम्यान बोगदा उभारण्यात येईल. त्यानंतर पुढील भागात विद्यमान रेल्वेमार्गाला समांतर नवीन रेल्वेमार्गिका उभारल्या जाणार आहेत. तसेच नव्या मार्गिकांमुळे भविष्यात नाशिक ते मुंबई लोकल रेल्वे सेवा सुरू करण्याचा मार्गही मोकळा होण्याची शक्यता आहे.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.