संघर्ष गागुर्डे
कल्याण : मुंबई शहर परिसरात जोरदार पाऊस सुरु असून कल्याणमध्ये देखील पावसाने हाहाकार माजविला आहे. जोरदार पावसामुळे कल्याण- अहिल्यानगर महामार्गावर उल्हास नदीवरील पूल पाण्याखाली गेला आहे. त्यामुळे खबरदारीचा उपाय म्हणून सदरचा महामार्ग रहदारीसाठी तातडीने बंद करण्यात आला आहे. या मार्गावरील वाहतूक अन्य मार्गाने वळविण्यात आली आहे.
कल्याण- डोंबिवली परिसरात गेल्या काही दिवसांपासून जोरदार पाऊस सुरु आहे. आज देखील पावसाने हजेरी लावली आहे. दरम्यान या पावसामुळे उल्हास नदीला मोठा पूर आला आहे. कालपर्यंत नदीतील पाण्याचा प्रवाह इशारा पातळीच्या खाली होता. मात्र पावसामुळे पाण्याच्या प्रवाहात सातत्याने वाढ होत असून आज उल्हास नदीवरील कल्याण- अहिल्यानगर महामार्गाच्या पुलावरून पाणी वाहत आहे. यामुळे रहदारी बंद करण्यात आली आहे.
प्रशासनाकडून सतर्कतेचा इशारा
दरम्यान, नदीकाठी राहणाऱ्या नागरिकांना प्रशासनाकडून सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे. या नदीवर नव्याने पूल उभारण्याचे काम सुरू असून त्या ठिकाणी तब्बल ३० कामगार अडकले होते. स्थानिकांच्या मदतीने या सर्व कामगारांना सुरक्षित स्थळी हलवले आहे. मात्र पावसाचा जोर कमी होत नसल्याने पाण्याचा प्रवाह देखील वाढत असून नदीचा पूर कमी झाल्यानंतर त्याठिकाणची वाहतूक सुरळीत केली जाणार आहे.
कराड शहरातील मंदिरे पाण्याखाली
सातारा जिल्ह्याला आज ऑरेंज अलर्ट देण्यात आला असून पश्चिम घाट परिसरात पावसाची रिपरिप सुरूच आहे. कोयना धरणाचे सर्व वक्र दरवाजे १३ फुटांनी उचलून ९५ हजार ३२१ पाण्याचा विसर्ग कोयना नदीपात्रात सोडला जात असल्यामुळे नद्यांची पाणी पातळी मोठ्या प्रमाणावर वाढत आहे. कराड शहरातील कृष्णाबाई मंदिर आणि मारुतीचं मंदिर पाण्याखाली गेले आहेत. कोयना नदीला आणि कृष्णा नदीला आलेल्या पुराचे पाणी पाहण्यासाठी नागरिकांनी मोठी गर्दी केली.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.