हिंगोली : हिंगोलीच्या नांदुरा गावात पाण्याची समस्या निर्माण झाली आहे. गावासाठी असलेल्या शासकीय विहिरीतून गावात पाणीपुरवठा केला जात नाही. प्रशासनाकडे याबाबत वारंवार प्रश्न मांडल्यानंतर देखील पाण्याची समस्या अजूनही सुटलेली नाही. यामुळे गावातील संतप्त महिलांनी आज आंदोलन छेडले. यात गावातील काही महिलांनी गावच्या जलकुंभावर चढून शोले स्टाईल आंदोलन करत प्रशासनाचा निषेध केला.
हिंगोली जिल्ह्यातील नांदुरा गावात केंद्र शासनाच्या जलजीवन मिशन योजनेअंतर्गत ग्रामस्थांना शुद्ध पाण्याचा पुरवठा व्हावा; यासाठी लाखो रुपये खर्च करून जलजीवन मिशन योजना राबविण्यात आली. मात्र या गावातील शासकीय विहीर खाजगी व्यक्तीने ताब्यात घेत नागरिकांना पाणीपुरवठा करण्याऐवजी स्वतःच्या शेतात पिकांना पाणी द्यायला सुरुवात केली आहे. यामुळे गावाला पिण्यासाठी पाणी मिळत नसल्याचा आरोप या महिला ग्रामस्थ आंदोलकांनी केला आहे.
प्रशासनाविरोधात घोषणाबाजी
गावात पाणी योजना असून देखील पाणी मिळत नसल्याने ग्रामस्थांना पाण्यासाठी भटकंती करावी लागत आहे. प्रशासनाकडे याबाबत तक्रार करून देखील उपयोग होत नसल्याने महिला ग्रामस्थांनी पाण्यासाठी शोले स्टाईल आंदोलन केले आहे. गावातील महिलांनी चक्क गावातील शंभर फूट उंच असलेल्या जलकुंभावर चढत प्रशासनाच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी केली आहे.
प्रशासन गावात दाखल
दरम्यान या महिला ग्रामस्थांच्या आंदोलनानंतर प्रशासन तातडीने नांदुरा गावात दाखल झाले असून आंदोलन करणाऱ्या महिलांची प्रशासनाकडून समजूत काढण्यात येत आहे. मात्र गावाला नियमीत शुद्ध पाण्याचा पुरवठा होत नाही; तोपर्यंत आपण जलकुंभावरून खाली उतरणार नसल्याचा पवित्रा या महिलांनी घेतल्याने मोठा पेचप्रसंग निर्माण झाला आहे. यामुळे प्रशासनाकडून आता काय भूमिका घेतली जाते; हे पाहणे महत्वाचे ठरेल.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.