हिंगोली : हिंगोली जिल्ह्यात कालपासून जोरदार पावसाला सुरवात झाली आहे. यामुळे अनेक भागात पूरस्थिती निर्माण झाली असून वसमतमध्ये अनेक गावात पाणी शिरले असून नागरिकांच्या घरांना पाण्याचा वेढा घातला आहे. तर सकाळपासून जोरदार पाऊस होत आल्याने औंढा तालुक्यातील बेरोळा गावकऱ्यांचा संपर्क तुटला आहे.
हिंगोली जिल्ह्यात मागील तीन दिवसांपसून मुसळधार पाऊस सुरू आहे. यात सलग तिसऱ्या दिवशी देखील जिल्ह्यात सर्वदूर पावसाने हजेरी लावली आहे. तर आठवे ज्योतिर्लिंग असलेल्या औंढा नागनाथ शहरात पावसामुळे जनजीवन विस्कळीत झाले आहे. शहरातील औंढा नागनाथ मंदिर परिसरात जाणाऱ्या रस्त्यावर पावसामुळे मोठ मोठे खड्डे पडल्याने नागरिकांना प्रवास करणे अशक्य बनले असून, नगरपंचायत प्रशासनाच्या दुर्लक्षामुळे अनेक भागात नाल्यांचे पाणी नागरिकांच्या घरात शिरले आहे.
औंढा तालुक्यातील बेरोळा गावकऱ्यांचा संपर्क तुटला
जिल्ह्यात सुरु असलेल्या मुसळधार पावसामुळे औंढा नागनाथमध्ये सलग तिसऱ्या दिवशी जनजीवन विस्कळीत झाले आहे. दरम्यान औंढा तालुक्यातील बेरोळा गावकऱ्यांचा संपर्क तुटला आहे. गावातील ओढ्यावर पुराचे पाणी वाहायला सुरुवात झाली असल्याने गावातील रुग्णांना रुग्णालयातही जाता येत नसल्याची परिस्थिती निर्माण झाली आहे. यामुळे प्रशासनाने तातडीने मदत पुरवण्याची मागणी करण्यात येत आहे.
गावात पाणी शिरल्याने घरांना पाण्याचा वेढा
हिंगोलीत सकाळी मुसळधार पाऊस कोसळत असल्याने वसमतमध्ये अनेक गावात पुराचे पाणी घुसले आहे. तर नागरिकांच्या घरांना पाण्याचा वेढा बसला आहे. यामुळे संसारोपयोगी साहित्य पाण्यात गेले आहे. तर शेतीला देखील नद्यांचे स्वरूप आले आहे. वसमत तालुक्यातील टेंभुर्णी, वडद, नागापूर, कुडाळा तर औंढा तालुक्यातील काही गावांमध्ये पाणी शिरल्याने प्रचंड नुकसान झाल्याचा अंदाज आहे.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.