हिंगोलीच्या पार्टी गावात शेतकऱ्याची विष प्राशन करून आत्महत्या
सरकारी मदत वेळेत न आल्याने आणि दिवाळीसाठी पैसे नसल्याने आर्थिक विवंचनेत होते
अतिवृष्टीमुळे शेतीचं नुकसान आणि कर्जबोजा यामुळे सांगळे नैराश्यात गेले
घटनेनंतर शेतकरी कुटुंबावर शोककळा पसरली असून प्रशासनावर तीव्र प्रश्न उपस्थित होत आहेत
राज्यातील संभाजीनगरमध्ये काही दिवसांपूर्वी दिवाळी सणासाठी, मुलांच्या नवीन कपड्यांसाठी पैसे नसल्याने एका निष्पाप शेतकरी वडिलांनी आपल्या आयुष्याचा दोर कापला. अशीच एक घटना हिंगोलीमध्ये घडली आहे. दिवाळी सणात शेतकऱ्याच्या खात्यात सरकारने जाहीर केलेली मदत पोहोचली नाही, त्यामुळे लहान मुलांना कपडे खरेदी करू न शकल्याच्या विवंचनेतून एका निष्पाप शेतकरी वडिलांनी विष प्राशन करून आत्महत्या केली. या घटनेनंतर शेतकरी कुटुंबियांवर शोककळा पसरली आहे. मृत शेतकऱ्याचं नाव पांडुरंग सांगळे आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, गेल्या काही महिन्यात पावसाने महाराष्ट्राला झोडपले. या अतिवृष्टीत शेतकऱ्याचा हातातोंडाशी आलेला घास पाण्यात गेला. यामुळे चिंतेत असलेल्या बहुतेक शेतकऱ्यांनी आत्महत्या केली. शेतकऱ्यांच्या आत्महत्येच्या गंभीर प्रश्नांकडे पाहून सरकारने बळीराजाला मदत जाहीर केली. मात्र हिंगोलीच्या पार्टी गावात एकीकडे साडेचार एकर शेती असलेल्या पांडुरंग सांगळे यांनी शेतात पेरणी करण्यासाठी खरिपाच्या हंगामात स्टेट बँक ऑफ इंडिया चे पीक कर्ज घेतले. तर दुसरीकडे मात्र अतिवृष्टीने शेतात काहीच शिल्लक राहिले. या कर्जाच्या बोज्यात सांगळे आर्थिक संकटात सापडले त्यातून त्यांना नैराश्य आलं.
ऐन दिवाळीत मुलाबाळांना कपडे घेण्यासाठी आणि दिवाळी सण साजरा करण्यासाठी सांगळे यांच्याकडे काहीच उरलं नाही.पैशाअभावी मुलांना सणाला कपडे, खाऊ न घेऊ शकल्याने सांगळे यांच्या मनात नाराजी होती. सांगळे यांच्या खात्यात दिवाळी उलटून गेली तरी एकही रुपया न आल्याने ते चिंताग्रस्त झाले. या विवंचनेतून सांगळे यांनी टोकाचं पाऊल उचललं. आज सकाळी सात वाजता शेतात जाऊन सांगळेंनी विष प्राशन केलं ज्यामध्ये त्यांचा उपचारा आधीच मृत्यू झाला.
दरम्यान सांगळे यांच्या जाण्याने त्यांच्या कुटुंबीयांनी शासकीय रुग्णालयात टाहो फोडला. या घटनेमुळे पुन्हा एकदा मराठवाड्यातील शेतकऱ्यांचा आक्रोश पुढे आला असून, शेतकऱ्यांच्या आत्महत्येचा प्रश्न गंभीर बनला आहे. या घटनेनंतर आता तरी निष्पाप शेतकऱ्यांना सरकार मदत करणार का ? की अशाप्रकारच्या आत्महत्या होईपर्यंत वाट बघणार? शेतकऱ्याच्या डोक्यावरचा कर्जाचा बोजा अजून किती मुलांच्या डोक्यावरच छत्र हरवून घेणार? अशा प्रकारचे प्रश्न उपस्थित होत आहेत.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.