शुभम देशमुख
गोंदिया : राज्यात मागील आठवड्यात मुसळधार पाऊस झाला. यात गोंदिया जिल्ह्यात देखील परतीच्या पावसाने घात केला. जिल्ह्यातील ५१ गावांमध्ये ४७० हेक्टर शेत जमिनीचे नुकसान झाले असून यात ८७६ शेतकरी बाधित झाले आहेत. दरम्यान कृषी विभागाकडून पंचनाम्यांची प्रक्रिया सुरू करण्यात आली असून गोंदिया कृषी विभागाच्या प्राथमिक अहवालानुसार शेतीचे मोठे नुकसान झाले आहे.
राज्यात साधारण दोन आठवडे मुसळधार पावसाने झोडपून काढले आहे. यामध्ये शेती पिकांचे आतोनात नुकसान झाले असून शेतकरी आर्थिक संकटात सापडला आहे. तर गोंदिया जिल्ह्यात सप्टेंबर महिन्याच्या २५ ते २८ तारखेदरम्यान झालेल्या परतीच्या पावसामुळे शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. यामुळे शेतकरी संकटात सापडला असून मदतीची अपेक्षा आहे.
८७६ शेतकऱ्यांचे नुकसान
दरम्यान कृषी विभागाकडे आलेल्या प्राथमिक माहितीनुसार जिल्ह्यातील ५१ गावांमध्ये सुमारे ४७० हेक्टर शेत जमिनीवरील पिकांचे नुकसान झाले आहे. यामध्ये ८७६ शेतकरी बाधित झाल्याचे स्पष्ट झाले आहे. सध्या क्षेत्रीय स्तरावर पंचनाम्याची प्रक्रिया सुरू असून, लवकरच याबाबतचा अंतिम अहवाल कृषी विभागाकडून सादर केला जाणार आहे.
कृषी विभागाचे शेतकऱ्यांना आवाहन
याशिवाय, ऑक्टोबर महिन्यात देखील झालेल्या पावसामुळे उभ्या पिकांचे नुकसान झाले. तर जिल्हा कृषी अधीक्षकांनी शेतकऱ्यांना आवाहन केले आहे की, ज्यांच्या शेतात नुकसान झाले आहे. त्यांनी आपल्या भागातील सहायक कृषी अधिकाऱ्यांशी संपर्क साधावा आणि नुकसानग्रस्त क्षेत्राची माहिती त्वरित द्यावी. जेणेकरून पंचनामे करून नुकसानभरपाईच्या कार्यवाहीस गती देता येईल.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.