एकनाथ शिंदे यांच्या ऑपरेशन टायगरमध्ये मोठा ट्विस्ट आला
ठाकरेंच्या २ खासदारांनी शिंदे गटात जाण्यास स्पष्ट नकार दिला
राजाभाऊ वाजे यांनी उद्धव ठाकरेंसोबत राहणार असल्याचे सांगितले
तर संजय दिना पाटील हे देखील शिंदेसेनेत जाणार नसल्याची चर्चा
पश्चिम बंगालमध्ये ममता बॅनर्जी यांचा पक्ष फूटल्यानंतर महाराष्ट्राच्या राजकारणात देखील मोठी उलथापालथ झाली आहे. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या ऑपरेशन टायगरने उद्धव ठाकरेंना मोठा धक्का दिला आहे. उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखालील शिवसेना ठाकरे गटाच्या ९ लोकसभा खासदारांपैकी ६ खासदार त्यांची साथ सोडण्याच्या तयारीत असून ते शिंदेसेनेत प्रवेश करणार असल्याच्या जोरदार चर्चा सुरू आहेत. हे सर्व खासदार सध्या दिल्लीत आहेत. पण अद्याप त्यांच्या प्रवेशाबाबतचे वृत्त समोर आले नाही. अशातच आता ठाकरे गटाच्या २ खासदारांनी मोठं विधान केले आहे.
शिवसेना उद्धव ठाकरे गटात फूट पडण्याच्या चर्चा सुरू असताना उद्धव ठाकरेंच्या दोन लोकसभा खासदारांनी शिंदे गटात प्रवेश करण्यास नकार दिला. नाशिकचे लोकसभा खासदार राजाभाऊ वाजे आणि मुंबई ईशान्यचे लोकसभा खासदार संजय दिना पाटील यांनी शिंदे गटात सामील होण्याच्या चर्चा फेटाळून लावल्या आहेत. हे दोन्ही खासदार शिंदेगटात जाणार नसल्याची सध्या चर्चा होऊ लागली आहे. त्यांनी स्वत: माध्यमांसमोर येऊन कोणत्याही पक्षात जाणार नसल्याचे स्पष्ट केले.
दिल्लीमध्ये दाखल झाल्यानंतर राजाभाऊ वाजे यांनी सांगितले की, 'मी उद्धवजींसोबत आहे आणि त्यांच्यासोबतच राहीन. माझा इतर कोणाशीही संपर्क नाही. मला शिंदेजींकडून कोणताही फोन आलेला नाही किंवा त्यांनी माझ्याशी संपर्क साधण्याचा प्रयत्नही केलेला नाही. मी नाराज नाही आणि शिवसेनेसोबतच आहे. मी एका समितीच्या बैठकीसाठी दिल्लीत आलो आहे.'
राजाभाऊ वाजे आणि संजय दिना पाटील यांच्याव्यतिरिक्त अनिल देसाई आणि अरविंद सावंत हे देखील उद्धव यांच्यासोबत राहण्याची शक्यता आहे. शिवसेना ठाकरे गटाच्या लोकसभा खासदारांची फळी मोडण्यासाठी ९ पैकी ६ खासदार म्हणजेच पक्षातील दोन-तृतीयांश खासदारांना पक्ष सोडावा लागेल. पण वाझे आणि पाटील यांनी पक्ष सोडण्यास नकार दिल्याने चित्र बदलण्याची शक्यता आहे. यामुळे एकनाथ शिंदे यांचे 'ऑपरेशन टायगर' यशस्वी होण्याची शक्यता कमी दिसत आहे.
शिवसेना ठाकरे गटाच्या सर्व लोकसभा खासदारांना गुरुवार १८ जून रोजी बैठकीसाठी दिल्लीत बोलावण्यात आले आहे. ही बैठक दिल्लीतील पक्षाच्या कार्यालयात सकाळी ११ वाजता होणार आहे. ठाकरेंचे खासदार संजय राऊत यांनी दावा केला की, प्रत्येक खासदाराला विकत घेण्यासाठी ५० कोटी रुपयांची किंमत ठरवण्यात आली आहे. त्यासाठी १५ कोटी रुपयांची आगाऊ रक्कम देण्यात आली आहे. बंडखोर नेत्यांची किंमत ५०,००० रुपये सुद्धा नाही आणि शिवसेना आणि टीएमसीच्या ब्रँड टॅगमुळेच त्यांचे मूल्य वाढले आहे.'