मयुरेश कडव
बदलापूर : महाडच्या सावित्री नदीवरील पूल कोसळल्याने बस नदीत कोसळून मोठी दुर्घटना घडली होती. या घटनेची पुनरावृत्ती होण्याची शक्यता वांगणी- बदलापूर रस्त्यावरील पुलावर निर्माण झाली आहे. कारण सार्वजनिक बांधकाम विभागाच्या दुर्लक्षामुळे वांगणी- बदलापूर रस्ता मृत्यूचा सापळा बनला असून वांगणीमधल्या गणेश घाटाजवळ पुलावरील लोखंडी रेलिंगच गायब झाले आहेत. त्यामुळे या ठिकाणी मोठ्या अपघाताची भीती व्यक्त होत आहे.
कल्याण- कर्जत राज्य महामार्गावरील वांगणी- बदलापूर रस्त्याच्या काँक्रिटीकरणाचे काम गेल्या वर्षभरापासून सार्वजनिक बांधकाम विभागाकडून हाती घेण्यात आले आहे. हे काम अद्यापपर्यंत सुरू आहे. मात्र ठेकेदाराची मनमानी आणि सार्वजनिक बांधकाम विभागाच्या दुर्लक्षामुळे या रस्त्याच्या कामात दर्जा राखला जात नसल्याचा आरोप स्थानिकांकडून केला जात आहे. रस्त्याचे काम निकृष्ट दर्जाचे होत असल्याची ओरड स्थानिक नागरिकांकडून होत आहे.
पुलावरील लोखंडी रेलिंग गायब
दरम्यान या रस्त्यावरील गणेश घाटाजवळ असलेल्या पुलावरील एका बाजूचे लोखंडी रेलिंग पूर्णपणे गायब झाले आहेत. या रस्त्यावरून भरधाव वेगात वाहनं जात असतात. शिवाय पावसाळ्यात हा ओढा दुथडी भरून वाहत असतो. या ठिकाणी एखादे वाहन ओढ्यात कोसळले, तर सावित्री नदी दुर्घटनेसारखी मोठी घटना होण्याची शक्यता नाकारता येत नाही.
पुलावर संरक्षक कठड्याची मागणी
पुलावरील लोखंडी रेलिंग गायब झाल्याने या पुलावर सुरक्षा म्हणून नाही. अर्थात भरधाव वाहन थेट पुलावरून खाली कोसळण्याची शक्यता असल्याने अपघाताची भीती लक्षात घेऊन सार्वजनिक बांधकाम विभागाने या पुलाभोवती तत्काळ संरक्षक कठडा बांधावा किंवा लोखंडी रेलिंग लावावे; अशी मागणी स्थानिकांकडून केली जात आहे. मात्र सार्वजनिक बांधकाम विभाग याकडे कधी लक्ष देणार हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.