अमरावती/ परभणी : बच्चू कडू हे शेतकरी कर्जमाफी आणि दिव्यांगांना सहा हजार रुपये मानधन यासह १७ मागण्या घेऊन पाच दिवसांपासून उपोषणाला बसले आहे. तर बच्चू कडू यांना राज्यभरातून पाठिंबा वाढत आहे. तर दुसरीकडे त्यांची तब्येत खालावत चालली आहे. मात्र आंदोलनाची दखल राज्य सरकारकडून घेण्यात आली नसल्यामुळे प्रहारचे कार्यकर्ते आक्रमक झाले असून ठिकठिकाणी आंदोलनाला सुरवात केली आहे.
बच्चू कडू यांच्या आंदोलनाचा पाचवा दिवस आहे. आजच्या दिवशी राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे कर्जत जामखेडचे आमदार रोहित पवार यांनी आंदोलनस्थळी दाखल होऊन बच्चू कडू यांची भेट घेत त्यांच्याशी चर्चा केली. तसेच बच्चू कडू यांच्या प्रकृतीची रोहित पवार यांच्याकडून विचारपूस करण्यात आली. तसेच राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचा बच्चू कडू यांच्या आंदोलनाला पाठिंबा असल्याचे त्यांनी यावेळी सांगितले.
कार्यकर्ते व शेतकऱ्यांचा रास्ता रोको
सरकार कडून अद्यापही उपोषणाची दखल न घेतल्याने प्रहार आक्रमक झाले आहेत. अमरावती - परतवाडा महामार्गवर प्रहारकडून रस्ता रोको आंदोलन करण्यात आले. शेतकऱ्यांनी व प्रहारच्या कार्यकर्त्यांनी बससमोर झोपून रस्ता अडविला होता. यावेळी सरकार वोरोधी जोरदार घोषणाबाजी केली. अचानक करण्यात आलेल्या आंदोलनामुळे गोंधळ उडाला होता. तर मोठ्या संख्येने कार्यकर्ते रस्त्यावर आले असता पोलिसांकडून धरपकड सुरु करण्यात आली.
धामणगावात टायर जाळून आंदोलन
दरम्यान धामणगाव शहरातील मुख्य असलेल्या शास्त्री चौकात प्रहारच्या कार्यकर्त्यांनी रस्त्यावर टायर जाळत चक्काजाम केला. कार्यकर्त्यांनी यावेळी सरकार विरोधात घोषणाबाजी करण्यात केली. सरकारने शेतकऱ्यांचा सातबारा कोरा करावा, दिव्यांगांना सहा हजार मानधन देण्यात यावं अशा विविध मागण्या यावेळी करण्यात आल्या. तर बच्चू कडूच्या आंदोलनाची दखल घेऊन सरकारने मागण्या मान्य न केल्यास तीव्र आंदोलन करण्याचा इशारा यावेळी देण्यात आला.
परभणीत मुंडन आंदोलन
मागील पाच दिवसापासून बच्चू कडू हे अमरावती येथे विविध मागण्यासाठी आमरण उपोषणास बसले आहेत. पण राज्य सरकारने अद्याप याची दखल घेतली नाही. त्यामुळे परभणीतील प्रहार जनशक्ती पक्षाचे कार्यकर्ते आक्रमक झाले आहेत. त्यांनी आज छत्रपती शिवाजी महाराज पुतळा परिसरात जमा होऊन सरकार विरोधात मुंडन आंदोलन केले आहे. त्याचबरोबर राज्य सरकारने दोन दिवसात दखल घ्यावी; अन्यथा राज्यभर हे आंदोलन पेटल्याशिवाय राहणार नसल्याचेही सांगितले.
कार्यकर्त्यांचे पवनीत पाण्याच्या टाकीवर चढून आंदोलन
भंडारा : बच्चू कडू यांच्या अमरावतीमध्ये सुरू असलेल्या अन्नत्याग आंदोलनाचा आज पाचवा दिवस आहे. या आंदोलनाचे पडसाद आता भंडाऱ्यातही उमटू लागले आहेत. आज पवनी येथील प्रहारच्या कार्यकर्त्यांनी पाण्याच्या टाकीवर चढून वीरूगिरी आंदोलन केलं. या आंदोलनामध्ये दिव्यांग बांधवांसह प्रहारचे कार्यकर्ते आणि पदाधिकारी मोठ्या संख्येने सहभागी झाले होते. दरम्यान, पवनी पोलिसांनी सर्व प्रहार कार्यकर्त्यांना ताब्यात घेतं सूचना पत्रावर सोडून आंदोलन थांबविले.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.