चंद्रपूर : नागरिकांना स्वच्छ व शुद्ध पाणी पुरवठा करण्यासाठी योजना आखल्या जातात. मात्र चंद्रपूर जिल्ह्यात पिण्याचे पाणी मोठ्या प्रमाणात दूषित असल्याचे आढळून आले आहे. भूजल सर्वेक्षण विभागाकडून करण्यात आलेल्या तपासणीत जिल्ह्यातील एकूण ५९८ गावे जल प्रदूषणाने बाधित असल्याचा धक्कादायक निष्कर्ष समोर आला आहे. अर्थात या गावांमधील नागरिक दूषित पाणी पित असल्याचे समोर आले आहे.
भूजल सर्वेक्षण विभागाने नुकतेच चंद्रपूर जिल्ह्यात पिण्याच्या पाण्याचे स्रोत तपासले. यासाठी २१ हजार १६८ नमुने घेण्यात आले. या नमुन्यांचा अभ्यास केल्यावर समोर आलेले निष्कर्ष अतिशय धक्कादायक आहेत. यात सर्वात गंभीर म्हणजे ३९३ नमुने फ्लोराइडयुक्त आढळून आले आहेत. केंद्र आणि राज्य शासनाच्या योजना स्वच्छ पाणी देण्याचा दावा करीत असले तरी वास्तविकता किती भयानक आहे, हे यावरून दिसून येते.
विहीर, बोअरवेलमधील पाणीही दूषित
दरम्यान सर्व माहिती आता भूजल सर्वेक्षण विभागाने आपल्या अधिकृत संकेतस्थळावर प्रकाशित केली आहे. त्यामुळे एकच खळबळ उडाली. नदीवरून होणारा सार्वजनिक पाणी पुरवठा असो किंवा विहिरी असो वा बोअरवेल. या सर्वच स्रोतांमध्ये विविध प्रकारचे दूषित घटक आढळले आहेत. यावर वेळीच आळा घातला नाही, तर येणाऱ्या पिढ्यांना मोठी किंमत चुकवावी लागू शकते; असा इशारा अभ्यासकांनी दिला आहे.
फ्लोराईडमुळे बळावताय हाडांचे आजार
फ्लोराईड यामुळे हाडांचे आजार बळावतात. दातांचा रंग बदलतो. हाताची बोटे वाकडी होतात. याशिवाय नायट्रेट, क्षार, लोह आणि जीवाणूबाधित पाणी आढळून आले. पुण्यासाठी अयोग्य असे हे पाणी आजही नागरिक पीत आहेत. त्यामुळे आरोग्यावर त्याचा गंभीर परिणाम होत आहे.
- तपासलेले एकूण नमुने : २१,१६८
- फ्लोराइडयुक्त नमुने : ३९३
- नायट्रेटयुक्त नमुने : ७५५
- क्षारयुक्त नमुने : १००
- लोहखनिजयुक्त : ६
- जिवाणूबाधित नमुने : ३१६
- वरील प्रदूषणाने बाधित एकूण गावे : ५९८
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.