

मधुमेह म्हणजेच डायबेटीज असलेल्या रूग्णांना अनेक समस्यांचा सामना करावा लागतो. यामध्ये किडनीच्या समस्याही आहेत. या आजाराची लक्षणं सुरुवातीला सामान्यांप्रमाणे वाटतात त्यामुळे त्याकडे दुर्लक्ष केलं जातं. मात्र नंतर हा आजार गंभीर होत असल्याचं तज्ज्ञांचं म्हणणं आहे.
बंगळूरूमधील एस्टर आरव्ही रूग्णालयातील नेफ्रोलॉजिस्ट आणि ट्रान्सप्लांट फिजिशियन डॉ. हर्षा कुमार यांनी सांगितलं की, सुरुवातीला मधुमेही रूग्णांमध्ये किडनीच्या समस्येची लक्षणं सौम्य स्वरूपात दिसतात. त्यामुळे या किडनीच्या समस्या आहेत हे लक्षात येत नाही.
डॉ. कुमार यांच्या मते, शरीरात अधिक प्रमाणात द्रव साचणं हे किडनीवर ताण येत असल्याचं पहिलं लक्षण आहे. किडनी नीट काम करत नसल्यास शरीरातील अतिरिक्त पाणी बाहेर टाकलं जात नाही. त्यामुळे पायांवर किंवा डोळ्यांच्या आसपास सूज दिसू शकते.
लघवीत फेस येणं हे देखील किडनीच्या समस्येचं लक्षण आहे. याचा अर्थ शरीरातून प्रोटीन गळत असल्याचं लक्षण आहे. रात्री वारंवार लघवीला जाणं, लघवीचा रंग गडद होणं किंवा लघवीचं प्रमाण कमी होणं याकडेही दुर्लक्ष करू नये, असे डॉ. कुमार यांनी सांगितलंय.
सतत थकवा येणे, अशक्तपणा जाणवणे किंवा कमरेच्या खालच्या भागात जडपणा वाटणे हीदेखील किडनीच्या समस्येची लक्षणं शकतात. रक्तदाब थोडासा जरी वाढत असेल तरी त्याकडे गंभीरतेने लक्ष देण्याची गरज आहे. कारण रक्तदाब नियंत्रणात ठेवण्यात किडनीची महत्त्वाची भूमिका असते.
मधुमेहाचा परिणाम किडनीवर होऊ लागला आहे की नाही हे समजून घेण्यासाठी नियमित तपासणी करणं अत्यंत आवश्यक असल्याचं डॉ. कुमार यांनी सांगितलंय. युरिन अल्ब्युमिन-टू-क्रिएटिनिन रेशो (UACR) ही चाचणी किडनीच्या नुकसानीचे संकेत देते. तसेच eGFR रक्त चाचणीमधून किडनी रक्तातील घाण किती प्रभावीपणे फिल्टर करते हे समजते. प्रत्येक मधुमेही रुग्णाने वर्षातून किमान एकदा या दोन्ही चाचण्या करून घेतल्या पाहिजेत.
किडनीची समस्या गंभीर टप्प्यात पोहोचल्यावर लक्षणं स्पष्ट दिसू लागतात. यावेळी त्याचा थेट परिणाम दैनंदिन जीवनावर होत असतो. प्रगत अवस्थेत शरीराला तीव्र सूज येणं, मळमळ किंवा उलट्या होणं, श्वास घेण्यास त्रास होणं, अंगाला सतत खाज येणं, भूक मंदावणं आणि रक्तदाब वाढणं अशी लक्षणे दिसू शकतात.
डॉ. कुमार यांनी सांगितलं की, किडनीची कार्यक्षमता किती वेगाने कमी होईल यासाठी ठराविक कालावधी नसतो. अनेक मधुमेही रुग्णांमध्ये ही प्रक्रिया वर्षानुवर्षे हळूहळू सुरू असते. पण एकदा स्पष्ट लक्षणं दिसू लागल्यानंतर आजार वाढण्याची शक्यता असते. अशावेळी रूग्णांनी तातडीने डॉक्टरांचा सल्ला घ्यावा.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.