

आजकाल बदलती जीवनशैली, चुकीच्या खाण्याच्या सवयी आणि ताणतणाव यामुळे मधुमेहाचा धोका झपाट्याने वाढताना दिसतोय. विशेषतः टाइप 2 डायबिटीज ही समस्या अनेकांना नकळत जडते. मुख्य म्हणजे याची सुरुवातीची लक्षणं साध्या त्रासासारखी वाटतात त्यामुळे अनेकदा दुर्लक्ष केलं जातं. मात्र वेळेत हे संकेत ओळखले तर पुढे गंभीर आरोग्य समस्या निर्माण होऊ शकतात.
टाइप 2 डायबिटीजमध्ये शरीरात पुरेशा प्रमाणात इन्सुलिन तयार होत नाही किंवा शरीर इन्सुलिनचा योग्य वापर करू शकत नाही. इन्सुलिन हे रक्तातील साखरेचं प्रमाण नियंत्रित करणारं हार्मोन आहे. त्यामुळे शरीरातील साखरेची पातळी वाढते आणि दीर्घकाळ ती नियंत्रणात न राहिल्यास मधुमेह होतो.
जागतिक आरोग्य संघटनेच्या माहितीनुसार, 2022 मध्ये 18 वर्षांवरील सुमारे 14 टक्के प्रौढ व्यक्ती मधुमेहाने ग्रस्त होत्या. तसंच 2021 मध्ये या आजारामुळे थेट 16 लाख लोकांचा मृत्यू झाला होता. त्यामुळे या आजाराची सुरुवातीची लक्षणं वेळेत ओळखणं महत्त्वाचं आहे.
सतत तहान लागणं आणि वारंवार लघवी होणं ही टाइप 2 डायबिटीजची सुरुवातीची सामान्य लक्षणं आहेत. विशेषतः रात्री अनेकदा लघवीला जावं लागणं हे शरीरातील साखरेचं प्रमाण वाढल्याचे संकेत असू शकतात. रक्तातील साखर वाढल्यानंतर किडनी अतिरिक्त साखर बाहेर टाकण्यासाठी अधिक प्रमाणात लघवी तयार करते. त्यामुळे शरीरात पाण्याची कमतरता निर्माण होते आणि सतत तहान लागते. अनेकदा लोक हा त्रास डिहायड्रेशन किंवा युरिन इन्फेक्शन समजून दुर्लक्ष करतात.
सतत थकवा जाणवणे हे देखील मधुमेहाचं महत्त्वाचं लक्षण मानलं जातं. पुरेशी झोप घेतल्यानंतरही शरीरात ऊर्जा नसल्यास त्यामागे रक्तातील वाढलेली साखर कारणीभूत असू शकते. इन्सुलिन योग्य प्रकारे काम करत नसल्याने शरीर अन्नातील साखरेचं ऊर्जेत रूपांतर करू शकत नाही. त्यामुळे पेशींना पुरेशी ऊर्जा मिळत नाही आणि व्यक्ती कायम थकलेली वाटते.
सतत भूक लागणे हे देखील टाइप 2 डायबिटीजचं एक संकेत मानले जाते. जेवल्यानंतरही पुन्हा पुन्हा भूक लागणं हे शरीराला अन्नातून योग्य ऊर्जा न मिळाल्यामुळे घडतं. शरीरातील पेशींना आवश्यक ऊर्जा मिळत नसल्याने मेंदूकडून अन्नाची मागणी अधिक होऊ लागते. त्यामुळे अनेकदा लोक याला फक्त जास्त खाण्याची सवय समजतात, पण हे मधुमेहाचे सुरुवातीचं लक्षण असू शकतं.
हात आणि पायांमध्ये मुंग्या येणे किंवा बधीरपणा जाणवणं हेही धोक्याचे संकेत असू शकतात. रक्तातील वाढलेली साखर हळूहळू नसांवर परिणाम करू लागते. यामुळे हात-पाय सुन्न होणं, झिणझिण्या येणं किंवा टोचल्यासारखं वाटणं असे त्रास जाणवू शकतात.
दृष्टी धूसर होणे हेही मधुमेहाचं एक सुरुवातीचं लक्षण आहे. रक्तातील साखर वाढल्याने डोळ्यांमधील सूक्ष्म रक्तवाहिन्यांवर परिणाम होतो. त्यामुळे डोळ्यांच्या लेन्स किंवा रेटिनामध्ये द्रव साचू शकतो आणि दृष्टी अस्पष्ट दिसू लागते. अनेकदा लोक हा त्रास डोळ्यांवर ताण आल्यामुळे किंवा वाढत्या वयामुळे होत असल्याचे समजतात.
टीप : ही माहिती वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहचवण्याचा प्रयत्न आहे. कुठलाही दावा करत नाही. त्यामुळे कोणतेही उपचार, डाएट आणि औषधं तज्ज्ञांच्या सल्ल्यानं घ्यावीत.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.