

आजच्या काळात वैवाहिक नात्यांचं स्वरूप मोठ्या प्रमाणात बदललंय. पूर्वी केवळ प्रेम आणि एकत्र राहणं हेच नात्याचे आधार मानले जात होते. मात्र आता नातं टिकवण्यासाठी परस्पर समजूतदारपणा, विश्वास, संवाद आणि योग्य वेळी योग्य गोष्ट मांडण्याची कला तितकीच महत्त्वाची ठरते. अनेकांना वाटतं की, पती-पत्नीमध्ये कोणतीही गोष्ट लपवू नये. प्रत्येक भावना किंवा विचार लगेच व्यक्त करणं नेहमीच योग्य ठरत नाही. काही गोष्टी विचारपूर्वक आणि योग्य पद्धतीने सांगितल्या तरच नातं अधिक मजबूत राहू शकते.
तज्ज्ञांच्या मते, मनात येणारी प्रत्येक छोटी-मोठी गोष्ट किंवा प्रत्येक भावना जोडीदारासमोर मांडणं आवश्यक नसते. विशेषतः राग, तणाव किंवा भावनिक क्षणी बोललेले शब्द नंतर नात्यात कटुता निर्माण करू शकतात. सतत नाराजी, गोंधळ किंवा नात्याबाबतची असुरक्षितता व्यक्त केली तर समोरच्या व्यक्तीलाही तणाव आणि अस्वस्थता जाणवू शकते.
करिअरबाबतचा संभ्रम, नोकरी बदलण्याचा विचार किंवा आर्थिक अस्थिरतेची चिंता या विषयांवर बोलताना विशेष काळजी घेण्याचा सल्ला तज्ज्ञ देतात. कारण वैवाहिक जीवन हे केवळ भावनांवर चालत नाही तर जबाबदाऱ्यांवरही आधारित असते. सतत भविष्याबद्दल चिंता व्यक्त केल्यास जोडीदाराच्या मनात आर्थिक सुरक्षिततेबद्दल भीती निर्माण होऊ शकते आणि त्यामुळे नात्यात तणाव वाढण्याची शक्यता असते.
काही जण प्रामाणिकपणाच्या नावाखाली जोडीदाराच्या सवयी किंवा कमतरता थेट त्यांच्या समोर मांडतात. जसं की, वारंवार रागावणं, मोबाईलचा अतिवापर करणं किंवा भावनिकदृष्ट्या दूर राहणं अशा गोष्टींबाबत थेट टीका केली जाते. मात्र गोष्ट सांगण्याची पद्धत योग्य नसेल तर समोरच्या व्यक्तीला ती सूचना वाटण्याऐवजी टीका वाटू शकते.
रिलेशनशिप तज्ज्ञांचं म्हणणं आहे की, इतर कोणाबद्दल आकर्षण वाटत असल्याची कबुली अनेकदा नात्यातील विश्वासाला धक्का देऊ शकते. काही लोक हे प्रामाणिकपणाचे लक्षण समजून अशा गोष्टी शेअर करतात. मात्र त्यामुळे जोडीदाराच्या मनात असुरक्षितता, शंका आणि अविश्वास निर्माण होऊ शकतो. वैवाहिक नात्यात विश्वास हा सर्वात महत्त्वाचा आधारस्तंभ मानला जातो आणि अशा गोष्टी त्यालाच कमकुवत करू शकतात.
आजकाल अनेकजण लग्न झाल्यानंतरही मानसिकदृष्ट्या एकटे असल्याची भावना अनुभवतात. ही समस्या वाढताना दिसतेय. मात्र अशा भावना व्यक्त करताना योग्य शब्द आणि योग्य वातावरण पाहणं आवश्यक आहे. जर ही गोष्ट चुकीच्या पद्धतीने सांगितली गेली, तर जोडीदार स्वतःला दोषी समजू शकतो.
रिलेशनशिप तज्ज्ञांच्या मते, मनात आलेले प्रत्येक सत्य लगेच बोलून टाकणं म्हणजे प्रामाणिकपणा असं नाही. अनेक वेळा नातं जपण्यासाठी शब्दांचा वापर विचारपूर्वक करणं गरजेचं आहे. विवाह हा फक्त प्रेमाचा संबंध नसून विश्वास, आदर आणि भावनिक समतोल यांची भागीदारी असते. त्यामुळे कोणती गोष्ट कधी, कशी आणि कोणत्या पद्धतीने मांडायची हे समजणं महत्त्वाचं आहे.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.