Surabhi Jayashree Jagdish
मैत्री हे आयुष्यातील सर्वात सुंदर नात्यांपैकी एक मानलं जातं. सुख-दुःखात साथ देणारी मैत्री प्रत्येकाला हवी असते. मात्र काही वेळा हीच मैत्री नकळत मानसिक ताणाचं कारण बनू शकते. प्रसिद्ध क्लिनिकल सायकॉलॉजिस्ट आणि बेस्टसेलर लेखिका डॉ. ज्युली स्मिथ यांनी अशाच ‘टॉक्सिक फ्रेंडशिप’बाबत काही महत्त्वाचे संकेत सांगितले आहेत.
खरी मैत्री ही निस्वार्थ प्रेम, पाठिंबा आणि विश्वासावर टिकून असते. पण जर एखादा मित्र फक्त त्याला सोयीचं असेल तेव्हाच तुमच्यासोबत चांगलं वागत असेल, तर हा धोक्याचा इशारा असू शकतो.
डॉ. स्मिथ यांच्या मते, काही लोकांना तुमचं यश, आत्मविश्वास किंवा प्रगती सहन होत नाही. त्यामुळे तुम्ही त्यांच्या समोर नेहमी कमीपणाची भावना ठेवावी, अशी त्यांची अपेक्षा असते. अशा नात्यात मोकळेपणाने जगणं कठीण होतं.
कोणत्याही नात्यात मर्यादा आणि पर्सनल स्पेस महत्त्वाची असते. मैत्रीतही हे तितकंच लागू होतं. जर तुमचा मित्र तुमच्या स्पष्ट ‘नाही’कडे दुर्लक्ष करत असेल आणि सतत स्वतःचं म्हणणं लादत असेल, तर ते नातं हेल्दी नाहीये.
अनेकदा असे लोक इमोशनल प्रेशर समोरच्या व्यक्तीवर टाकतात. दबाव टाकून किंवा अपराधी वाटेल असं बोलून समोरच्याला आपल्या मनाप्रमाणे वागायला भाग पाडतात. त्यामुळे जर तुमच्या नात्यात असं होत असेल तर सावध व्हा.
काही वेळा मित्रांकडून मिळणारं कौतुकही मनाला टोचणारं वाटतं. वरून गोड बोललं जातं, पण त्या शब्दांमध्ये टोमणे किंवा कमी लेखण्याची भावना लपलेली असते. डॉ. स्मिथ यांच्या मते, हे टॉक्सिक मैत्रीचं एक मोठं लक्षण आहे.
जेव्हा तुम्ही एखादं दुःख किंवा अडचण मित्रासोबत शेअर करता, तेव्हा समोरचा तुमचं ऐकून घेण्याऐवजी स्वतःच्याच अनुभवांची तुलना करू लागतो, तेव्हा ते नातं टॉक्सिन होतं असं आपण म्हणू शकतो.