

गेल्या काही वर्षांत वजन कमी करण्यासाठी वापरल्या जाणाऱ्या नव्या औषधांनी, विशेषतः GLP-1 गटातील सेमाग्लूटाइड आणि टिरझेपाटाइड यांसारख्या औषधांनी लठ्ठपणाच्या उपचारांमध्ये मोठा बदल घडवला आहे. मात्र तज्ज्ञांच्या मते, ही औषधं प्रत्येक रुग्णासाठी पुरेशी ठरत नाहीत. काही विशिष्ट परिस्थितींमध्ये बॅरिएट्रिक सर्जरी हा अधिक प्रभावी आणि दीर्घकालीन उपाय ठरतो.
मुंबईतील सैफी, अपोलो आणि नमाहा हॉस्पिटल्समधील बेरियाट्रीक हर्निया आणि लॅप्रोस्कोपिक सर्जन डॉ. अपर्णा गोविल भास्कर यांनी सांगितलं की, वजन कमी करण्याच्या औषधांचा परिणाम एक मर्यादेपर्यंतच होतो. क्लिनिकल ट्रायल्समध्ये या औषधांमुळे साधारण १५ ते २१ टक्के वजन घटते, पण प्रत्यक्षात रुग्णांमधील क्षमता , औषधांचे नियमित सेवन आणि यासाठी येणारा खर्च यांसारख्या कारणांमुळे हे प्रमाण कमी असू शकते. त्याउलट, बॅरिएट्रिक सर्जरीमुळे २५ ते ४० टक्क्यांपर्यंत वजनातील घट कायम राखता येते.
ज्या रुग्णांचा बीएमआय ३५ ते ४० किंवा त्याहून अधिक आहे, त्यांच्यासाठी सर्जरी अधिक परिणामकारक ठरते. अशा रुग्णांमध्ये वजन कमी होण्याबरोबरच इतर आजारांमध्येही लक्षणीय सुधारणा दिसून येते. दीर्घकालीन वजन नियंत्रणासाठीही सर्जरी अधिक फायदेशीर ठरते.
डॉ. अपर्णा पुढे म्हणाल्या की, काही रुग्णांमध्ये औषधांचा अपेक्षित परिणाम दिसून येत नाही. शिवाय, औषधं बंद केल्यानंतर पुन्हा वजन वाढण्याची शक्यता जास्त असते. याउलट, बॅरिएट्रिक सर्जरीमुळे मिळणारे परिणाम अधिक टिकाऊ असतात. अभ्यासानुसार, सर्जरीनंतर १० वर्षांनंतरही २० ते २२ टक्के वजनातील घट टिकून राहते.
याशिवाय, टाइप २ डायबिटीज, हृदयविकार यांसारख्या गंभीर आजार असलेल्या रुग्णांमध्ये सर्जरीचे फायदे अधिक आहेत. अनेकदा सर्जरीनंतर रुग्णांना औषधांचा डोस कमी करावा लागतो किंवा काही वेळा ते पूर्णपणे बंदही करता येतात. दुसरीकडे, औषधांचे फायदे कायम ठेवण्यासाठी त्यांचा दीर्घकालीन वापर करणे गरजेचे आहे.
औषधांच्या बाबतीत खर्च आणि नियमित सेवन ही मोठी आव्हाने आहेत. दीर्घकाळ औषधं घेणे अनेकांना शक्य होत नाही. सर्जरीचा खर्च सुरुवातीला जास्त वाटला तरी, दीर्घकालीन दृष्टीकोनातून तो अधिक किफायतशीर ठरतो.
तज्ज्ञ सांगतात की, औषधं आणि सर्जरी हे एकमेकांना पर्याय नसून ते पूरक उपचार आहेत. सर्जरीपूर्वी जोखीम कमी करण्यासाठी किंवा सर्जरीनंतर वजन वाढ टाळण्यासाठी औषधांचा वापर केला जाऊ शकतो.
लठ्ठपणा हा एक गंभीर आजार असून, प्रत्येक रुग्णासाठी उपचार पर्याय वेगवेगळा असू शकतो . त्यामुळे “योग्य रुग्णासाठी योग्य वेळी योग्य उपचार” हा दृष्टिकोन पाळणे गरजेचे आहे
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.