Tukaram Mundhe: महाराष्ट्रातील मालिका, चित्रपट आणि वेब सिरीजच्या शूटिंग सेटवर कलाकार, तंत्रज्ञ आणि कर्मचाऱ्यांना निकृष्ट दर्जाचे व अस्वच्छ अन्न पुरविले जात असल्याच्या अनेक तक्रारी समोर आल्या आहेत. या गंभीर प्रकरणाची दखल घेत राष्ट्रवादी चित्रपट व सांस्कृतिक विभागाचे प्रदेशाध्यक्ष बाबासाहेब पाटील यांनी अन्न व औषध प्रशासन विभागाचे अपर मुख्य सचिव तुकाराम मुंढे यांच्याकडे लेखी तक्रार दाखल केली आहे. राज्यभरातील चित्रीकरण स्थळांवर अचानक तपासणी मोहीम राबवून दोषींवर कठोर कारवाई करण्याची मागणी त्यांनी केली आहे.
बाबासाहेब पाटील यांनी दिलेल्या निवेदनानुसार, राज्यभरात विविध मालिकांचे, चित्रपटांचे आणि वेब सिरीजचे शूटिंग सुरू असते. या चित्रीकरणामध्ये हजारो कलाकार, तंत्रज्ञ, सहाय्यक कर्मचारी आणि इतर कामगार सलग १२ ते १६ तास अथवा त्याहून अधिक काळ काम करतात. अशा परिस्थितीत त्यांना स्वच्छ, पौष्टिक आणि सुरक्षित अन्न मिळणे ही निर्मिती संस्था तसेच केटरिंग सेवा पुरवठादारांची कायदेशीर आणि नैतिक जबाबदारी असल्याचे त्यांनी नमूद केले आहे.
मात्र, अनेक शूटिंग सेटवर खराब दर्जाचे, अस्वच्छ आणि आरोग्यास अपायकारक अन्न पुरविले जात असल्याच्या सातत्याने तक्रारी येत असल्याचा दावा त्यांनी केला आहे. काही ठिकाणी अन्नसुरक्षा नियमांचे उल्लंघन होत असल्याचेही निदर्शनास आले आहे. त्यामुळे कलाकार आणि तंत्रज्ञांच्या आरोग्यावर गंभीर परिणाम होण्याची भीती व्यक्त करण्यात आली आहे.
यासंदर्भात अन्न व औषध प्रशासन विभागाने राज्यभरातील चित्रपट, मालिका आणि वेब सिरीजच्या शूटिंग सेटवर अचानक तपासणी मोहीम राबवावी, अशी मागणी बाबासाहेब पाटील यांनी केली आहे. अन्नाची गुणवत्ता, स्वच्छता, साठवणूक आणि अन्नसुरक्षा नियमांचे पालन याची तपासणी करून दोषी आढळणाऱ्या केटरिंग सेवा पुरवठादार आणि संबंधित निर्मिती संस्थांवर कठोर कारवाई करण्यात यावी, असेही त्यांनी पत्रात म्हटले आहे.