मोबाईल न मिळाल्याच्या रागातून महिलेने टोकाचे पाऊल उचलले
साडेतीन वर्षांच्या चिमुरड्या मुलासह विहिरीत उडी
बीड ग्रामीण पोलिसांकडून पुढील तपास सुरू
परिसरात हळहळ आणि धक्का
योगेश काशिद, बीड
पतीने मोबाईल घेऊन दिला नाही या रागातून एका २४ वर्षीय महिलेने आपल्या साडेतीन वर्षांच्या चिमुरड्या मुलासह विहिरीत उडी घेऊन जीवनयात्रा संपवल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. बीड तालुक्यातील लिंबारूई शिवारात घडलेल्या या हृदयद्रावक घटनेत मायलेकाचा जागीच मृत्यू झाला असून, या प्रकरणी पोलीस ठाण्यात खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. प्राजक्ता उर्फ राधा रामेश्वर दराडे (वय २४) असे मृत महिलेचे नाव असून, तिने आपला मुलगा वेदांत (वय ३) याच्यासह टोकाचे पाऊल उचलले.
मिळालेल्या माहितीनुसार, प्राजक्ता ही मागील काही दिवसांपासून पतीकडे नवीन मोबाईलची मागणी करत होती. मात्र, रामेश्वर बाबासाहेब दराडे यांनी मोबाईल घेऊन न दिल्याने त्यांच्यात वाद झाले होते. याच कारणावरून आलेल्य संतापाच्या भरात प्राजक्ताने आपल्या चिमुकल्या मुलासह विहिरीत उडी घेतली. या घटनेत मायलेकाचा बुडून मृत्यू झाला.
ही घटना ३१ डिसेंबर २०२५ रोजी घडली होती. सुरुवातीला या प्रकरणाची आकस्मिक मृत्यू म्हणून नोंद करण्यात आली होती. मात्र, पोलीस चौकशी दरम्यान धक्कादायक वास्तव समोर आले. फिर्यादी रामेश्वर दराडे यांनी दिलेल्या पुरवणी जबाबानुसार, ३१ जानेवारी २०२६ रोजी या घटनेचा सविस्तर गुन्हा नोंदवण्यात आला आहे.
चिमुरड्या वेदांतचा पाण्यात बुडवून खून केल्याप्रकरणी मयत प्राजक्ता हिच्यावर खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला. या प्रकरणाचा पुढील तपास बीड ग्रामीण पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक अशोक मुदिराज करत आहेत. एका क्षुल्लक कारणावरून दोन जीवांचा असा अंत झाल्याने लिंबारूई परिसरात मोठी हळहळ व्यक्त केली जात आहे.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.