
TCS Layoff News Update : सर्वात मोठी आयटी कंपनी असलेल्या टीसीएस (टाटा कन्सल्टन्सी सर्व्हिसेस) कंपनीमध्ये सध्या अनेक कर्मचार्यांना नारळ दिला जातोय. अनेक कर्मचाऱ्यांना राजीनामा द्यायला सांगितला जात असल्याचे धक्कादायक वास्तव समोर आले आहे. सोशल मीडियावर याची जोरदार चर्चा सुरू आहे. आयटी सेक्टरमधील भविष्याबद्दल चिंता आणि अनिश्चिततेचे वातावरण निर्माण झाले आहे. गेल्या काही दिवसांपूर्वी टीसीएस आपल्या दोन टक्के कर्मचाऱ्यांना नारळ देणार असल्याचे समोर आले होते. त्यानंतर आता दोन महिन्यानंतर त्याचे परिणाम दिसत आहेत. टीसीएसकडून अनेक कर्मचाऱ्यांना घरचा रस्ता दाखवला जातोय. कर्मचाऱ्यांचे वाईट अनुभव सोशल मीडियावर भयान वास्तव मांडत आहे. मनीकंट्रोलने याबाबतचे वृत्त दिले आहे. (TCS forced resignation employees stories)
टाटांच्या टीसीएस या आयटी कंपनीमध्ये कर्मचाऱ्यांना सक्तीने नारळ दिला जात असल्याचे समोर आले आहे. कर्मचारी कपातीच्या वृत्तामुळे आयटी सेक्टरमध्ये एकच खळबळ उडाली आहे. टीसीएससारख्या मोठा आयटी कंपनीमध्ये कर्मचाऱ्यांना सक्तीने राजीनामा देण्याची आणि नोकरीवरून काढून टाकण्याची लाट सुरू झाली. कर्मचाऱ्यांवर एचआरकडून नोकरी सोडण्यासाठी दबाव टाकला जातोय. कर्मचाऱ्यांना अपमानास्पद वागणूक मिळत असल्याचा दावाही करण्यात येत आहे. अनेक कर्मचाऱ्यांनी भविष्याबद्दल चिंता व्यक्त केली आहे. सोशल मीडियावरील पोस्टमध्ये टीसीएसमधील कर्मचाऱ्यांच्या व्यथा अन् अडचणी दिसत आहेत. अचानक नोकरी गमावण्यामुळे वैयक्तिक आयुष्यात होणाऱ्या गंभीर परिणामवर कर्मचाऱ्यांनी चिंता व्यक्त केली.
टीसीएसमधून एका कर्मचाऱ्याला कामावरून काढून टाकले. आपली नोकरी गेली, हे तो कुणाला सांगूही शकत नाही. तो आता बेरोजगार आहे. अचानक नोकरी गेल्याचे सत्य त्या तरूणाने अद्याप घरी सांगितलेलं नाही. तो अद्याप मानसिक तणावात अन् चिंतेत आहे. त्या तरूणाला एचआरने जबरदस्तीने राजीनामा दिला.
सोशल मीडियावर मांडल्या व्यथा, थरारक अनुभव वाचून नेटकरी हतबल
टीसीएससारख्या मोठ्या कंपनीमध्ये कर्मचारी कपात सुरू आहे. जबरदस्तीने राजीनामा देण्यास भाग पाडल्याचा आरोप अनेक कर्मचाऱ्यांनी केला आहे. कर्मचाऱ्यांनी सोशल मीडियावर कंपनीतील अनुभव शेअर केले आहेत. त्यांचे अनुभव वाचून अनेक नेटकरी हतबल झाले. अनेकांना आयटी क्षेत्रातील भविष्याबद्दल चिंता वाटल्याचे दिसून आले.
"मला राजीनामा देण्यास सांगून आज ३ दिवस झाले. राजीनामा देण्यास मी नकार दिला. त्यांच्यासमोर मी रडत होतो. घाबरत मी त्यांना नोकरीवरून काढू नका अशी विनंती केली. टीसीएस ही माझी पहिली कंपनी आहे, असे मी त्यांना सांगितले. पण त्यांनी मला धमकी दिली. आम्ही नोकरीवरून काढून टाकल्यानंतर वाईट रिव्ह्यू देऊ असे मला धमकावले. त्यावर मीही म्हणालो "ठीक आहे. तुम्हाला आवडेल तसं करा. मी काहीही केलं तरी राजीनामा देणार नाही. " मी प्रचंड रडत होतो, घाबरलो होतो... मला नोकरी जाण्याची भीती वाटत होतीच. पण मी त्यावेळी खंबीर राहण्याचा प्रयत्न केला, असे एका रेडिटवरील अज्ञात व्यक्तीने आपल्या पोस्टमध्ये म्हटलेय.
दुसऱ्या एका युजर्सनेही आपला अनुभव सर्वांसमोर ठेवला. तो म्हणाला की, टीसीएसमधील पॅनेल माझ्या राजीनाम्याची वाट पाहत होते. मी दररोज ७ ते ९ तास काम करतो. तरीही जवळच्या ठिकाणी रिपोर्टिंग का करतो? असा प्रश्न मला एचआरने विचारला. त्यावर मी म्हणालो की, आरएमजीने याबाबत मला कधीही काहीही सांगितले नाही. मला कोणताही मेल आलेला नाही. मी नेहमीच प्रत्येक कॉल, प्रत्येक मेल, प्रत्येक जीचॅट संदेश अटेंड केला. नेहमीच काम करतो, असे त्यांना सांगितले.
माझ्या कुटुंबातील मी एकमेव कमवता आहे. नोकरी गेली तर लग्नही रद्द होईल, मला नोकरीवरून काढू नका, कुटुंब माझ्यावर अवलंबून आहे, असे मी त्यांना विनवणी करून सांगितले. पण एचआरने मला राजीनामा देण्यास जबरदस्ती केली, असेही त्याने सांगितले. दरम्यान, माझीही नोकरी गेली आहे. मी सध्या बेरोजगार असून नोकरीच्या शोधात आहे. पण टीएसीएसमधील अनुभवामुळे मला अपमानित अन् निराश वाटतेय, असे अन्य एका युजर्सने म्हटलेय.
टाटांच्या टीसीएसविरोधात मंगळवारी देशातील अनेक शहरात आयटी आणि आयटीईएस कर्मचारी संघटनेनं आंदोलन केले, न्यू इंडियन एक्सप्रेसच्या वृत्तानुसार , सध्या सुरू असलेल्या नोकरी कपाताची परिणाम ३० हजार पेक्षा जास्त कर्मचाऱ्यांवर होऊ शकतो. टीसीएसने हा दावा फेटाळून लावला आहे. नोकरकपात ही त्यांच्या जागतिक कर्मचाऱ्यांच्या फक्त दोन टक्के किंवा १२ हजार पदांपुरतीच असू शकते, असे त्यांनी म्हटले आहे.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.